विरहानंतर

जीवन असते, हे जीवन संपवल्यानंतर
निघतो आहे, तुम्ही तुमचे ठरवा नंतर

"कसे चालले आहे?" म्हणुनी पुढे निघालो
बोलवेचना पुढचे... इतक्या दिवसानंतर

हयात जाताना प्रश्नाचे उत्तर कळले
काय असावे प्रेमामध्ये विरहानंतर...

किती माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर

तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर  *

प्रवास नुसता, अस्थैर्याचे गुलाम सारे
विश्व कोणते गाठावे या विश्वानंतर?

काय घालता भीती जगताना नरकाची?
बोला डुढ्ढाचार्यांनो... पण मेल्यानंतर *

त्याच्याइतके वाइट नाही तू दुरावणे
जे होते ऱ्हुदयामध्ये ... तू दिसल्यानंतर