आता खरी कळाली गोडी मला फळांची!
आयुष्य आज वाटे परडी जणू फुलांची!!
येते झुळूक जेव्हा जेव्हा तुझ्या स्मृतींची;
माझ्या उरात होते बरसात चांदण्यांची!
आलेख जिंदगीचा माझ्या कसा चितारू?
माझ्या समोर आहे यादी जणू चुकांची!
सुखही दिपून गेले, पाहून दु:ख त्यांचे....
इतकी झकास होती आरास आसवांची!
तू भीडभाड आता ठेवू नकोस माझी;
आली मला शिसारी माझ्याच कौतुकांची!
करशील तूच तुजला घायाळ बोलण्याने....
काढू नकोस खपली इतक्यात वेदनांची!
कल्लोळ शांततेचा घुमतो दहा दिशांना!
शहरात माणसांच्या गर्दी कलेवरांची!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१