( वा. न. सरदेसाईची विधाता ह्या वृत्तातील गज़ल )
जे कधी न जमले मजला
जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !
मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !
त्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..
माझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते !
तांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,
विझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते !
एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,
पाखरू मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते !
होकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या,
नवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते !
मी गझल गुणगुणत माझी, रस्त्याने चालत होतो..
आकाश मजपुढे तेव्हा, अदबीने नमले होते !
-वा.न.सरदेसाई
२/४, ’रत्नभिमा’ हौ. सोसा.
आचार्य हॉस्पिटल जवळ,
वली पीर रोड,
कल्याण (पश्चिम)- ४२१,३०१
फोन- ०२५१-२३१०७५७