गेल्या पावसाळ्यातील पावसाच्या रौद्र-भीषण तांडवामुळे पावसातली गंमत,रोमांच व
मजा हरवून गेली आहे व केवळ कटु आठवणी उरल्या आहेत की काय असे वाटते आहे.गेला पावसाळा 'एक वाईट स्वप्न' म्हणून विसरून जाऊ व येण्याऱ्या पावसाचे स्वागत करण्यास सिध्द होऊ या!
मराठी साहित्यात पावसाची काही वर्णने माझ्या वाचनात आली आहेत.त्यापैकी (खाली दिलेले) व्यंकटेश माडगूळकरांच्या 'बनगरवाडी'तील पावसाचे वर्णन हे वाचावे असे आहे. या वर्णनाचा बाज, भाषा,खेड्यातले वातावरण अस्सल मराठी मातीतले आहे. इतर 'मनोगतीं'नींही अशी पावसाची वर्णने आढळल्यास जरूर 'मनोगत'वर द्यावीत.
'बनगरवाडी'तला पाऊस !
"मे महिना संपला आणि जून आला. उन्हाळा संपला व पावसाळा आला. इंद्रगोप दिसू लागले आणि मृग निघाला. आभाळ झाकोळून आले. स्वच्छ उन्ह नाहीसे झाले.वारा सुटला. झाडेझुडे गदगदू लागली. धूळमाती चौफेर उडू लागली. आभाळाकडे पाहून लोक म्हणू लागले,"वारा पाउस घालवील'. प्ण तसे झाले नाही.
सडासडा धारा आल्या.मृगाचा पाऊस बनगरवाडीला झोडपत राहीला. भटकी कुत्री
भिंतीच्या आडोशाला उभी राहीली. लवकर उघडीप होण्याचे दिसेना. धनगराची धावाधव झाली.डोक्यावर रिकामे पोते घेऊन त्यांनी वाड्यात भिजणारी मेंढरे काढून झोपड्यात आणली.घरात दाटीवाटीने उभ्या राहिल्या राहिल्या मेंढरांनी अंगे झाडली. भिजल्या लोकरीच्या वासाने धनगराची घरे दरवळली. सरीवर सरी आल्या. तापअलेल्या जमिनीतून वाफा निघाल्या. धूळ उडाली. चिखल झाला आनि मग तोही वाहून गेला. खडे उघडे पडले.
काडाने शाकारलेली घरे गळू लागली. सुरेख सावरलेली जमीन ठिकठिकाणी ओली होऊन उखणू लागली, तेंव्हा धनगरणी चरफडल्या आणि गळणाऱ्या जागी त्यांनी लहानमोठी भांडी ठेऊन दिली.मेंढराच्या धडापडीतूनही भरलेल्या भांड्यात ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज कान किटवू लागला. धाब्याच्या घरातून गळू लागले. तेंव्हा डोक्यावर रिकामे पोते घेऊन धनगर माळवदावर चढले. जिथे पाणी साचले होते, माळवदाला भोक पाडून आत शिरत होते, ती भोके त्यांनी दगडमाती घालून तात्पुरती बुजवली.
हवे मध्ये गारवा आला.धनगरांच्या कुऱ्हाडींवर गंज धरू लागला आणि धनगरणींनी साठवून ठेवलेले मीठ पाझरू लागले.
पोपटी रंगाच्या गवताने जमिनीतून डोकी वर काढली. अंगणात, माळवदावर, छपरावर,- जिथे उगवू नये तिथे गवत उगवू लागले. सर्वत्र झगझगीत पोपटी रंग दिसू लागला...
नांग़रून पडलेल्या जमिनीतील ढेकळे विरघळली. जमिनींनी पाणी पिऊन घेतले...
माळरान भिजले आणि हिरव्यागार माळावर काळीभोर मेंढरे हिंडू लागली आणि त्यांच्या पाठीवर बसून काळे कोतवालपक्षी घोगरा आवाज काढू लागले. कुणाच्याही दृष्टीस न पडण्याची खबरदारी घेऊन चित्तर उंच स्वरात ओरडू लागले.
(जयन्ता५२)