तो ही ढगच - जो साऱ्यांना हवा असतो
त्यांना हवं तेव्हाच, तेवढंच नेमकं बरसतो
नद्या, शेतं, माणसं, घरांना पाहिजे तेवढंच भिजवतो.
आणि तो ही ढगच -
जो स्वतःलाच सावरण्यास दुबळा ठरतो.
अपेक्षित नसताना अंदाधुंद कोसळतो.
कित्येकांचं - स्वतःचंही - अस्तित्वच मिटवतो.
फुटावं का बरसावं हे ढगाला ठरवता येत नसतं.
बरसण्याचं नशीब त्यालाही लिहून आणावं लागतं.