एक काव्य,
कवित्व पोरके करून,
काव्यात्म झाले ।
मराठी मातीत लावलेली
'चांदणवेल'
'पिंपळपानाच्या' 'समिधा',
'जाईच्या कुंजात' विशाखा नक्षत्रावर टाकून
'जीवनलहरीचा'
'दुधाळ किनारा' सोडून
'मेघदुता' सवे अध्यात्म झाले ।
हा 'एकाकी तारा' - 'अंतराळय़ात्री'
'वाटेवरल्या सावल्यांचा'
'विसावा' घेत-घेत
'प्रकाशाची दारे' ठोठावता झाला ।
'श्रावणातले'
'छंदोमयी' 'प्रवासपक्षी'
'संघर्षहीन बेटावरील'
'देवाच्या घरासमोरील'
'सारस्वताच्या झाडावर' बसलेत-
'मुक्तायन' करीत ।
बहरलेली 'वादळवेळ'
'फुलराणी' बनूनसुद्धा
'राजमुकूट' फेकून बसलीय
आक्रंदन करीत ।
'वैष्णव' आणि 'जान्हवीने' सुद्धा
सोडून दिलाय हट्ट
'जादूच्या हो़डीचा',
'सतारीचे बोल आणि इतर कथा'
ऐकण्याचा.
'छोटे आणि मोठे'
काही वृद्ध काही तरूण, सारेच
'आनंद' हरवून बसले
'मुख्यमंत्री' सुद्धा पायउतार झाले ।
हे 'रसयात्री' 'पांथेय' -
'दुसरा पेशवा' किंवा
'ययाती आणि देवयानी'
कालगती झाले अन्यथा-
त्यानीसुद्धा 'राजसंन्यास' घेऊन
हिमालयाची वाट धरली असती
पण....
आहे आणि नाहीच्या
'दिवाणी दाव्यात'
'कौंतेय' आणि 'ऑथल्लो' सारखे महंत
'विरामचिन्हे' मांडत बसले ।
आणि 'वैजयंती'-
'चंद्र जिथे उगवत नाही' तिथे
'मुक्त गद्यात'-
'विधात्याची' रुपरेषा ग्राह्य मानून
'दूरचे दिवे' पाहण्याचे स्वप्न जपले आहे ।
साऱ्याच 'अपाईंटमेंट'
'नटसम्राटांच्या' संपल्या तरी-
'वीज म्हणाली धरतीला'-
एक स्वगत संपले आहे.