मैत्रिणीचा मित्रच सुखी!

सुख मानण्यात असतं हे विधान जरी खरं असलं तरी ते जाणण्यात मोठा आनंद दडलेला
असतो. प्रत्येकालाच मैत्रीण लाभते असे नाही. परंतु ज्यांना एखादीचा सहवास
जाणता आलाय तेच खरे जाणकार. त्यांना पुढच्या कोणत्याही गोष्टी नव्याने
शिकाव्या लागत नाहीत किंवा त्यांचे नव्याचे नऊ दिवस मैत्रीच्या व्यवहारातच
जुने झालेले असल्याने तेच खरे जुने जाणते बुजुर्ग म्हणून आत्मविश्वासाने
काळोखालाही सामोरे जातात...
मैत्रिणीच्या संगतीत पावन झालेली धरती अशा
भाग्यशाली मित्रांना अनोळखी न वाटल्याने त्यांचा खेळ उंचावत जाणार हे
निश्चित.
माती तांबडी असली की तिला पुर्वानुभवाचा इतिहास असतोच असतो.
एकदा का ती(लाल माती) अंगाला भिडली की मल्लांच्या स्नायुंना आपोआप अमिटणारे
स्फुरण चढलेच म्हणून समजा. रेताड, मुरमाड मातीत आधीच लोळून झाले असल्याने
तिचा कण अन् कण कोळून प्याला असल्याने नव्या फडातली मऊ चिकण माती अंगावर
घेण्याचा स्पर्शानंद काही औरच वाटू लागतो. अशावेळी मातीलाही घामजलेल्या
अंगाला चिकटण्याचा (दांडगा) अनुभव असेल तर कुस्ती रंगतदार होणार हे नक्की!
जे
अनअनुभवी आहेत त्यांची पहिल्या आखाड्यातच भंबेरी उडते. नवख्या खेळाडूसोबत
कोणता डाव खेळावा हेच नीटसे ठरत नाही. नवख्या मातीचा स्पर्शही नवाच
असल्याने गुदगुल्या होण्याचा संभव अधिक असतो. कधी कधी नमनालाच घडाभर तेल
ओतल्याशिवाय गण गौळण सुरु होत नाही, जमलेली भट्टी पेटत नाही. धुरकट
वातावरणाचा परिणाम विमानाच्या लँडिंगवर होतो, असंही बऱ्‍याचदा नवशिक्या
वैमानिकाच्या बाबतीत घडतं.
एकंदर काय तर कुस्तीच्या आखाड्यात थोडा बहुत
अनुभव गाठीशी असेल तरच पाठीशी लाल माती प्रेमळतृप्तीचे हितगुज करू शकते.
अन्यथा चितपट होणेच नशिबी येते.
याउलट मैत्रिणीने आपल्या खास ढंगात
मित्राला निसरड्या मैदानावरच्या रणनिती समजावून दिलेल्या असतात, नव्हे तर
नव्हे आखाड्यातील खाचाखोचाही सांगितलेल्या असतात. म्हणूनच तो मित्र अशाकामी
तरबेज होतो, हुशार बनलेला असतो.
इतकेच नव्हे, तर त्या मैत्रिणीने
प्रेमरंगापासून प्रेमभंगापर्यंतचे अनेक अनुभव मित्राच्या शिदोरीत सामावून
दिलेले असतात. ती जरी ब्रेक अप करून नवा गडी नवा राज शोधायला मोकळी झाली
असली तरी मित्राला तिने बांधून दिलेली शिदोरी आयुष्यभर चार्जिंग देत राहते,
भलेबुरे इशारे सुद्धा देत राहते.
म्हणूनच पूर्वायुष्यात मैत्रीण
लाभलेला मित्रच खरा सुखी, पूर्ण समाधानी व निश्चित तृप्त असतो...