रस्त्याने जाता दिसला मज,लोकांचा मोठा जमाव
कोंडी झाली होती रहदारीची,जाण्यास नसे वाव
कित्येक वाहने अडकली असती,मधोमध रस्त्यात
कोणी न घेती माघार भांडणात,चढाओढ त्यांच्यात
प्रथम जाण्याची प्रत्येकास घाई,न सोडती ते स्थान
अपव्यय करती वेळेची तसेच इंधनाची नसे ते भान
असाच वेळ जातो भांडणात,घेत नसे कोणी माघार
येताना दिसतो लगबगीत लांबून,पोलिस हवालदार
काढुनी शिट्टी खिशातून,जोरात मारतो फुंकर त्यावर
भानावरती येती नागरिक, ऐकताच ती शिट्टी सत्त्वर
सूचना पाळती पोलिसाच्या,विसरून आपले मानपान
होई सुरळीत रहदारी,नागरिक मग सोडती ते स्थान
पाहुनी रस्त्यावरील देखावा, मनांत येतसे एक विचार
कधी होणार नागरिक या देशाचे, खरे सुज्ञ,समजदार
नियम शिकून रहदारीचे, नागरिक होवोत जबाबदार
किती दिवस यांना लागणार,रहदारीसाठी हवालदार