हागणदारी मुक्त खेडे

काही दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. रायगड जिल्ह्यातल्या खेड्यांमधून हागणदारी मुक्त खेडे ही योजना राबवायचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावा गावातल्या अंगणवाडी शिक्षिकांना वेठीस धरण्यात आले. कल्पना अशी होती की गावातील अंगणवाडी सेविका पहाटे हागणदारीपाशी जावून उभ्या राहतील आणि येणाऱ्या स्त्री पुरुषांचे गुलाबाचे फुल देवून स्वागत करतील. नंतर त्या गावकऱ्यांचे फोटो काढून वर्तमानपत्रात प्रकाशित केले जातील.

एक काल्पनिक पण जिवंत प्रतिक्रिया...

सेविका: नमस्कार या अभिनव योजनेत तुमचे स्वागत, हे गुलाबाचे फुल तुमच्या साठी...

गावकरी महिला: या, बया.. बायकात बी असतंय का असलं, म्या न्हाय त्यातली, सांगून ठिवते!

सेविका: ताई, गुलाबाचं फुल घ्यायला काय हरकत आहे? नंतर आम्ही तुमचा फोटोपण काढणार आहोत. तो उद्याच्या वर्तमानपत्रात छापून येइल.

गावकरी महिला: आगावच हायेस की गं! आमीबी बगिटलाय त्यो पिच्चर. अबिशेक बच्चन आन जान एब्रामचा. आन हे बरंय, पहिल्यासाटनं फुल देताय मग फोटुबी काडताय. आन त्यो पेपरात छापनार म्हनताय. म्हंजी हाय का काडीमोड आमचा. आदीच तं न्हवरा टपून बसलाय, त्या गंगीसंगट पाट लावायला. मंग त्येंचा रस्ता मोकळा. वा गं वा.... लै शाणी हायेस कीं..!

सेविका: (स्वगत) आता हिला कसं समजावू? बरं खरं कारण सांगावं तर चप्पल घेवून मागे लागायची.

तुम्हाला म्हणून सांगते, हे फक्त आपल्या तुपल्यात बरं. रोज सकाळी उठून घरं झाडा, तुळशीची पुजा करा, सगळ्यांचा चहा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून सासुच्या नावे ओरडत होते (म्हणजे मनातल्या मनात हो) पण आता हे भलतंच विश्वदर्शन होतंय रोज सकाळी. आता काय करू....?

गावकरी महिला: ए बाई, मी जावू का आता, लई घाई झालीया. आन उशीर झाला तं पुन्हा न्हवरा पेटल. ती गंगी वाटच बगतीया आमी भांडायची!

सेविका: असं बघा बाई, समजा तुमी स्वयंपाक करायला बसला आहात.

गावकरी महिला: अगं माय माजे, हितं कोण स्वयंपाक करल. बरी हायेस ना?

सेविका: तुम्ही मला पुर्ण बोलू द्या हो आधी, समजा तुम्ही स्वयंपाक करायला बसला आहात आणि कुठून तरी घाणेरडे वास येवू लागले, कुठून तरी घाण वाऱ्यावर उडून आली आणि तुमच्या अन्नात पडली. तर तुम्हाला काय वाटेल? हुश्श.... बोलून टाकलं एकदाचं...!

गावकरी महिला: वाटायचय काय त्येच्यात, मस्नी म्हायीत हाये, पक्कं हे काम गंगीचंच आसणार बगा. लई चाबरी हाये ती.

सेविका: (स्वगत) अरे देवा, हिला गंगीशिवाय काही सुचतच नाही, काय करू? कसं समजावू हिला...

तुम्हाला सांगते, काल असेच एक म्हातारबाबा आले, त्यांना गुलाब दिला तर म्हातारा लगेच केसावरनं हात फिरवायला लागला. फोटो काढू म्हणलं तर.. हे आत्ता आलो म्हणून जो गायब झाला तो अर्ध्या तासाने नवे कपडे घालून, नटून थटून आला.. हातात टमरेल घेवून. आणि म्हणतो "पोज देवू का पोज...! आणि हे कमी होतं म्हणून पुढं विचारतो बाई, कानात फाया लावलाय इत्तराचा, दिसल का वो फोटुत?

नशीब अत्तराचा वास येइल का म्हणून नाही विचारले.

गावकरी महिला: ए बाई, जातो ना म्या आता, आता न्हाय ऱ्हावत, काय सोताशीच बोलतीया येड्यावाणी. मला कसंतरी व्हाया लागलंय आता. मला नगो तुजा फोटू बिटू, म्या चालले!

सेविका : अहो, बाई... हे बघा, हा हागणदारी मुक्त खेडे या योजनेचा एक भाग आहे. तुम्हाला नाही का वाटत, तुमच्या गावात सगळीकडे शौचालये असावीत म्हणून? रोज सकाळी एवढ्या लांब गावाबाहेर उठून यायचं, केवढा हा त्रास असं नाही तुम्हाला वाटत.

गावकरी महिला: बाय माजे, यवडी येकच जागा हाये गं, जितं सासुचा पहारा नसतुया. दिवसातली धा - पंदरा मिंटं मिळत्यात सुकाची तं तितं पण तुज्या पोटात दुकाय लागलं व्हय, डुचकी मेली!

सेविका: अहो, अहो बाई, असं नव्हतं म्हणायचं मला... आता कसं समजावू तुम्हाला?

गावकरी महिला: हे बग, मस्नी काय, समजावत बसू नगो... तुज्या सायबाला जावून समजाव. तेस्नी म्हणाव आदी घरा घरातून संडासं त्या बांदून आन मंग सांगा हागणदारीत नका जावू म्हून. उटावरनं शेळ्या राकनं सोडा म्हणाव तेस्नी. गेलं मोटं लागून. हागणदारी नसलेलं गाव म्हनं!

तुमास्नी काय जातंय गं सांगाया? हितं खायाची मारामार, एक दगडी कोळशाची शेगडी बांदून घेयाची म्हनली तर पन्नास - पंचाहत्तर रुपडे मागत्याती. अन संडास बांदा म्हनं. आमच्या संडासासाठी मंजुर झाल्यालं पैकं सुद्धा तुजं सायेब लोक खावून ढेकार देत्यात. त्या सरकारी फिरत्या संडासात जायाचं म्हनलं तर त्यो तितला कंत्राटदार लगंच दोन रुपे मागतो. आन हागणदार नको म्हनं. त्यवडी येकच जागा फुकाट राहिलीय गं बाई.

सेविका: बाई, मी.. काय बोलू... काहीच.. समजत नाहीये.

गावकरी महिला: तुजी आडचण कळतीय गं बाय माजे. आमालाबी नगो हाय का संडासं मिळाली बांदून तर. आसल्या घाणीत नाक दाबून यायाची हौस नाये गं बाई. पण नाविलाज हाये. सरकार नुसतंच सांगतं.. सुदारणा फायजे म्हून.. पन सुदारना फायजे असं नुसतं म्हनुनशान सुदारना नसती होत बाये...!

गरिबाच्या पोटाला दोन घास मिळालं तर सुदारनेच्या गोष्टी सुचत्यात त्येस्नी. रिकाम्या पोटी न्हाय काय सुचत बाई. आता जाते. पोरं साळंत जायाची हायत. मालकबी कामावर जायाचा हाये, त्येस्नी भाकरतुकडा करून द्येयाचा हाये बाई. सैपाक करून दुपारच्याला सासुबायला डागदरकडं न्याचं हाय, जाती म्या.

विशाल कुलकर्णी