आसवांची देणगी



अश्रु
अश्रु निर्माण करताना निसर्गाला तरी समजले असेल का?
किती महत्त्वाची भेट देतोय तो मानवाला!!
अश्रु--एक अनमोल भेट.
काय सांगत नाहीत हे अश्रु?
किती रुपं, किती प्रसंग आणि किती अर्थ!

साश्रु नयंनापासुन तर कोसळणाऱ्या बांधापर्यंत
अश्रुच खरे सोबती असतात
काही एकट्या.... अगदी एकट्या समयी
गर्दी असते अवती भवती माणसांचीपण...
सोबती नसतो कुणीच
अशावेळी अश्रु सोबत करतात
अलगद तरळुन डोळ्यात किंवा ओघळतात अबोलपणे गालांवरुन
आणि सांगतात-आम्ही आहोत ना!!
ऐकुन घेतात शांतपणेआपली सारी व्यथा आणि पोकळ समजुतींच्या शब्दांचा मुलामा द्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
देतात फक्त सोबत तीच तर हवे असते नाहीतरी त्या क्षणी सर्वांत जास्त!
मनात दाटलेल सारं मळभ दुर करतात
गच्च आभाळासारखं मन, रितं करतात
हलकं करतात आपल्याला.
होतात आपले दुत कधी, आपली भावना पोहचवायला.
शब्द फुटतच नाही तोंडातुन
किंवा बोलु शकत नसतो आपण..
काही कारणाने.

असाच तरळलेला एक अश्रु डोळ्यातला
सांगतो आपल्या माणसाला आणि तेही फक्त आपल्याच माणसाला
आपल्या मनीचे भाव.

रुतलेला एखादा वाग्बाण किंवा खोचक बोलणी
कधी मुक क्रुतज्ञता तर कधी अपार आनंद, ओथंबलेलं प्रेम
किती भावनांची पोच देतो आपला एकच अश्रु!
ओघळतो अचानक कधीतरी नको असताना सुद्धा..
पण......तीही गरजचं असते, त्या क्षणी.

काही करणाने मिटुन गेलेली व्यक्ती जेंव्हा दुरावते अश्रुंना,
प्रयत्न करतो आपण, अश्रु यावेत म्हणुन
त्या व्यक्तीला मोकळं करण्यासाठी साचलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी.
अश्रु हे सोबती!
अश्रु ही देणगी!