पटणा येथे एका युवतीचे एका युवकाशी काही कारणाने जोरदार भांडण होऊन ते भांडण रस्त्यावर आले व त्याचा काही विकृत लोकांनी अश्लाघ्य फायदा उठवण्याचा प्रयत्न करत त्या युवतीचा विनयभंग केला अशी बातमी आज सकाळी ( २४.०७.२००९) दूरदर्शनवरील कोणत्यातरी एका वाहिनीवर झळकत होती. या बातमीस त्या वाहिनीने चक्क काही खास वेळ दिला होता व त्या वाहिनीने खालील स्वरुपाचे प्रश्न फार जोरदार पद्धतीने उठवले होतेः
१. काय आम जनता सगळ्यावर न्याय करणार?
२. काय तालीबानचा कायदा येथे लागू होणार?
३. काय पटणामधील प्रशासन झोपले आहे?
४. काय आपली संस्कृती संपुष्टात आली?
वगैरे स्वरुपाचे!
चर्चा प्रस्तावः
१. झालेली घटना अत्यंत हीन असून अशीच घटना गेट वे ऑफ इंडिया व जुहूच्या हॉटेलसमोरही झाली होती. याला मुळातच पायबंद घालण्यासाठी काय उपाय योजले जावेत? ( म्हणजे, हे होऊच
नये म्हणून काय करता येईल? )
२. दुर्दैवाने, हे सर्वत्र थोड्याफार प्रमाणात घडत आहे हे खरे! पण माध्यमांनी त्याचा थेट संबंध तालीबानीकरणाशी वगैरे लावून स्वतःची जाहिरात करण्याशिवाय काय साधले? एकदा मागे कुणीतरी बालिका ही पुर्वजन्मीची कल्पना चावला आहे हे तासनतास दाखवले जात होते. त्यातून अंधश्रद्धेशिवाय काय साधू शकेल? माध्यमे बेजबाबदार आहेत हे समजत असूनही ते का चालवून घेतले जाते?
( प्रस्ताव २ बाबत आणखीन काही उदाहरणे - बालक बोअरवेलमध्ये पडला आहे यावर देशभर बोंब मारणे, फॅशन शो मध्ये कुणाचातरी ड्रेस घसरला म्हणून बोंब मारणे, मांत्रिकाने कसे बरे केले याची इथ्यंभुत बातमी देणे, करुणानिधींना कसे पकडले हे सांगत बसणे - यात त्यांना पकडावे किंवा पकडू नये याबाबत मला काहीचे म्हणायचे नाही, फक्त ते किती दाखवत बसावे याबाबत मी लिहीत आहे.
मतप्रदर्शनाची अभिलाषा!
धन्यवाद!