बघ तुला काही सुचतंय का?

बघ तुला काही सुचतंय का?
(विडंबन-बघ माझी आठवण येते का?)
(कवी सौमित्र यांची जाहीर माफी मागून)

शांत मनाने जरा विचार करून पहा
बघ तुला काही सुचतंय का?

हात लांबव, उचल ती टेबलावरची लेखणी
आलेला विचार लिहून टाक
बघ तुला काही सुचतंय का?

मनात आलेलं विचारांचं काहूर थोडं सावरून घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच सावरलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभा रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ तुला काही सुचतंय का?

मग चालू लाग, प्रवासाला निघालेल्या रवीचा निरोप घे
चालत रहा वाट संपेपर्यंत, ती संपणार नाहीच, परत घरी ये
गोंधळून जाऊ नकोस, शांत चित्ताने एका ठिकाणी बस
आता विचार करून बघ, बघ तुला काही सुचतंय का?

मग कोणीतरी येईल, येऊ दे, बायको असेल
तिचा हात तू हातात घे,  ती लगेच विचारेल
ती विचारेल तुला तुझ्या शांततेच कारण, तू म्हण असंच
मग ती चहा करेल, तू ही घे
ती उठून गाणं लावेल, ते तू बंद कर
किशोरच (सौमित्र) गारवा लाव, बघ तुला काही सुचतंय का?

मग रात्र होईल तू तिला कुशीत घेशील, म्हण तू मला आवडतेस
तीही तसंच म्हणेल
मन गहिवरून येईल, तुला भरून येईल
ती झोपी जाईल, तिच्या चेहऱ्याकडे बघ
बघ तुला काही सुचतंय का?

यानंतर मनांत आलेले विचार कागदावर लिहायला विसरू नकोस
यानंतर शांत मनाने हृदयाचं ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर लेखणी हातात घे, आणि लिहिण्याचा प्रयत्न कर
अनुभवलेल्या या दिवसात तरी, बघ तुला काही सुचतंय का?

प्रसाद पासे