प्रिय आत्मन- एक स्मृतिगंध

मी ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी विदर्भ प्रवास करून आलो. गजानन महाराजांच्या खामगाव जवळ नांदुरा येथे १९९८-२००० या कालात मी बैंकेचा शाखाप्रबंधक म्हणून होतो. त्यामुळे तेथे देखील मित्रांना भेटणे या उद्देशाने २ दिवस मुक्काम होतो. त्या भेटीत मला वरील मथळा असलेले एक पुस्तक माझ्या मित्राने मला भेट दिले. ते वाचल्या नंतर ओशो याबद्दल मला जे वाटले ते आपणासोबत शेअर करावे म्हणून हा प्रपंच.

वरील नावाचे हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशन डेक्कन जिमखाना, पुणे-४ यांनी २ आक्टोबर २००८ रोजी प्रकाशीत केले आहे. लेखक आहेत सत्य निरंजन (पी.सी. बागमार) आणी यास प्रस्तावना दिली आहे श्री यशवंत देव यांनी.यशवंत देव यांच्या शब्दात या महापुरुषाबद्दल थोडी माहिती साभार देत आहे तुमची उत्सुकता वाढली तर वरील पुस्तक जरूर वाचा.

"ओशो रजनीश" नावाचे एक सुनामी वादळ भारतात घोंघावून गेले. ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० इतका दीर्घकाळ या वादळाचा झपाटा होता. कुठलेही वादळ येते ते वस्तूंचे नुकसान करून जाते. मानवी जीवनही हाहाकार करून जाते. पण या वादळाची गतीच न्यारी! या वादळाने समाजातल्या दंभावर हल्ला चढविला आणि सत्याला अभय दिले.

या पुस्तकात ओशोंच्या निवडक प्रवचनांचा सारांश वाचकाला आढळेल . अनेक ठिकाणी ओशां स्वतः:च आपल्यासमोर आहेत आणि आपल्यालाच उद्देशून जणू "ध्यान करा" अस निग्रहाचं प्रतिपादन करीत आहेत असं वाटेल.'संभोग से समाधी की ओर' हे पुस्तक हजारो लोकांनी वाचलं - काहींनी उघडपणे वाचलं , काहींनी लपून - छपून वाचलं ! त्या पुस्तकावर जसा गदारोळ उठला, तसंच त्या पुस्तकाबद्दल फार चांगली मतंही बोलली गेली. ओशोंनी कशाचीही पर्वा न करता जे भावलं , अनुभवलं तेच समाजापुढं ठेवलं. त्यातील सूत्र एकच . "ध्यान करा ! ध्यान करा !! सर्व प्रकारचे असमाधान नाहीसे करू शकणारा तोच एक राजमार्ग आहे." ओशोंनी सर्वांना जवळ केले. हिंदू, मुस्लिम , जैन , बौद्ध, ईसाई... इतकंच काय अमेरिकेमधल्या हिप्पी पंथीयांनाही त्यांनी दूर लोटले नाही. उलट त्यांना ध्यानाची गोडी लावली आणी मनाच्या तळाशी असलेल्या शांतीच्या शोधासाठी प्रवृत्त केले. एखाद्या डॉक्टरच्याभोवती रोग्यांचा गराडा पडलेला असतो. आपल्याला औषध हवे असेल तर आपण त्या रोगी गर्दीकडे दुर्लक्ष करून डॉक्टरलाच भेटले पाहिजे !

 ओशोंचे वास्तविक मूल्य त्यांच्याभोवतीच्या अर्ध्याकच्च्च्या साधकांकडे बघून केले तर तो एक मोठा प्रमाद असेल.ओशोंच्या आश्रमात हजारो साधक येत होते. त्यांच्या अपूर्णत्वाकडे पाहून ओशोंची करुणा उलट वाढली. त्यांनी अशा मंडळींना हाकलून तर दिले नाहीच; उलट आईच्या मायेने त्यांना जवळ केले आणि त्यांना ध्यानाचा लळा लावला.ओशो म्हणजे करुणासागरच . त्यांच्या करुणापूर्ण दृष्टीचे अनेक प्रसंग या पुस्तकात सविस्तर पणे शब्दबद्ध केले आहेत . ओशोंवर एकदा एका व्यक्तीने सुरा फेकून मारला होता. त्या व्यक्तीवर सुद्धा राग न धरता ओशोंनी त्याला प्रेमच दिले.

सन १९८० मध्ये अमेरिकेतल्या ओशो आश्रमाची स्थापना झाली होती. तिथली ६४००० एकर जमीन खरेदी करून, 'रजनीशपुरम' ची केलेली स्थापना . तिथे २५००० साधक एकावेळी बसू शकतील एवढा ध्यानकक्ष होता. परंतु अमेरिकन सरकारचे लक्ष ओशो आणि कम्युन होते. त्यांना सत्य-असत्य या गोष्टीत रस नव्हता. ओशोंच्या रूपाने त्यांना एकूणच ख्रिश्चन धर्मावर संकट वाटत होते. व त्याकरिता येनकेन प्रकारे त्यांना ओशोंचा काटा काढायचा होता. व कम्युन नष्ट करायचे होते. त्याकरिता त्यांनी ओशोंना कोणतेही संयुक्त कारण ने देता बेकायदेशीर पणे अटक केली व बारा दिवस निरनिराळ्या तुरुंगांतून फिरविले व त्या दरम्यान त्यांना 'थेलियम' नांवाचे विष अन्नातून दिले. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला व अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना त्यांना तोंड द्यावे लागले. शेवटी ऑक्टोबर १९८५ मध्ये ओशोंना अमेरिकेहून हद्दपार करण्यात आले. या सर्व गोष्टींचा अतिशय बारकाईने आणि सविस्तर आढावा ज्युलिएट फॉर्मन यांनी लिहिलेल्या ' Twelve days that shook the world'या पुस्तकात वाचायला मिळतो. 

अमेरिकन सरकारचे बेकायदेशीर व बेमुर्वतखोर कृत्यांचे पाढेच बिनतोड पुराव्यानिशी या पुस्तकांत वाचायला मिळतात. यानंतर ओशोंनी जागतिक दौर्‍याच्या निमित्ताने अनेक पाश्चात्य देशांना भेटी दिल्या . त्या सर्व देशांनी ओशोंना प्रवेश नाकारला. या सर्वामागे अमेरिकेचे कारस्थान होते हेही सिद्ध झाले. ओशो म्हणतात, "या निमित्ताने हे तथाकथित सुसंस्कृत , पुढारलेले व लोकतंत्र प्रणालीचे देश किती बेकायदेशीर व खोटेपणाने वागू शकतात हे सिद्ध होते."

पुण्याच्या आश्रमात अनेक जण उत्सुकतेपोटी येत असत. त्यात साहित्यिक , पत्रकार, उद्योगपती, अभिनेते असे अनेक क्षेत्रातले दिग्गज होते.पु.ल.देशपांडे, शिवाजीराव भोसले, 'दै.केसरी', 'दै.सकाळ' अशा वर्तमानपत्रांचे संपादक इ. अनेक मंडळी आश्रमात येऊन तिथली दिनचर्या पाहून चकित होत असत.

ओशोंची धारणा अशी होती , की भारताने भौतिकाकडे पाठ फिरवली म्हणूनच भारत गुलामगिरी भोगू लागला. 'कर्मकांड म्हणजे धर्म' असा पंडित पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचार केला . 'धन दान करा; म्हणजे तुम्हाला पुण्य लाभेल' असे सांगताना धन स्वतः आधी मिळवले पाहिजे हे ते सोयीस्करपणे विसरले. आणि मग धन जोडण्यात पाप ते कसले? या प्रश्नावर पंडित , पुरोहित , काय बोलणार ? ओशोंनी या सर्व अनिष्ट प्रचाराचा आणि प्रवृत्तींचा सणसणीत शब्दात समाचार घेतला.

या पुस्तकाचे वाचक, अनेक चरित्र-ग्रंथाप्रमाणे हे पुस्तक वाचून जर केवळ 'छान आहे'; 'अरे वा', ओशो असे होते; हे आम्हाला माहीतच नव्हते' असं म्हणून स्वस्थ बसतील तर ओशो म्हणजे नेमकं काय आहे हे त्यांना कधीही कळणार नाही. कारण ओशाँची ओळख तेव्हाच होते, जेव्हा आपल्याला आपली स्वतःच्या 'स्व'ची ओळख होते. जीवनात सर्व वस्तूंच्या उपभोगाच्या पलीकडे गेल्यानंतर जी 'अवस्तु' अनुभवाला येते, त्याचेच नाव 'ओशो' त्या अवस्तूकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच ध्यानमार्ग.