'मध्यंतरी मी 'माझ्या संग्रहातील काही आर्या' दिल्या होत्या. त्यासंबंधात श्री. कुशाग्र यांनी आर्यावृत्तात १२ व १८ मात्रांचे चरण असल्याचे सांगितले होते.
आज माझ्या हातात कै. मोरेश्वर सखाराम मोने लिखित 'मराठी साहित्य व व्याकरण ' हे पुस्तक आहे. (प्रकाशन काल १९३४) त्यात साहित्यिक विषयातील सुंदर माहिती मिळते. ती मध्ये माधव-ज्युलियन (माधव त्रिंबक पटवर्धन) यांच्या "छंदोरचना"चा उल्लेख देखील दिसतो.
या मध्ये त्यांनी आर्येसंबंधी काही उद्बोधक माहिती छंद:शास्त्र या विभागात दिली आहे. ते म्हणतात (पृष्ठ क्र.१९०)-
"आर्या"
"मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रचार केला; तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोत फरक आहे. खऱ्या आर्येत १२,१८ व १२,१५ ह्या क्रमाने चरणातील मात्रा असतात. तर गीती मध्ये १२, १८ अशा मात्रांचे चरण असतात."
त्यांनी उधृत केलेली आर्या -( मोरोपंतांचीच) पुढील प्रमाणे-
ती तातास म्हणे कच, गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर
परी त्यास सोडिले जळ, जळ सोडूं मजही आर्यकर /
गीती (मोरोपंत) -
शल्य म्हणे राधेया, जेव्हा स्मरोनी कर्मांतें
अर्जुन तीव्र शरांनी, समरी भेदील सर्व मर्मांतें
कोणा मनोगतीस या संबंधात अधिक माहिती असेल तर ती अवश्य द्यावी.