मंडळी,
१५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यंत जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठी ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरुवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे..
लेखिकेची भूमिका :
आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढी आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची. आपल्या भक्तीनं, अभंगवाणीनं, विद्वत्तेनं , संत पदाच्या शिरोमणी पदावर पोहोचलेले संत तुकाराम हे संत परंपरेतलं बहुमोल रत्न. त्यांच्या आयुष्यात त्यांनी सोसलेले आघात, त्यांची पराकोटीची विठ्ठल भक्ती, आअणि श्वासाश्वासापर्यंत पोहोचलेली त्यांची अभंगवाणी या सगळ्यांचा विचार केला तर संत तुकाराम हे परमेश्वरी अवतार असले पाहिजेत या साक्षात्कारापर्यंत मराठी माणूस पोहोचतो. त्यातच त्यांचं सदेह वैकुंठगमन! म्हणूनच 'तुका आकाशा एवढा' बनून मराठी माणसाचं मन त्यांनी व्यापून टाकलं आहे.
'आवली' संत तुकारामांची द्वितीय पत्नी. संत साहित्याच्या अभ्यासकांनी. इतिहासकारांनी, पुराण-प्रवचनकारांनी, सिनेमा-नाटककारांनी, साहित्यिकांनी आवलीची एवढीच ओळख ठरवली आणि तेवढीच सांगितली. एवढंच नव्हे तर संत तुकारामांच्या, तरल मनस्थितीत लिहिलेल्या काही अभंगांचा आधार घेऊन 'आवली ही भांडखोर, कर्कशा, आणि कजाग बाई होती' अशा पद्धतीचं सर्टिफिकेटही तिला देऊन सारे मोकळे झाले.
लेखिकेला एम.ए. करत असताना, "संत तुकाराम' हा एक पेपर होता. त्यामध्ये संत तुकारामांचं चरित्र संपूर्ण अभ्यासताना, साधकापासून्-सिद्धावस्थेपर्यंत तुकारामांच्यात होणा-या बदलाची त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट क्षणांची भागीदार आणि साक्षीदार असलेली आवली... तिचा कजाग, भांडखोर, कर्कशा असा उल्लेख नेहमी आढळला. पण ती आवली अशी का झाली हा विचार कोणीच केला नाही.. ना तुकाराम महाराजांनी, ना इतिहासकारांनी, ना अभ्यासकांनी, ना साहित्यिकांनी आणि आवली उपेक्षितच राहिली कायमची.
तुकाराम महाराजांसारख्या वटवृक्षाची, एक चिवट, कणखर, मजबूत अशी मुळी बनून आवली कायम जमिनीतच राहिली; नव्हे, ती जामीनच बनून राहिली, उर फाटलेली, भेगाळलेली, जखमी जमीन. त्या पूर्णपणे अंधारातच राहिलेल्या आवलीला, तिच्यातील घायाळ, जखमी, विध्व, आईला, पतीवर निःसीम प्रेम असूनही त्याने दुर्लक्ष केल्यामुळे संसाराचा गाडा एकहाती ओढणाऱ्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी लेखिकेने केलेला हा खटाटोप.
'आवली ही पुणे परगण्यातील अतिशय श्रीमंत, सधन सावकार अप्पाजी गुळवे यांची लाडकी मुलगी" या एका संदर्भाशिवाय इतिहासात तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. तिची आई, तिची भावंडं, तिच्या पूर्वायुष्याबद्दल तसेच, संत तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाल्यानंतर त्यांच्यामागे ती कशी जगली? कुठं जगली? तिची मुलं कशी वाढली? त्यांचं पुढे काय झालं? आवलीचा शेवट कुठे , कधी झाला? काहीही धागा इतिहासात नाही. हा इतिहासाचा करंटेपणा की आवलीच दुर्भाग्य? केवळ इतक्या त्रोटक माहितीवर संपूर्णपणे लेखिकेने उभं केलेलं काल्पनिक विश्व, आवलीच्या बालपणीचे काल्पनिक प्रसंग, काल्पनिक पात्र.... या पुस्तकातून पाहायला मिळतात. घरी कामाला असणाऱ्या 'गुणाबाई' या काल्पनिक पात्राच्या मुखी येणारं विठ्ठलाचं नाव आणि तेव्हापासूनच त्याच्याशी आवलीचं असलेलं भांडण, लेखिकेने प्रभावीपणे दाखवलं आहे. 'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला अधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला. तुकारामांचे संसारापासून, मुलांपासून, आपल्यापासून दूर दूर जाणे आणि पुरूष असूनही निष्क्रिय होऊन केवळ देवभक्ती करणे याने पेटून उठणारी, विठ्ठलाला बोल लावणारी आवली ही आपली वाटू लागते. 'विठ्ठल हा आवलीचा अपराधी आहे' या निष्कर्षावर आपण येऊन पोहोचतो. काम-धंदा , मुलं-बाळं सोडून तुकाराम करत असलेल्या देवभक्तीपुढं तिनं पेटून उठणं , कदाचित हेच 'कजाग, कर्कशा बाईल' या तिच्या ओळखीला कारणीभूत ठरलं.
तुकारामांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या वेळचा प्रसंग मनाला चटका लावून जातो. "पुन्हा एकवार तिनं बैठकीवर पाहिलं, आणि ती चरकली, ती गोंधळली, ती पुन्हा पुन्हा डोळे विस्फारून पाहू लागली. त्या घटनेचा अर्थ तिच्या लक्षांत येईना. नुसत्या टाळ्-चिपळ्या.. बुवांना सोडून.. बुवांच्या शरीरापासून वेगळ्या.. आवली चरकली. हळू हळू तिला त्या घटनेचा अर्थ कळू लागला.. बुवांचे शब्द आठवले 'आवले, ज्यादिवशी या टाळ्-चिपळ्या माझ्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या दिसतील, त्यादिवशी समज तुझा तुकाराम या जगांत नाही.' ती विलक्षण चरकली. .. बुवांच्या टाळ्-चिपळ्या बुवांशिवाय??? आवलीनं टाहो फोडला "धनी..............! धनी..........!" आणि ती त्या बुवांच्या बैठकीवर कोसळली. तिचा आकांत सगळ्या गावक-यांच काळीज चिरत गेला. विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवत गेला. त्याच्या पायाखालची वीट थरारली. इंद्रायणी क्षणभर वाहायचं थांबली.........."
आवलीला जाणून घेण्यासाठी, तिचं तुकारामांच्या जीवनातलं अस्तित्व समजून घेण्यासाठी प्रत्येकानं जरूर वाचावी अशीच ही कादंबरी आहे. यातला एक भाग मला आवडला तो म्हणजे, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी, घडलेल्या प्रसंगांचं विठ्ठल्-रुक्मिणीच्या दृष्टिकोनातून लेखिकेनं केलेलं विश्लेषण. हा मराठी कादंबरी विश्वातील एक नवा प्रयोगच म्हणावा लागेल. लेखिकेनं स्वतः आवली होऊन लिहिलेलं हे काल्पनिक चरित्र आवलीला न्याय मिळवून द्यायला थोडी तरी मदत करू शकेल.
नाव : तुकयाची आवली
पृष्ठे : १८२
लेखिका : सौ. मंजुश्री गोखले.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.