कथा

बराच काळ लोटला तरी अजूनही ते त्याच जागी अडकलेले, काळाची
अर्थात त्यांना पर्वा नव्हती पण ज्या साठी ते आतुरले होते ती गोष्ट.....?
कधी सुटका होणार? कधी ? अनेक प्रश्न त्या अंधारात उमटले. उत्तरादाखल एकच
वाक्य. 'लवकरच, सुरुवात तर झालेलीच आहे माध्यम मिळण्याचाच
अवकाश'........................



*********

मुंबई- गोवा महामार्गावर पनवेल आणि पेणच्या मधे डाव्या बाजूला एक नर्सरी
दिसते ती पाहिलीत का कधी ? ती माझीच आहे. इथे तुम्हाला फक्त फुलझाडंच
मिळतील, अगदी तुम्ही कधी पाहिली नसतील अशा फुलांचीसुद्धा शेकडो प्रकारची
कलमं आहेत माझ्या नर्सरीत, पण फक्त फुलझाडंच, कारण बाकी कशात मला फारशी
रुची नाही.

तसं फुलांचं वेड मला लहानपणापासूनच, आमच्या घराच्या इवल्याश्या बागेत मी
तर्‍हेतर्‍हेची फुलझाडं लावायचो त्यातली कित्येक तर लोकांनी अशुभ
म्हटलेली, घरच्यांचा मार खाऊन पण माझा छंद मी जोपासत होतो. साहजिकच
शिक्षणात फारशी प्रगती नव्हतीच, जेमतेम पास होत होतो इतकंच. पुढे याचं काय
होणार? हा प्रश्न मी घरच्या मंडळींना पडूच दिला नाही. हजार खटपटी करून मी
माझी स्वतः:ची नर्सरी तयार केली. आता मला फुलांच्या राज्यात सुखानं राहता
येणार होतं.

फुलांचं राज्य, कल्पना जरी काव्यमय असली तरी, प्रत्यक्षात जगणं मात्र
महाकठीण. नुसत्या फुलझाडांमधून उत्पन्न फारसं मिळत नाही. इथे येणारी
गिर्‍हाईकं म्हणजे काही शेकडोंच्या घरात रोपं नेत नसतात, नुसतीच फुटकळ एक
दोन रोपांची खरेदी, आणि अशी दिवसामागे चारपाच गिर्‍हाईकं, काय डोंबलं खर्च
भागणार ? हौस म्हणून ठीक आहे, पण धंदा म्हणून पाहिलं तर मी दिवसेंदिवस
तोट्यातच चाललो होतो. मग नेहमीचीच विवंचना, लोकांचे फुकटातले सल्ले सगळं
चालू होतं. तो दिवस मात्र जरा वेगळा निघाला, एका गडगंज श्रीमंत कुटुंबाच्या
नव्या घराच्या बागेची रचना करून देण्याचं काम मला मिळालं, आता तुम्ही
विचार कराल की नर्सरीचा उद्योग करणारा माणूस आणि बागेची रचना ? पण मला ते
शक्य आहे हे त्यांना कुठुनसं कळलं असावं, आणि घरचा गाडा रुळावर आणायचा तर
मला नाही म्हणताच येणार नव्हतं.
असो, तर यथावकाश त्यांची बाग मी माझ्या कल्पकतेने सजवली, अर्थात त्यातही
मधे मधे मोकळ्या सोडलेल्या जागेबद्दल त्यांनी मला भंडावून सोडलं होतं,
तरीही मी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. जस- जसे ऋतू सरत गेले तसतसे त्या
मोकळ्या जागेतून बाहेर डोकावणार्‍या लिलीच्या तुर्‍यांनी आपले रंग उधळायला
सुरुवात केली. मग काय विचारता, त्यांचे कौतुक आणि मला शाबासकी मिळतच
राहिली. पटापट लोकांची बागेची रचना करून घेण्याची आणि ती ही खास माझ्याकडून
संख्या वाढायला लागली. हे लोक अक्षरशः चांगल्या जोपासलेल्या बागेवरून
नांगर फिरवायला सुद्धा मागे पुढे पाहत नव्हते. आपण तरी काय करणार ? मोठे
लोक मोठ्या गोष्टी.

शेवटी कधी ना कधी तरी हे ही काम संपणार होतंच, कारण कितीही झालं तरी
सध्याच्या या गर्दीत बाग सांभाळू शकणारी घरं असून असून असणार किती? पुन्हा
परवड सुरू झाली, पण या सगळ्याचा फायदा एकच की लिलीसारख्या निव्वळ रानवट (
हे लोकांचं मत ) झाडांचं सौंदर्य आता लोकांना कळायला लागलं आणि माझ्याकडची
लिलीच्या रोपांची मागणी वाढली. तुमच्या माहितीसाठी सांगतो या लिलीच्या
कित्येक जाती आहेत आणि एकाहून एक सरस फक्त त्यासाठी तुम्हाला त्या शोधत
फिरावं लागतं ते ही चांगल्या सरधोपट रस्त्याने नव्हे तर एखाद्या डोंगरदरीत.
साहजिकच मला डोंगरदर्‍यांतुन भटकंती करावी लागली. अशाच एका भटकंतीत मला
‘तीतु’ भेटला. विलक्षण नाव आहे 'तीतु' पण याच नावानं त्याने आपली ओळख दिली.

त्याचं असं झालं, असाच भटकत असताना मी वाट चुकलो, एव्हाना अंधार पडायला
लागला होता. अशावेळी आपल्याला आपलं एकटेपण जास्तच प्रभावीपणे जाणवतं राहतं.
मी ही आजूबाजूला एखादी सोबत थोडक्यात मनुष्य वस्ती आहे का याचा शोध घेत
राहिलो. दूरवर ऐन डोंगराच्या उतारावर मंदपणे प्रकाशणारी उजेडाची ठिणगी मला
दिसली. ‘कुणीतरी राहतंय इथे’ मनाला तेवढाच दिलासा मिळाला. दूरवर दिसणार्‍या
दिव्याच्या रोखाने पावले टाकत टाकत मी एकदाचा तिथवर पोहोचलो. त्या
मिणमिणत्या प्रकाशाचे उगमस्थान म्हणजे एक मोडकळीला आलेली झोपडी होती.
कसंबसं मन घट्ट करत एकदाचा त्या झोपडीत डोकावलो. आत बसलेला प्राणी जर त्या
झोपडीचा मालकच असेल तर तो अगदी सार्थ होता.
मिणमिणत्या उजेडात शक्य तितकं मी त्याचं निरीक्षण केलं, एकदम हडकलेलं शरीर,
अंगावरचे कपडे, कपडे कसले चिंध्याच म्हणायचं त्यांना, आणि असलं हे गचाळ
ध्यान कुठेतरी एकटक पाहत बसलेलं, मी आत येऊन उभा राहिलो तरी त्याचं
माझ्याकडे लक्ष नव्हतं. शेवटी नाईलाजास्तव मी घसा साफ करून त्याला ‘आत येऊ
का ?’ असं विचारल्यावरच त्याची ती तंद्री भंगली. माझ्याकडे त्यानं चेहरा
वळवला तेव्हा सेकंदभर दचकायलाच झालं. त्याचं ते अस्ताव्यस्त दाढीचे खुंट
वाढलेलं थोबाड, अर्धवट उघडे ओठ, डाव्या गालावर कुणीतरी पंजा मारावा तसे
खोलवर उमटलेले तीन समांतर व्रण आणि सर्वात कळस म्हणजे त्याची ती शून्यात
हरवलेली नजर. ताबडतोब या ठिकाणावरून पळ काढावा असा विचार मनात येऊन गेला,
पण पळून-पळून कुठे जाणार होतो मी ? एकतर हा प्रदेश अनोळखी त्यात पावलावरचं
दिसणार नाही असा काळोख, बाहेर कुठेतरी भटकत जीव धोक्यात घालण्यापेक्षा इथे
या वेडसराच्यासोबत राहिलं तर बरं. माणसाचे विचार किती उथळ असतात नाही? हा
असला माणूस मला भर गर्दीत दिसला असता तर मी त्याला काहीही करून टाळला असता
पण आता परिस्थिती माझ्या विपरीत असल्यावर मला त्याचीही सोबत वाटायला लागली
होती.
भकास नजरेनं तो माझ्याकडे बघत होता आणि त्याची परवानगी गृहीत धरूनच मी त्या
लहानश्या झोपडीच्या दुसर्‍या कोपर्‍यात टेकलो. बराच वेळ नुसत्याच शांततेत
गेल्यावर मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून त्याला नांव विचारलं,
" ती..तु " अडखळत्या आवाजात त्याचं उत्तर आलं. त्याचा तो खरखरता घोगरा आवाज
ऐकून कुणीतरी पाटीवर मोडक्या पेन्सिलीचा तुकडा ओढल्यावर येतो तसा शहारा
आला. तिथून पुढे मी त्याला काहीच विचारायचं नाही असं ठरवून टाकलं.त्याही
परिस्थितीत केव्हातरी झोपेने दिवसभराच्या पायपिटीमुळे थकलेल्या शरीराचा
ताबा घेतला आणि माझ्याही नकळत मी झोपेच्या अधीन झालो.

'फार काळ वाट पाहावी लागणार नाही रचलेल्या सापळ्यात सावज
सापडतंय, दुनियेचे दरवाजे आपल्या सगळ्यांसाठी लवकरच खुले होणार आहेत',
समाधानाचे आनंदाचे अनेक चित्कार त्या अंधारात उमटले.

सकाळी केव्हातरी थंडीच्या जाणिवेमुळे जाग आली. डोळे उघडताच क्षणभर आपण
कुठे आहोत तेच कळेना, पण हळूहळू रात्रीचा प्रसंग आठवला आणि नकळतच नजर
झोपडीच्या दुसर्‍या कोपर्‍यात गेली. तीतुच्या मळकट ध्यानाची अपेक्षा करत
असताना ती जागा रिकामी बघून जरा चक्रावल्यासारखं झालं. तीतु बसलेली जागा
मला सकाळच्या प्रकाशात स्वच्छ दिसत होती, एक कळकट फाटलेली सतरंजी, न राहवून
मी झोपडीवरून नजर फिरवली. नावालाही इथे कुणी रहात असेल असं वाटत नव्हतं,
मी नक्की कसली अपेक्षा करत होतो? चूल, भांडीकुंडी याची ? या असल्या भणंग
माणसाकडे यातलं काहीच नसणार हे मी आधीच गृहीत धरायला हवं होतं. कसं का
असेना, या मोडक्या झोपडीनं मला रात्रभर आसरा तर दिला, तीच्या मालकाला
धन्यवाद देणं शक्य दिसत नव्हतं म्हणून मी खिशातून पन्नासाची नोट काढून त्या
फाटक्या सतरंजीवर ठेवली आणि बाहेर पडलो.

अशक्य.. अशक्य दृश्य होतं समोरचं, या रानात मी बाकी कसलीही अपेक्षा केली
असती तरी समोर दिसणार्‍या दृश्याची नक्कीच नाही. समोर डाव्या हाताला
लालबुंद गुलाबाची फुलं आलेली आठ-दहा रोपं ओळीने लावून ठेवलेली होती आणि
बाजूलाच तो वेडसर वाटणारा तीतु एका गुलाबाच्या रोपट्याशी काहीतरी करत होता.
आपण नेहमी बघतो ते गुलाब थोडे कळपट रंगाकडे झुकणारे असतात पण इथे तर एकदम
लालचुटुक गुलाबाची फुलं दिसत होती. कुठून आली असतील ही? या वेड्याने कुठून
चोरली तर नसतील? मी याचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवलं आणि तिकडे वळलो.

जवळपास अर्धा- पाऊणतास खर्ची घातल्यावर इतकं कळलं की हा तीतु जरी वेडसर
दिसत असला तरी त्याला झाडांच्या कलमाचं चांगलंच ज्ञान आहे, आणि आजूबाजूच्या
गावातली बर्‍याशा आर्थिक परिस्थितीतील माणसं अन्नाच्या बदल्यात
त्याच्याकडून झाडांवर कलमं करून नेतात. इतकीच माहिती कळायला एवढा वेळ गेला
कारण तीतुचं अडखळतं बोलणं समजायला बरेच कष्ट पडत होते. मी आजूबाजूच्या
रोपट्यांकडे भारावून बघत असताना तीतु कुठेतरी गायब झाला. त्याला शोधायला मी
पुन्हा झोपडीत डोकावलो तर स्वारी पुन्हा त्या फाटक्या सतरंजीवर पाय पसरून
बसलेली, मी मघा ठेवलेली पन्नासाची नोट अजूनही तिथेच पडून होती, जणू त्याला
कसली पर्वा नव्हतीच. ‘हे असलं रत्न माझ्या नर्सरीत असलं तर?’ विचार जरा
कठीणच होता, पण एकंदरीत हा प्राणी निरुपद्रवी दिसत होता त्यातून नाहीच जमलं
याच्याशी तर त्याला पुन्हा आणून सोडता आला असता. मनाशी पक्का निर्णय घेऊन
मी तीतु कडे वळलो.

तीतुला मी कसाबसा समजावून माझ्याबरोबर आणला खरा, पण एक महत्त्वाचा
प्रश्न अजूनही होताच. या वेडसर दिसणार्‍या माणसाबरोबर काम करायला माझे
कामगार तयार होतील ? आणि त्यांच्या प्रतिक्रिया न बोलताच खूप काही सांगून
गेल्या. शेवटी एका कोपर्‍यात तीतुला मी एक खास वेगळी अशी जागा तयार करून
दिली. तिथे त्याचे कलमं करण्याचे उद्योग निर्वेधपणे चालू राहिले असते.
त्याची राहण्याची सोय नर्सरीच्याच बाजूला एक तात्पुरती पत्र्याची खोली
उभारून करून दिली. किमान आता तरी त्याचा इतरांना त्याचा त्रास वाटायला नको,
हळूहळू सवय झाल्यावर बाकीचेही लोक त्याला सांभाळून घेतील अशी मनाच्या
कोपर्‍यात कुठेतरी आशा वाटत होती.

तीतुची काम करण्याची पद्धत जरा विचित्रच होती हे खरं, दिवसभर ते येडं
नुसतं रोपांकडे पाहत बसत असायचं, आणि संध्याकाळ झाली की त्याला कामाची आठवण
यायची, मग रात्री उशीरापर्यंत तो कलमांवरच काम करत बसलेला असायचा.
सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं पण नंतर एकूणच त्याच्या जुन्या रहाणीमानाची
आठवण ठेवता त्याचं वागणं नॉर्मल वाटायला लागलं. त्याला आजूबाजूचा माणसांचा
गलका कदाचित पसंत नसावा.

आणखी एका गोष्टीनं मला जरा संभ्रमात पाडलं, ती म्हणजे तीतु कलमं करायला
काहीतरी वेगळीच पद्धत वापरायचा. डोळा भरणे, फ़ांदीचे कलम असले प्रकार त्याने
करताना मी कधी त्याला पाहिला नाही, अर्थात तसं पाहणं शक्यही नसायचंच कारण
तो कुठल्याही व्यक्तीसमक्ष त्याचं काम करायचा नाही, अगदी तो काम करताना
कुणी तिथं डोकावलं तरी ताबडतोब तो त्याचं काम थांबवायचा, पण कदाचित तो साल
वापरून कलम करत असावा. रोपांना जखमी करणं कदाचित त्याला आवडत नसेल, मग मी
ही जास्त खोलात शिरायचा प्रयत्न करत बसलो नाही शेवटी मला रिझल्टशी मतलब
होता. मात्र एक खरं की त्याने केलेलं एकही कलम कधी मेलं नाही. आता वाट पाहत
होतो तीतुच्या कलमांना कळ्या यायची, त्या आल्या पण मी बघितलेल्या तश्या
लालचुटुक रंगाच्या फुलांच्या नाही, तर पिवळ्याधमक रंगाच्या. बजावून
सांगितलेलं असतानासुद्धा त्यानं कलमं चुकीची केलेली दिसत होती. मी याबद्दल
त्याला खडसावून विचारलं तर तो नुसतंच हसला, तेच वेडसर हसू, बहुतेक याला परत
नेऊन सोडावा लागणार असे विचार मनात डोकावायला लागले.

तीतुनं केलेल्या कलमांना कळ्या येऊन दोन- चार दिवस झाले असतील त्यानं
पहिल्यांदाच मला त्याच्या काम करायच्या जागेकडे नेलं, समोर दिसणारी रोपटी
बघून मी पाहतंच राहिलो, दोन दिवसांपूर्वी पिवळ्याधमक दिसणार्‍या गुलाबकळ्या
आता गुलाबी रंगाची उधळण करत होत्या. मुख्य म्हणजे अजून त्यांची फुलं
झालेली नव्हती. सर्वसाधारणपणे फुल पूर्ण उमललं की मगच त्याचे रंग बदलायला
सुरुवात होते अर्थात जर ते बदलणार असतील तर, पण ही काही वेगळीच कमाल दिसत
होती. तीतुचं ज्ञान अचाट होतं खरं.

दिवस पसार होत गेले, गुलाबाची कलमं वाढून त्यांच्यावर एव्हाना फुलं आपली
अस्तित्व दाखवायला लागली, आणि थोडीथोडकी नव्हेत हं, एका झाडावर दहा-बारा
फुलं दिसायला लागलेली. नर्सरीत येणारा मग तो कुणीही असो आणि काहीही घ्यायला
आलेला असो एखादे तरी रोपटे नेल्याशिवाय रहात नव्हता. तितुची अफाट क्षमता,
आणि वाढत जाणारी रोपटी बघून मला नवीनच कल्पना सुचली. नर्सरीच्या मागच्या
बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मी गुलाबांची लहानशी शेतीच सुरू केली. आता
शेती करायची म्हटलं की रोपं लावण्याचे नियम, त्यातली अंतरं वगैरे तांत्रिक
बाबी आल्या, पण इथेही तीतुने मला न जुमानता दोन रोपातलं अंतर निम्म्याहून
जास्त कमी केलं त्यामुळे गुलाबही भरघोस यायला लागले.
आपण नेहमी पाहतो त्या तांत्रिकदृष्ट्या अचूक शेतीत आणि माझ्याकडच्या एका
गावंढळ माणसाने केलेल्या शेतीत फरक हे असायचेच. म्हणजे बघा माझ्याकडे
असलेल्या चौरस जागेत रोपं अशी लावलेयत की फक्त त्यांच्या बाजूने निघून
संपूर्ण रोपांभोवती फेरी मारता येईल इतकीच वाट आहे त्या वाटेला दोन्ही
समोरासमोरच्या बाजूच्या मधून निघणारी एक-एक वाट मिळते त्यामुळे त्या बागेचे
चार वाफे असल्यासारखी रचना झालीये. साहजिकच गुलाबांची रोपं वाढल्यावर तिथे
त्यांची चक्क झुडपं तयार झाली, आता मला सांगा, या इतक्या गर्दीत कुणी
घुसून झाडांवरचे गुलाब सहजासहजी काढू शकतो का ? पण तीतु तिथेही शिरत होता
पायांवर हातांवर गुलाबाच्या काट्यांचे ओरखडे मिरवत तो बेधडक त्यातून
वावरायचा. तीतु रोपं सांभाळायचा, फुलं काढायचा आणि आम्ही ती पॅकेजींग करून
मार्केटमध्ये पाठवायचो. सुरुवातीपासूनच आमच्या गुलाबांना मार्केटमध्ये
चांगला भाव मिळायला लागला. माझे सुखाचे दिवस जवळ येत होते.

दिवसेंदिवस बाजारात माझ्या गुलाबांची मागणी वाढत चाललेली, तीतू एकटा
अपुरा पडू नये म्हणून मी त्याच्या हाताखाली दोन माणसं अजून दिली वास्तविक
त्याने कधीही तक्रार केली नव्हती पण तरीही मी त्याची इतकी सोय पाहिली
त्यामागे अर्थात त्याच्या कलेचा तो एकटाच सूत्रधार असू नये हा एक छुपा हेतू
होताच, पण काही दिवसांतच माणसं त्याच्या सोबत काम करेनाशी झाली. त्याचं ते
निसर्गाच्या उलट रात्री जागून काम करणं त्यांना सोसलेलं दिसत नव्हतं.
आजारी असल्याचं कारण देऊन ते दोघे सतत सुट्या घ्यायला लागले शेवटी कंटाळून
मीच त्यांना काढून टाकलं. पुन्हा तितु एकटाच त्या बागेत खपायला लागला.

मधे किती दिवस, महीने गेले ते मला माहीत नाही पण एक दिवस ते घडलं खरं.......

झोप येत नव्हती म्हणून मी त्या रात्री सहज नर्सरीकडे जायला गाडी काढली (
हो, आता माझ्याकडे स्वतः:ची गाडी होती ) नर्सरीच्या आवारात काळोख दिसत
होता. बहुदा तितु आज रात्री आराम करत असावा, खरंतर मी इथूनच मागे फिरायला
हवं होतं पण सहज म्हणून मी गेट उघडून आत गेलो. रात्रीच्या शांत वेळेत
आजपर्यंत मला न दिसलेल्या माझ्या नर्सरीतल्या फुलांचं मनमोहक रूप दिसलं,
पांढऱ्या लिली नेहमी रात्री फुलतात आणि त्यांच्या फुलांच्या पाकळ्या इतक्या
सुंदररीत्या उलगडतात की त्यातलं सौंदर्य वर्णन करता येत नाही, एव्हाना लिली
उमलल्या होत्या आणि त्यांच्या त्या पांढर्‍या गर्दीत इतर रंगाची किंचित
कोमेजलेली फुलं अप्रतिम दिसत होती. या सौंदर्यसृष्टीत मी कितीवेळ हरवलो
होतो कोणजाणे पण नर्सरीच्या पाठीमागे मंदसा प्रकाश बघितल्यासारखा वाटला आणि
मी जरा सावध झालो. माझ्या बहुमूल्य गुलाबांच्या शेतीत कुणीतरी घुसखोरी
केल्याचा मला राग आला त्या भामट्याला पकडावं म्हणून मी पाऊलही न वाजवता
मागच्या गुलाबांच्या विभागाकडे गेलो.

सुरुवातीला मला समोर दिसलं त्याचा अर्थच कळला नाही पण कळला तेव्हा
चांगलाच धक्का बसला. समोर एका कोपर्‍यात केरोसिनच्या दिव्याच्या उजेडात
तीतु रोपांशी काहीतरी करत होता, त्याच्या आजूबाजूला कलम करण्यासाठी लागतात
तसली धारदार पाती, दोरे पट्ट्या वगैरे पसरलं होतं त्यातलं नक्की त्याच्या
हाताला काय लागलं असावं देव जाणे पण त्याचे दोन्ही हात रक्तानं माखलेले
होते आणि तरीही एकाग्रतेनं तो त्या रोपट्याशी काहीतरी करत होताच. सहसा आपण
जरासं रक्त आलं तरी हातातलं काम टाकून आधी उपचाराच्या धावपळीला लागतो पण हे
वेडं तसंच काम करत बसलेलं. न राहवून मी त्याला हाक मारली, आणि तो प्रचंड
दचकला इतका की त्यानं हातात घेतलेलं रोप खाली पडलं आणि त्याची माती इतस्ततः
पसरली. माझ्याकडे वळून पाहताना त्याच्या नजरेत संतापाचे भाव स्पष्ट वाचता
येत होते, कदाचित माझं असं अचानक येणं त्याला आवडलं नाही. माझ्याशी एक
अक्षरही न बोलता तो उठून सरळ त्याच्या त्या पत्र्याच्या झोपडीकडे निघून
गेला. वास्तविक त्याला थांबवून त्याच्या जखमेची चौकशी करून त्याला मलमपट्टी
करणं हे माझं कर्तव्य होतं पण त्याची मघाची ती जळजळीत नजर माझ्या काळजाचे
ठोके चुकवून गेली आता त्याच्या मागे जायची माझी हिंमत नव्हती. ‘काय असेल ते
सकाळी बघू’ असा विचार करून मी सरळ घर गाठलं.

सकाळी तीतु कदाचित कामावर येणार नाही असं वाटलेलं कारण तसाही तो सकाळी न
येता दुपारी केव्हातरी यायचा पण आज मात्र तो सकाळीच हजर होता. एरव्ही मी
त्याला हटकलं ही नसतं पण आज मला त्याच्या जखमेची काळजी लागलेली, मी त्याला
हाक मारली मात्र पुन्हा त्याने माझ्याकडे कालचाच संतप्त दृष्टिक्षेप टाकला
आणि पुन्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. खरंतरं लोकांच्या संतापलेल्या
नजरेची इतकी भिती कुणाला वाटत नाही पण तीतुच्या नजरेत काहीतरी वेगळेपण होतं
नक्की. दिवसभरात मी त्याच्या पाळतीवर राहून त्याच्या हाताच्या जखमेचा
अंदाज घ्यायचा प्रयत्न केला पण त्याच्या वागण्यात जखमी असल्याची कुठलीच खूण
मला जाणवली नाही शेवटी न राहवून मी त्याला कालच्या प्रसंगाबद्दल विचारलंच,
काहीही न बोलता त्यानं आपले दोन्ही तळवे माझ्यासमोर पसरले, त्यावर कसलीही
जखम मलातरी दिसली नाही मात्र त्याच्या चेहर्‍यावरचे संतप्त भाव आणि त्याची
जाळून काढणारी नजर मला सहन होईना, म्हणून कालच्या प्रकाराबद्दल काहीही न
विचारता मी बाजूला सरलो. दिवसभर मला एकच गोष्ट सतावत राहिली ती म्हणजे जर
तीतुच्या हाताला जर जखम नव्हती तर रात्री त्याचे हात रक्तानं भरलेले कसे
काय दिसले?

'तयारी पूर्ण झाली आता बाहेरच्या मोकळ्या हवेत जायची वेळ जवळ
आली आहे, संधी केव्हाही मिळेल तयार राहा' अधिरेपणाने केलेल्या कित्येक
हालचाली अंधार ढवळून काढत होत्या.

त्या दिवशीपासुन तीतुचं माझ्याबरोबरचं वागणं एकदम बदललं पूर्वी मी
गुलाबांच्या शेताकडे गेलो की तितु आपलं वेडसर हसू चेहर्‍यावर आणून माझ्या
समोर यायचा पण आता जर मी तिकडे फिरकलोच तर तो डोळ्यात अंगार आणून माझ्याकडे
बघत बसतो, मी तिथून निघेपर्यंत त्याची ती जळजळीत नजर माझ्यावरून हालत
नाही. त्यामुळे मी ही आजकाल तिकडे जाणं टाळतो. त्या दिवशीपासुन तितुचं
इतरांशी वागणंही खटकण्यासारखंच झालं, एरव्ही तो इतरांपासून अलिप्त असायचाच
पण इतरांना किमान त्रास देत नव्हता पण आताशा तो कुणालाच त्याच्या त्या
गुलाबांच्या रोपांकडे फिरकू देत नाही प्रसंगी शाररीक इजा करायलाही तो
मागेपुढे पाहत नाही. एकदा भर दुपारी गुलाबांच्या रोपासाठी गिर्‍हाईक आलं
म्हणून मी माझ्या दुसर्‍या एका माणसाला तिकडे पाठवलं तर त्याच्यावर तीतुनं
चक्क झाडांचं कटिंग करायच्या धारदार कात्रीनं हल्लाच चढवला तो बिचारा
कसाबसा आपला जीव वाचवत पळून आला.

एकेकाळी तीतुबद्दल मला सहानुभूती, दया वाटत होती पण आता मला त्याचा राग
यायला लागला. तीतुच्या वेडेपणात दिवसेंदिवस भर पडत चाललेली हल्ली तो कधी
कुणाला इजा करेल हे सांगता न येण्याइथपत बिथरला होता. तो का इतका बिथरला
याचं उत्तर शोधूनही मला सापडलं नाही कदाचित त्या रात्री मी त्याला हाक
मारली तेव्हाचं त्याचं दचकणं एखाद्या स्विच सारखं काम करून त्याच्यातल्या
वेडेपणाला जागृत करून गेलं असेल, पण त्याच आता इथे राहणं ठीक नव्हतं हे
खरं, पण माझं मनं मला टोचत होतं याच तीतुमुळे आज माझं आयुष्य जरा स्थिरावत
होतं आणि मी त्याला सहजपणे बाजूला काढावं ? माझ्या सरळ मनाला हे पटत
नव्हतं. अखेरीस मला मनावर दगड ठेवून त्याला परत त्याच्या जागी पाठवावं
लागलं. त्याचं असं झालं की बाजूच्या झोपडपट्टीत खेळणार्‍या एका लहानग्या
मुलानं नर्सरीच्या फ़ेंन्सींगमधून कसा काय तो प्रवेश मिळवला, आणि चुकून
म्हणा किंवा उत्सुकतेनं म्हणा तो त्या गुलाबांच्या शेतात डोकावला, कसं काय
देव जाणे!पण तीतुच्या ते नजरेत आलं आणि त्यानं सरळ हातातलं खुरपं त्या
पोरावर फेकलं. पोराचं नशीब चांगलं म्हणून खुरप्याचा वार त्याच्या दंडावर
पुसटसा झाला पण रक्त मात्र बरंच गेलं. त्या मुलांचं औषधपाणी मी केलं खरं,
पण आजूबाजूची माणसं मात्र या असल्या वेड्याला आपल्यात राहून द्यायला तयार
नव्हती.
शेवटी मी तीतुला त्याच्या मूळच्या जागी परत नेलं. तिथं त्याच्या
राहण्यासाठी एक लहानशी पण विटांची खोली बांधून दिली, गावात पैसे देऊन
त्याच्या अन्नाची सोय होईल असं पाहिलं आणि मी परतलो. मी परत निघताना मात्र
तीतु माझ्याकडे बघून हसला, हसला म्हणजे तेच त्याचं ते वेडसर हसू पण
इतक्यानंही मी मनाची समजूत घातली आणि परत माझ्या नर्सरीकडे आलो.

तीतुला घालवून दिला पण आता माझ्यासमोर एक गहन प्रश्न उभा राहिला माझ्या
इतक्या विस्तारलेल्या गुलाबवाटीकेचं काय? कोण आणि कशी सांभाळणार ती ? नवीन
कलमं कशी करणार ?
शेवटी माझ्याकडची दोन कुशल माणसं मी त्या कामाला लावली, अर्थात जुन्या
रोपांचा वापर करून नव्या रोपांवर पारंपरिक पद्धतीनं कलम करता आलं असतंच की.
त्या दोघांनी सुरुवात केली खरी पण बरेच हाल झाले बिचार्‍यांचे कारण तीतुनं
दाटीवाटीनं लावलेल्या झाडांच्या मधून जाताना त्यांचे चांगलेच तीक्ष्ण काटे
अगदी रक्त येईपर्यंत दोघांना लागले. हुळहुळणारी शरीरं सांभाळत दोघे बिचारे
काम करत राहिले.

जरा चमत्कारिकच म्हणावं लागेल असलं काहीतरी त्या दिवशी घडलं. दोघांपैकी
एक जण आजारी म्हणून त्या दिवशी आला नाही आणि आदल्या दिवशी आलेली गुलाबाच्या
रोपांची मोठी ऑर्डर पूर्ण करायची होती म्हणून दुसरा एकटाच उशीरापर्यंत काम
करत होता. करकरीत तिन्ही सांजा उलटल्यावर कशासाठीतरी म्हणून तो उठून जात
असेल तेव्हा घाईनं म्हणा किंवा आणखी कशानं त्याचा तोल गेला आणि तो सरळ त्या
गुलाबांच्या झाडांच्या फोफावलेल्या झाडीतच पडला, सहसा अशावेळी माणूस
काहीही करून उठतो आणि तिथून दूर व्हायचं बघतो पण हा मात्र तिथेच पडून
राहिलेला, किती वेळ? ते त्याचं त्यालाच माहीत, पण कशासाठीतरी मी मागे
गुलाबांच्या रोपांकडे गेलो तर मला तो दिसला. कसाबसा मी त्याला त्यातून
खेचून काढला, पण एव्हाना तो शुद्ध हरपून बसलेला. एक अपघात म्हणून मी ही
घटना दुर्लक्षित केली, पण काही दिवसांतच दुसराही कामगार असाच त्या
गुलाबांच्या काटेरी ताटव्यात पडलेला सापडला, तो ही भर दुपारी. नक्की काय
झालं हे त्याला काही केल्या आठवेना आता मला यात जरा संशयास्पद असं काहीतरी
वाटायला लागलं. शेवटी ही जबाबदारी मी स्वतः: स्वीकारली.

सुरुवातीपासूनच मी त्या झाडांच्या फार जवळ जाणं टाळलं, कलम करण्यासाठी
डोळा असलेल्या फांद्या काढायच्या म्हटलं तरी मी संपूर्ण बागेचा फेरा मारून
बाहेरुन सहजासहजी कापता येतील अशाच फांद्या निवडायचो. इतकी काळजी घेऊन
सुद्धा हाताला चारदोन काटे लागायचेच, सहसा गुलाबाचा काटा लागला तर सुई
टोचल्यासारखं थेंबभर रक्त येतं पण या झाडाचा काटा लागला की जखम झाल्यासारखं
भळभळ रक्त यायचं. निरखून पाहिल्यावर या काट्यांमधलं वेगळेपण लक्षात यायचं.
हे काटे एखाद्या लहानशा सुळ्याच्या आकाराचे दिसायला लागले होते निदान
गुलाबालातरी असले काटे नसतात. आताशा काट्यांनी भरलेली जाडसर फांदी बघितली
की माझ्या वागण्यात सावधपणा यायला लागला, त्यांना हाताळण्यासाठी मी खास
कातडी हातमोजे वापरायला सुरुवात केली. कितीही काळजी घेत असलो तरी मागच्या
घटनांच्या वेगळेपणामुळे म्हणा पण तिथे असताना मनाला स्वस्थता असायची नाही.
आताशा आणखी एक नवी गोष्ट माझ्या लक्षात आली वारा अजिबात नसताना ही गुलाबाची
रोपं डोलत असतात, अगदी सावकाशपणे पण निश्चित दिशेने, आणि ती दिशा म्हणजे
मी असलेली जागा, कल्पना करा अवाढव्य पसारा असलेल्या काटेरी जाळीसमोर तुम्ही
उभे आहात आणि त्या जाळीचे काटेरी हात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
करतायत विचारानंच अंगावर शहारा येतो की नाही ? कदाचित मागच्या दोन्ही वेळेस
माझ्या कामगारांच्या बाबतीतही असेच काही घडले असू शकेल. चुकून ते त्या
जाळीच्या जास्त जवळ असतील आणि मग एखादी काटेरी फांदी हळूच त्यांच्या
पायाला.........

बाजारात जाणार्‍या आमच्या गुलाबांची संख्या आता रोडावली होती. मागणी
अजूनही कमी झाली नव्हती पण मला त्या वळवळत्या काटेरी झुडपांमध्ये कुणाला
पाठवायची हिंमत होत नव्हती, खास त्यांच्यासाठी बनवून घेतलेल्या लांब
दांड्यांच्या कात्र्या वापरून आम्ही फुलांची तोडणी करत असू. या झाडांमध्ये
हा कृत्रिम जिवंतपणा का आला असावा? तितुने नक्की काय केलं ? प्रश्न अजूनही
सुटले नव्हते. तीतुला शोधायचा प्रयत्नही निष्फळ झालेला. माझ्याभोवती
घडणार्‍या घटनांचा वेगळेपणा मला आता चांगलाच जाणवायला लागला होता.
.... अशातच ती घटना घडली आणि मीच माझ्या गुलाबवाटीकेचा कर्दनकाळ झालो.
डोक्यात बरेच विचार घेऊन मी त्या दिवशी बेडवर पडलो होतो. विचारांच्या भरात
मला झोप कधी लागली ते कळलंच नाही. मध्यरात्री केव्हातरी मला ते स्वप्न पडलं
असलं पाहिजे, स्वप्नंच म्हणायचं त्याला कारण मी माझ्या गुलाबांच्या शेतात
मध्यभागी होतो आणि चारही बाजूने गुलाबांच्या लांब-लांब काटेरी फांद्या
माझ्याकडे झेपावत होत्या, पाहता पाहता त्यांनी आपले काटेरी पाश माझ्यावर
टाकले आणि .. आणि त्या वेदनेनं मी जागा झालो. अंगात शेकडो सुया शिरल्याची
वेदना मला सहन होत नव्हती अंगावर उमटलेल्या रक्तरंजित व्रणांतुन
ठिबकणार्‍या रक्ताच्या थेंबांकडे पाहताना मला जाणवलं, मी खरंच स्वप्नात
होतो ? जर स्वप्नात होतो तर माझ्या अंगातून तरारून आलेल्या रक्ताच्या
थेंबांच काय? धडधडत्या काळजानं कशीबशी रात्र घालवली.

सकाळी नर्सरीत पोहोचल्यावर सर्वात आधी जे काही केलं असेल ते म्हणजे
माझ्या स्वतःच्या हातानं मी त्या गुलाबांच्या झाडांवर कुदळ चालवली एक एक
झाड मुळापासून उखडून काढायचं होतं मला. एक वाफा जमीनदोस्त केल्यावर माझा
राग आणि शक्ती थोडी कमी झाली आणि मी थोडावेळ थांबलो. मघाशी रागाच्या भरात
उपटून टाकलेल्या त्या झाडांच्या अस्ताव्यस्त पसार्‍याकडे पाहत बसलो.
त्याच्यावरचे गोंडस दिसणारे गुलाबकळे, त्यांची कळपट हिरवी पानं, शार्कच्या
सुळ्यांसारखे ओळीनं असलेले ते अणुकुचीदार काटे, त्यांची लालसर मुळं ...?
लालसर ..?
नक्कीच काही तरी चुकत होतं झाडाची आणि तीही गुलाबाच्या झाडाची मुळं लालसर ?
तशी तर असायलाच नकोत. मी त्या पसार्‍याकडे आता काळजीपूर्वक पाहायला लागलो,
खरंच त्या झाडांची मुळं लालसर दिसत होती.
फटाफट डोक्यात संदर्भ लागत गेले ती लालसर मुळं, त्या रात्री पाहिलेले
तीतुचे रक्ताने भरलेले हात, त्याचं ते बिथरणं आणि इथेच याच मातीवर होत
असलेला रक्तपात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फ़िक्कट गुलाबांचा दिवसेंदिवस
बदलून लालभडक होत जाणारा रंग याचा अर्थ एकच निघत होता कोणत्या ना कोणत्या
प्रकारे तीतु त्या झाडांना रक्ताचं सिंचन करत होता ( त्यासाठी तो कोणते
मार्ग वापरत होता ते त्यालाच माहीत ) आणि त्यामुळेच त्या झाडावरची फुलं
इतकी लालभडक दिसायची. तितु तिथून गेल्यावर मग आपली तहान ती झाडं जवळपास
येणर्‍याला जखमी करून भागवायला लागली.

अरे देवा ! हे काय घडून बसलं माझ्या हातून? ही असली रक्तपिपासू झुडपं मी
माझ्या जागेत रुजवली ? आजवर फार काही भयानक असं घडलं नाहीये पण
तरीही...... मनाशी ठाम निश्चय करून मी माझ्या गाडीकडे वळलो. गाडीत किमान
एवढी गुलाब वाटिका संपवण्या इतपत पेट्रोल नक्की असणार..

समोर उसळणार्‍या आगीच्या डोंबाकडे पाहत मी मनातल्या मनात निःश्वास
सोडला. एका येऊ घातलेल्या भयंकर पर्वाची मी वेळेआधीच अखेर केलेली होती.
ज्वालेचा एक लवलवता हात माझ्या दिशेला झेपावला आणि माझ्या मेंदूत हजारो
वॅटचे दिवे लागले. मी माझ्याकडे असलेल्या या रक्तपिपासू झुडपांचा नाश केलाय
पण ती सर्वस्वी नाहीशी झाली .....? माझ्याकडून आवडली म्हणून घरी घेऊन
गेलेल्या त्या शेकडो लोकांचं काय ? ते सुरक्षित आहेत ? त्यापैकी कुठेतरी
कधीतरी चुकून जर यातल्या एखाद्या झाडाचं कलम दुसर्‍या झाडावर झालं असेल तर ?

लोकहो, जर तुमच्या नजरेत जर एखादं गुलाबाचं असं रोप असेल की ज्याने
आपल्या काट्याने घायाळ करून कुणाचं रक्त काढलं असेल तर या समस्त
मानवजातीसाठी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे ताबडतोब ते रोप नष्ट करा.....
न जाणो त्याचे कितीतरी साथीदार आज तुमच्याच रक्तासाठी तहानलेले असतील.

*******

" डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेशंट नं १०६ च्या रूम मधे
कागद ठेवले होते. त्यावर त्याने हे पहा काहीतरी विचित्र लिहिलेय " येरवडा
मेंटल हॉस्पिटलचा तो वॉर्डबॉय सांगत होता.
" ठेव त्या टेबलावर "
" डॉक्टर, तुम्ही का इतके त्या वेड्याची काळजी घेताय? त्यानं तर त्याची
आख्खी नर्सरी पेटवून दिली, कोवळ्या फुलांवर असा अत्याचार ? हा माणूस एकदम
कामातून गेलेला दिसतोय" डॉ. नाईक विचारते झाले.
डॉक्टर मुजुमदारांनी यावर किंचित मान हालवल्या सारखं केलं आणि त्या वॉर्डबॉयला जायची खूण केली आणि पुन्हा आपल्या विचारात गढून गेले.
डॉक्टर मुजुमदार, गेल्या काही दिवसातच बदली डॉक्टर म्हणून इथे आले होते.
सडसडीत अंगकाठी, नेटकी वाढवून ट्रीम केलेली दाढी, करारी चमकदार नजर आणि
भरदार व्यक्तिमत्त्व असा हा माणूस. त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वात एक
उणीव मात्र कायम राहून गेलेली दिसत होती त्यांच्या डाव्या गालावर पंजा
मारल्यासारखे दिसणारे ते तीन समांतर व्रण..

जगाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले होते..!!