अमर दीप देव आनंद

अमर दीप देव आनंद

मागच्याच महिन्यात लता मंगेशकर यांचा वाढदिवस साजरा झाला(२८ सप्टेंबर) आणि वर्तमानपत्रात त्यांच्या बद्दल रकाने भरभरून माहिती छापून आली. त्याच्या फक्त दोन दिवस अगोदर म्हणजे २६ सप्टेंबर रोजी सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा वाढदिवस होता परंतु देवची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. लता यांच्या स्वराला तोड नाहीच. जागतिक पातळीवर नावाजलेल्या गायिका आहेत त्या.  परंतु देवने पण अभिनय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे यात शंका नसावी.

हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिला अँटी हीरो अथवा अँग्री यंग मॅन कोण असं  विचारलं तर तुम्ही अमिताभ बच्चन याचं नाव घ्याल यात दुमत नाही.   पण नायक म्हणजे साधन शुचिता असणारा आणि सभ्य माणूस या प्रतिमेला तडा दिला तो देवने. त्यानेच अँटी हीरोची ट्रेण्ड सुरू केली. बाजी चित्रपटातला मदन आठवा. आजारी बहिणीसाठी अट्टल  जुगारी बनलेला देव. हाऊस नंबर ४४ मधला अशोक म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांचा नायक आणि अट्टल गुन्हेगार. टॅक्सी ड्रायव्हर मधला मंगल गुन्हा करण्यासाठी स्वतःची गाडी वापरू देणारा इसम. काला बाजार मधला रघुवीर. सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणारा आणि सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणारा देव. शरीफ बदमाश.  " ये रात ये चांदनी फिर कहां " असं म्हणत मारियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा आणि नंतर तिच्याशी सतत खोटं बोलणारा जाल मधला टोनी. संपूर्ण व्यक्तिरेखा खलनायकाची. गाईड मध्ये पण साधू बने पर्यंत तो खलनायकच आहे. बंबई का बाबू  मधील पहिला बाबू आणि नंतर एका निष्पाप कुटुंबाला फसवण्यासाठी कुंदन बनलेला देव. ही व्यक्तिरेखा देवने फार ताकदीने रंगवली आहे. नैतिक अधःपतन झालेले, समाजाने न स्वीकारलेले आणि वाळीत टाकलेले अशी पात्रे देवने खुबीने उभी केली.  अमिताभची जंजीर मधली अँग्री यंग मॅन ची भूमिका अगोदर  देव आनंदलाच  दिली होती यातच सारं काही आलं.

देव अभिनेता नाही, दिलीपकुमार खरा अभिनेता अशीच धारणा होती कारण दिलीप ट्रॅजेडी किंग होता.  ट्रॅजेडी सीन्स जो वठवेल तो खरा अभिनेता असा समज होता आणि देवला ट्रॅजेडी सीन्स जमत नाहीत अशी टीका देववर  होत असे. पण तो केवळ गैरसमज होता. बंबई का बाबू चित्रपटात  नायिकेचा भाऊ बनावं लागतं पण तिच्या  प्रेमात पडल्याची  भावना तिच्यापर्यंत पोहोचवताना झालेली तगमग देवने अशी व्यक्त केली आहे की तसं दिलीपकुमारला ही जमलं नसतं. शेवटचाच सीन पहा. सुचित्रा सेन पालखीत बसून वरातीबरोबर सासरी जायला निघते तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरची जीवघेणी  ओढाताण बघताना  देवला   ट्रॅजेडी व्यक्त करता येत नाही असं म्हणणारे त्याची तुलना दिलीपकुमारशीच  करतील.   'तेरे मेरे सपने' मधला डॉक्टर आनंद.  डॉक्टर होताना जे आदर्श पाळायचे असे ठरवले  ते आदर्श  वास्तविक जीवनात पाळणे कठीण होऊन बसल्यावर होणारी दोलायमान अवस्था देवने अत्यंत परिणामकारकरित्या दाखवली आहे . हम दोनो मधे देव नंदाला सांगू शकत नसतो की तो मेजर वर्मा नाही  आणि साधनाला समजावू शकत नाही की तो नंदाकडे का जात असतो तेंव्हा त्याची होणारी कुचंबणा त्यानं काय ताकदीनं उभी केली आहे. मेजर वर्मा आणि कॅप्टन आनंद ह्या दोन भूमिका त्याच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरतात. अशी दुहेरी भूमिका केवळ देवच करू जाणे. मेजर वर्माची देहबोली तर भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आठवण यावी अशी आहे. गाईड हा संपूर्ण चित्रपटच ट्रॅजेडी आहे

देवच्या यशात गाण्याचा वाटा खूप मोठा आहे. पण गाणं म्हणताना जो मुद्राभिनय करावा लागतो त्यात देव आनंदला तोड नाही. 
अभिनेते जेव्हा पडद्यावर गाणे गातात तेव्हा  पार्श्वगायकाच्या गायकीनुसार ओठांची हालचाल करतात, त्याला इंग्रजीत लिपसिंकिंग  असे म्हणतात. गाण्याबरहुकूम ओठांची हालचाल  आणि चेहऱ्यावर उमटणारे भाव यात अभिनेत्याचा कस लागतो. गायकाचा आवाज टीपेला जातो तेव्हा साहजिकच कपाळावर आठ्या उमटल्या पाहिजेत पण हिंदी सिनेमातील पट्टीचे अभिनेते  म्हणजे राज कपूर आणि दिलीप कुमारही ह्या छोटयाशा गोष्टीकडे कानाडोळा करीत असत. त्यामुळे मोहम्मद रफी साहेब ,कोणता अभिनेता आहे हे पाहून त्याच्या अभिनयाच्या जातकुळीनुसार पार्श्वगायन करीत असत.  हिंदी सिनेमातील काही ठोकळाछाप अभिनेते तर संगीताच्या आणि रफी साहेबांच्या आवाजाने  तारले गेले.उदा.बैजू बावरा आणि ताजमहल हे चित्रपट आणि त्यातील अभिनेते.
 लीपसिंकिंग आणि चेहऱ्यावरचा हावभाव हुबेहूब करण्यात देवचा फार वरचा क्रमांक आहे. गाणं कळणाऱ्या मोजक्या अभिनेत्यापैकी  तो एक होता .गाण्यातल्या शब्दांनुसार खांदे, हात, पाय यांच्या हालचाली आणि  त्याही लयीत  व्हायला हवेत  हे कसब त्याच्याकडे होते ,म्हणूनच किशोरकुमार, मोहम्मद रफी,तलत मेहमूद,हेमंत कुमार आणि मन्ना डे यांचा आवाजही त्याला चपखल बसत असे.
 देवचा  जाँनी मेरा नाम हा चित्रपट उदाहरणादाखल पाहा. या चित्रपटातील " पलभरके लिए"  हे गाणे म्हणजे लीपसिंकिंग, चेहरा आणि शारीर अभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे . यातली एक जागा " सुन सुन कर तेरी नही नही अपनी निकल जाए"  यात नहीsss नहीsssss म्हणताना उचललेलं शरीर, जाँsss म्हणताना एकदम खाली येतं आणि "अपनी निकल जाए…" च्यावेळी हसतांना त्याच्या दातातील फट दिसते तेव्हा हेमा मालिनीच्या बरोबर आपलीही जान जाते. " माना तू सारे हसीनों मे हसीं है, अपनी भी सूरत बुरी तो नहीं हैं' असं म्हणताना  " ए तू असशील ड्रीम गर्ल, उगीचच नखरे करू नकोस" अशी हेमा मालिनीला देवच सुनवू शकतो. माया चित्रपटातील तस्वीर तेरी दिलमे हे गाणं पहा. मुद्राभिनयाचा उत्कृष्ट नमूना आहे.

संवादफेक करण्यात देवची हातोटी विलक्षण होती. त्याच्या बोलण्याची लकब वेगळया पद्धतीची असायची पण त्यामुळे व्यक्तिरेखेला वेगळाच उठाव मिळत असे. 'तेरे मेरे सपने' मधला डॉक्टर देव डॉक्टर जगन्नाथ कोठारीला त्याच्या नशेबद्दल जाब विचारताना म्हणतो "मेरे लिये अभी ये जान लेना बहुत जरूरी है...ठर्रे की ये बदबूदार बोतल देखता हूं तो एम.आर.सी.ओ.जी. लंडन, समझमें नहीं आता". (एम.आर.सी.ओ.जी. मधलं प्रत्येक अक्षर एकदा देवच्या शैलीत म्हणून बघा).  जॉनी बुरा काम तो करता है लेकिन इमानदारी के साथ, तुम्हारे लिए चांद बेच सकता हूं, इमान नही, जॉनी मेरा नाम। ज्वेल थीफ पाहिलात का? तनुजाच्या वडिलांच्या दुकानात तनुजाला दागिने विकतांना देवची सेल्समन शिप बघा,  बालियोंके बगैर कान कितने सुने सुने लगते हैं, ऐसा हार पेश करता हूं कि आपके गले से लगकर हार नहीं जीत लगेगी, इस मखमलसे गोरे गलेमे सच्चे मोतियोंका सफेद हार ऐसा लगता है जैसे चांदनी से धुले हुए आसमान में आकाशगंगा लहरा रही हैं, मालूम होता है दूध की झील है और सोनेकी पत्तोमे लाल कमल खिले है, झिलमिलाती हुई किरने आपके गलेसे लिपट गई है, असं म्हणताना असं वाटतं की पु ना गाडगीळच्या दुकानात देव आनंद सेल्समन असता तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सोन्या चांदीच्या दुकानांचे दिवाळे वाजले असते. इन्फोसिस कंपनीच्या सुधा मूर्ती यांचा आवडता सिनेमा म्हणजे ज्वेल थीफ.


नायक आणि नायिका प्रणयाराधन करतात तेंव्हा नायक म्हणून प्रणयाचा अभिनय कसा करावा याचा क्लास देवकडे लावायला हवा. उगीच मिठ्या मारणे किंवा हिसका देणे किंवा पावसात लोळणे असा प्रकार देवने कधीच केला नाही. काला बाजार मधलं " रिमझिम के तराने लेके " गाणं आठवा. एकाच छत्रीत पण तो योग्य अंतर राखून चालला आहे. उगीच अंगाशी झोंबाझोंबी नाही. कुतुबमिनार मधून वरून खाली येताना नूतनला " दिलका भंवर करे पुकार, प्यारका राग सूनो " असं सांगताना त्याचं प्रणयाराधन पहा तेरे घरके सामने या चित्रपटात. पेईंग गेस्ट मध्ये नूतन च्या डोळ्यांना तो " ओ निगाहे मस्ताना"  असं म्हणतो आणि नौ दो ग्यारह मध्ये कल्पना कार्तिक "आंखोंमें क्या जी"  विचारते   तेंव्हा  तो "रुपहला बादल"  म्हणतो. ओ  लडकी आंख मारे असं म्हणण्याइतक्या खालच्या दर्जाला जाण्याची देवची जातकुळीच नाही. शिवाय कल्पना कार्तिक तर त्याची बायकोच. तो तिचा पदर ओढू शकला असता, झोंबला ही असता पण तो अतिशय सभ्य कलाकार होता याबद्दल त्याच्या झाडून सगळ्या नायिकांचं एकमत आहे, तो रोमँटिक नायक होता तरीही.

हे झालं देवच्या अभिनयाबद्दल पण तो माणूस म्हणून कसा होता याबद्दल त्याच्या सहकाऱ्यांनी म्हंटलय की  कुणाचा राग धरणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. रॉयल्टीच्या संदर्भात रफिसाहेब आणि लता यांच्यात झालेले मतभेद सर्वश्रुत आहेच. मोहम्मद रफी साहेब जेंव्हा उषा टिमोथी, कमल बारोट, मुबारक बेगम, शारदा राजन आणि सुमन कल्याणपूर यांच्या सोबत गात असत त्या संगीत दिग्दर्शकाकडे लताबाई  गात नसत. अशा तऱ्हेने  लता मंगेशकर यांनी बऱ्याच गायिकेंची कारकीर्द संपवली. एका संगीत महोत्सवात लताबाई थकून विंगेत विश्रांती घेत असताना कार्यक्रम चालू ठेवावा या उद्देशाने एका लहान मुलाला आयोजकांनी संधी दिली. त्या मुलाला टाळ्या मिळाल्या आणि वन्स मोअर मिळत गेले ते लताबाईना जड गेलं. त्या मुलाला त्यांनी तिथून जायला सांगितलं. हा मुलगा पुढे हरिहरन या नावाने प्रसिद्ध झाला.   देवने मात्र अनेक नवोदित नायिकांना  नाव आणि कीर्ती मिळवून दिली. मुमताज सारखी बी ग्रेड   नायिका तेरे मेरे सपने मध्ये देवने निवडली आणि मग तिचा प्रवास ए ग्रेड कडे लवकर सुरू झाला. त्याच प्रमाणे लोकांना न अाठवणाऱ्य नटांना पुन्हा पडद्यावर आणून नवसंजीवनी प्राप्त करुन दिली. प्रेमनाथकडे 'जॉनी मेरा नाम' नंतर पुन्हा खलनायकी भूमिकांसाठी निर्माते त्याचे उंबरे झिजवू लागले. मधुबाला चित्रपटात काम करु लागली तेव्हा तिला इंग्रजीची भीती वाटायची. देवने तिला मार्गदर्शन केलं.  त्याचं इंग्लिश, हिंदी, आणि उर्दू यांवर अस्सल पकड होती. शत्रुघ्न सिन्हा याला प्रेम पुजारी मध्ये महत्त्वाची भूमिका दिली आणि त्यानंतर गॅम्बलर मध्ये. शत्रुघ्न सिन्हाची कारकीर्द त्यानंतर बहरत गेली.

पन्नासच्या दशकात देव जेंव्हा चित्रपटसृष्टीत अबकड शिकत  होता, तेंव्हा एका इंग्रजी नियतकालिकात त्याच्याविषयी एक वाक्य होतं "आजपासून पाच दहा वर्षांनंतर कोण हा  देव आनंद असं म्हणावं लागेल, तो कोणाला आठवणारही नाही"  देव मात्र आनंद वाटायला कायमचा उभा राहिला आणि अमर दीप झाला.