ह्याआधी
सुखदुःख कां ? लक्ष्मण गुह संवाद
सुखं वा यदि वा दुःखं स्वकर्मवशगो भवेत् ।
यद्यद्यथागतं तत्तद् भुक्त्वा स्वस्थमना भवेत् ॥ ८ ॥
न भोगागमे वाञ्छा न मे भोगविवर्जने ।
आगच्छत्वथ मागच्छत्वभोगवशगो भवेत् ॥ ९ ॥
मनुष्य स्वकर्म अधीन असल्यामुळे जसजशी सुखद वा दुःखद परिस्थिती प्राप्त होईल तसे तसे भोग भोगून सर्वदा प्रसन्नचित्त राहावे (easier said than done) आणि पुढील श्लोकात सांगितले तशी वृत्ति ठेवावी. सुख देणारे भोग भोगावेत अशीही मला इच्छा नाही, वा दुःखी करणारे भोग त्यागावेत असेही मला वाटत नाही. ते मला मिळोत वा न मिळोत, मी भोगाच्या अधीन राहणार नाही. म्हणजे कसे ? मी सुखात हुरळून जाणार नाही आणि असेच सर्वदा सुखी असावे अशी आसक्ति बाळगणार नाही, तसेच दुःख भोगत असतांना क्रोध, संताप, स्वतःची करुणा, चरफडाट, दुसर्यांना दोष देणे वगैरे करून विषण्ण होणार नाही.
यस्मिन् देशे च काले च यस्माद्वा येन केन वा ।
कृतं शुभाशुभं कर्म भोज्यं तत्तत्र नान्यथा ॥ १० ॥
अलं हर्षविषादाभ्यां शुभाशुभफलोदये ।
विधात्रा विहितं यद्यत्तदलङ्घ्यं सुरासुरैः ॥ ११ ॥
विधात्याने जिवासाठी नियमच करून ठेवला आहे की, ज्या स्थळी, ज्या काळी, ज्यामुळे किंवा ज्या योगाने ज्या कोणी शुभ-अशुभ कर्म केले असेल त्याला तशाच रीतीने व तशाच प्रकारचे फळ भोगावे लागते. आणि ब्रह्मदेवाने जे कांही ठरविले आहे, ते देवांना व दैत्यांनाही चुकविण्याचे सामर्थ्य नाही, मग बापडा मनुष्य तो काय ? म्हणून शुभ वा अशुभ कसेंही फल प्राप्त झाले तरी त्याबद्दल हर्ष किंवा विषाद करू नये.
सर्वदा सुखदुःखाभ्यां नरः प्रत्यवरुध्यते ।
शरीरं पुण्यपापाभ्यामुत्पन्नं सुखदुःखवत् ॥ १२ ॥
सुखस्यानंतरं दुःखं दुःखस्यानंतरं सुखम् ।
द्वयमेतद्धि जन्तूनामलङ्घ्यं दिनरात्रिवत् ॥ १३ ॥
सुखमध्ये स्थितं दुःखं दुःखमध्ये स्थितं सुखम् ।
द्वयमन्योन्यसंयुक्तं प्रोच्यते जलपङ्कवत् ॥ १४ ॥
मनुष्य नेहमी सुख आणि दुःख यांनी घेरलेलाच असतो, कारण मनुष्य शरीरच मुळी पाप आणि पुण्य ह्यापासून उत्पन्न झालेले असल्यामुळें त्याला सुख-दुःखे ही जडलेलीच असतात. दिवस आणि रात्र जसे एकामागून येतात तसे सुखामागून दुःख आणि परत सुख असे येतच असतात. ही सुखदुःखे एकमेकाला अशी चिकटलेली आहेत, जसे पाण्याचिखलाचा संबंध आहे तसे. म्हणून -
तस्माद्धैर्येण विद्वांस इष्टानिष्टोपपत्तिषु ।
न हृष्यन्ति न मुह्यन्ति सर्वं मायेति भावनात् ॥ १५ ॥
विवेकी लोक अनुकूल अथवा प्रतिकूल अशा कोणत्याही प्रसंगांत आनंदी होत नाहीत वा शोकही करीत नाहीत, तर ते हा सर्व मायेचा खेळ आहे असे जाणून प्राप्त परिस्थितीत धैर्याने वागतात.
आतापर्यंत गीतेतून, उपनिषदांतून व इतर धर्म ग्रंथांतूल वरील 9 व 15 श्लोकात जो उपदेश आला आहे तशाच प्रकारे सुख-दुःख, पाप-पुण्य ह्यांतून निवृत्त होण्याचे मार्ग दाखवलेले दिसतात. भग. गीतेतील एक दोनच उदाहरणे देतो. "योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा " (2.48) - समबुद्धि ठेवून कर्मे करीत जा. "न प्रहृष्येत्प्रियं प्राप्यं, न उद्विजेत् प्राप्य च अप्रियम् " (5.29) - प्रिय वस्तु प्राप्त झाली असतां हर्ष नको आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असतां विशाद नको. अशा अर्थाचे अक्षरशः शेकडो श्लोक देता येतील. पण हे कसे करायचे. ह्यातून मुक्त होण्यासाठी सर्वत्र जप-तप करण्यास सांगितलेले आहे. पण जप-तप केल्याने पाप-पुण्यातून मुक्ति कशी साधते ह्याचे विवरण फार क्वचित ठिकाणी दिसते. ते जाणायचे म्हणजे अनुभवलेल्या गोष्टी स्मृतिमध्ये कशा प्रकारे नोंदविल्या जातात, ह्या जगतात आपण प्रत्येक बाबतीत ज्या कशा प्रकारे react होतो ते तसे कां करतो , विषयांमध्ये आसक्त असलेले मन विषयात कशामुळे रमते, त्याचा अंतर्मनाशी (subconscious) काही संबंध आहे का, अंतर्मनात अजून काय दडलेले आहे, वर (बहिर्मनांत) आपण ठरवतो एक व त्याप्रमाणे प्रयत्नशीलही असतो, पण बर्याच वेळेला त्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. मग स्मृतिमध्ये (आपल्या hard disk मध्ये) व आपल्या अंतर्मनामध्ये काही वेगळेच असते का ? हे सर्व तपासायचे म्हणजे अभ्यासाचा तो एक वेगळा विषय आहे. त्याला कमीतकमी तीन ते चार भाग देखील लागतील. तूर्त सुख-दुःखाच्या फेर्यातून सुटायचे, म्हणजेच ' पुनरपि मरणं पुनरपि जननं ' ह्या तून मुक्त व्हायचे (असे वाटत असेल) तर शास्त्रात काय सांगितले आहे तेव्हढेच पाहणे हिताचे होईल.
एक मुख्य (आणि एकमेव) उपाय सांगितलेला दिसतो तो म्हणजे " त्याग / वैराग्य /विरक्ति ". कशापासून ? संसारापासून ? नाही, सर्वसंगपरित्याग म्हणजे संसारचा त्याग नव्हे, तर कामक्रोधादिकांचा त्याग करणे. क्रोधाचे दुष्परिणाम वा त्यामुळे साधनेत होणारे अडथळे हे काही सांगायची गोष्ट नव्हे. प्रत्येकाला ते पदोपदी दिसते, जाणवतेही. त्याच्यावर मात करायचे कितीतरी उपाय श्री भोमेकाकांनी मनोगतावर दिले आहेतच. आता राहिला " काम ". हा तर क्रोधापेक्षाही दारुण शत्रू आहे. "काम एष क्रोध एष महापाप्मा, विद्धि एनम् वैरिणम् " (गीता 3.37). काम म्हणजे इच्छा, आसक्ति ह्यावर बरेच उपाय शास्त्रामध्ये सांगितले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी एक उपाय सांगितला तो मननीय आहे - "जरी पुत्रशोकु संकल्पा | दाखविजे || (ज्ञा. 6.375). आता संकल्प म्हणजे काय ? " श्रुते दृष्टे अपि वा भोग्ये यस्मिन् कस्मिंश्च वस्तुनि, समीचीनत्वधी " - ऐकलेल्या पाहिलेल्या अशा कोणत्याही भोग्य वस्तूविषयी, ही चांगली आहेत अशी जी बुद्धि होते त्याला संकल्प म्हणतात व त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा हा काम. म्हणून काम हा संकल्पाचा पुत्र. मग विषय (भोग्य वस्तु) असूनही तेथे काम (प्राप्तीची) इच्छा नाही असे झाले तर त्या कामाचा बाप म्हणजे संकल्प पुत्रशोक होऊन प्राण सोडतो.
शास्त्रामध्ये अशा बर्याच युक्त्या आहेत. पण लेख बराच लांबला आहे ह्याची जाण आहे म्हणून आवरते घेतो.