अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार: भारताच्या प्रगतीआड येणारे मुख्य अडथळे आणि इतर देशांच्या नजरेत असलेली भारताची प्रतिमा!

होय! अनियंत्रित लोकसंख्यावाढ हाच भारताच्या प्रगतीआड येणारा मुख्य अडथळा आहे असे मला वाटते. इतर अडथळे ही आहेत पण त्याला काही अंशी लोकसंख्याच कारणीभूत आहे. वाढती बेरोजगारी कशामुळे? तर (नोकरीच्या/राहाण्याच्या)जागा कमी... माणसे जास्त.. यामुळेच! मग नोकरी मिळवण्यासाठी शेवटी भ्रष्टाचाराचा वापर केला जातो. पैसे देवून नोकरी मिळवली जाते. म्हणजे बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा लोकसंख्यावाढीचाच परिणाम आहे.

गुन्हेगारी ला शेवटी काही प्रमाणात बेरोजगारीच कारणीभूत आहे. हे माहीती असूनही सरकार कडून याबाबतीत काहीच प्रयत्न होतांना दिसत नाहीत. जरी प्रत्येक नागरीकाने सुद्धा याचा विचार केला पाहीजे हे खरे आहे तरी सरकारचे ही काहीतरी कर्तव्य आहेच की! परदेशात राहातांना हे आणखी प्रकर्षाने जाणवते. फक्त आणि फक्त लोकसंख्या कमी असल्यामुळेच इतर देश विकसीत झाले आहेत. तसे पाहीले तर आपण कोणत्याच देशाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही आहोत... घोडे येथेच अडत आहे. बेसुमार वाढणारी लोकसंख्या!

जेव्हा एखादा अहवाल यादी जाहीर करतो की अमुक तमुक देशाचा भ्रष्टाचारात कितवा नंबर लागतो आणि त्या यादीत भारताचे नाव बघून मन विषण्ण होते. सगळ्या जगाला ते माहीत होते.

नमस्ते लंडन चित्रपटात कॅटरीना कैफ ला तिच्या होणाऱ्या ब्रिटिश नवऱ्याचा आजोबा म्हणतो की,

" जेव्हा पासून ब्रिटिश भारत सोडून गेले आहेत, तेव्हापासून भारत हा देश गुंड लोकांच्या हाती गेला आहे / गुंड लोक राज्य करताहेत."

अशा प्रकारचे गैरसमज खरंच आपल्या भारताबद्दल आहेत. अक्षय कुमार त्याला नंतर चांगल्या दोन चार गोष्टी सुनावतो हे जरी खरे असले तरी असे समज भारताबद्दल निर्माण व्हायला कोण जबाबदार आहे? चोविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या? जी भारतातली सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाट्यावर आणत आहेत आणि सगळे जग ते बघते?

आपणांस काय वाटते?