बालसुधारगृहात नव्या वर्षाचे स्वागत वेगळ्या पध्दतीने!

वाढत्या लोकसंख्येच्या तोडीला गुन्हेगारीचा दरही दिवसेगणिक वाढत आहे. रोज आपल्याला शहर व आजूबाजूच्या भागातील मोठमोठ्या गुन्ह्यांच्या बातम्या वाचायला मिळतात. परंतु यातील अनेक किरकोळ गुन्ह्यांची नोंद होत नाही. ह्यातील बरेचसे गुन्हे परिस्थिती आणि सभोवतालच्या वातावरणाला बळी पडलेली छोटी मुले करतात आणि परिणामी त्यांची रवानगी रिमांड होम मध्ये (बालसुधारगृहात) होते. त्यांची सुटका होईपर्यंतचा काळ ते येथे घालवतात. त्यांच्यातील बरीचशी मुले पुन्हा आपल्या आधीच्याच मार्गाला लागतात आणि अनेकजण तर सुटका होण्याअगोदरच रिमांड होम मधून पळ काढतात.   

आर्ट ऑफ लिव्हिंग ही स्वयंसेवी संस्था रिमांड होम मधील अशा मुलांसाठी व तेथे सोडून दिलेल्या इतर मुलांसाठी विशेष शिबिर घेते. त्यामध्ये मुलांना तणाव निर्मूलन तंत्रे, प्राणायाम व सोपे ध्यान शिकवले जाते. त्यांच्या नियमित सरावामुळे मनातील ताण निघून जाण्यास मदत होते, नकारात्मक विचार व भावना दूर होतात व सकारात्मक विचारांना प्रोत्साहन मिळते. मुलांना चांगले आरोग्य व निरामयतेचा अनुभव येऊ लागतो. त्या अंतर्गत  ह्या मुलांचे सामूहिक भजन गायन (सत्संग) देखील घेण्यात येते ज्यामुळे मुलांना आनंद व मन:शांतीचा अनुभव मिळतो. आर्ट ऑफ लिव्हिंग चे स्वयंसेवक ह्या मुलांशी दैनंदिन सामुहिक ध्यान व सत्संग यांच्या माध्यमातून संपर्कात रहातात.  त्या मागचा उद्देश हाच की सामाजिक बदल घडवून आणून जगण्यासाठी आपले जग अधिक चांगले बनविणे.
 
आर्ट ऑफ लिव्हिंग ने शिवाजीनगर, पुणे येथील रिमांड होममधील मुलांबरोबर २ जानेवारी २०१० रोजी वेगळ्या व आनंदी पध्दतीने नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला.  कार्यक्रमाची सुरुवात एकाच वेळी पाच वेगवेगळे त्र्यम्बक होम करण्याने झाली. एकदिलाने, उत्साहाने महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठण केले जात होते. सर्व मुले व कर्मचार्यांनी ह्या शांत व शुध्द अनुभवाचा आनंद घेतला. त्यानंतर मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुलांनी त्यांच्यासाठी खास घेतल्या गेलेल्या चित्रकला स्पर्धेत अतिशय उत्साहाने भाग घेतला.  तयार केलेल्या ग्रीटिंग कार्डांमधून प्रत्येक मुलाने आपले वेगळेपण व्यक्त केले.  परीक्षकांना कोणते कार्ड सर्वोत्कृष्ठ ठरवायचे हाच यक्षप्रश्न पडला होता. त्यानंतर मुलांनी आपले गायनकौशल्य 'सत्संग समूह गायन स्पर्धे'तून दाखवून दिले. "कृष्ण", "राधे", "गोपाल" गटांमध्ये बक्षीसासाठी जंगी चुरस लागली होती. त्या नंतर समूह नृत्ये व वैयक्तिक नृत्ये यांद्वारे मुलांनी आपली नृत्यकला दाखवून दिली. बाहेरून कसलीही मदत न मिळालेली त्यांची नृत्यरचना एवढी कुशल व जोशपूर्ण होती की सर्वांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात व 'वन्स मोअर'ने दाद दिली.  मुलांनी त्या नंतर आंब्याच्या पानांपासून बनवलेले आदिवासी वेष परिधान करून एक छोटेसे नाटुकले सादर केले, ज्यातून त्यांनी मैत्री व एकीचा संदेश दिला.    

ह्या कार्यक्रमासाठी  गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी बक्षिसांचे वितरण केले. ते म्हणाले, "पोलीस तुमच्या मदतीसाठी आहेत आणि तुम्ही आम्हाला घाबरता कामा नये. खरे तर तुम्ही वाईट सवयी सोडून द्यायला हव्यात आणि चांगल्या कामात भाग घ्यायला हवा. तुम्हाला मदतीची गरज भासली तर आमच्याकडे या. आर्ट ऑफ लिव्हिंग चे काम फार चांगले आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे.  मुलांना रिमांड होम मधून पळून जावेसे वाटत नाही हे वास्तवच आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिबिरामुळे घडून आलेला सकारात्मक बदल दर्शविते." त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या स्वयंसेवकांचे ही ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले व त्यांना  इतर भागांमध्येही अशीच शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सर्वोत्तम चित्रासाठीचे बक्षीसदेखील डॉ. सुपेकरांच्या हस्ते देण्यात आले.

ह्या प्रसंगी बोलताना रिमांड होम च्या पर्यवेक्षिका श्रीमती सोनावणे म्हणाल्या, "आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिबीर सुरु झाल्यापासून आम्ही मुलांच्या वागणुकीत सकारात्मक बदल बघत आहोत. त्यांच्यातील अस्वस्थता, ताण, मारामारी आणि भांडणेही कमी झाली आहेत आणि आता त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ झाले आहे. मुलांना त्यांच्यावर कोणी प्रेम करते ह्याची जाणीव होत आहे आणि ती जास्त आनंदी आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग ने आमच्या येथे हा कार्यक्रम सतत चालू ठेवावा. गेल्या काही महिन्यांत आमच्या येथून एकही मूल पळून जाण्याची घटना घडलेली नाही. आणि त्याचे श्रेय आर्ट ऑफ लिव्हिंगला जाते."

नियमितपणे त्र्यंबक होम करणारे पिंपरी-चिंचवड मधील श्री. प्रवीण कुमार यांनी ह्या होमाचे मन, शरीर आणि परिसरशुद्धीसाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, "त्यात संकल्प सिद्धीस नेण्याचीही ताकद आहे."

आर्ट ऑफ लिव्हिंग ही विना-लाभ तत्त्वावर चालणारी (परमपूज्य श्री श्री रविशंकर यांनी स्थापिलेली) संस्था ह्या ठिकाणी गेले वर्षभर कार्यशील असून येथील मुलांना चांगले आरोग्य, मन:शांती व तणावमुक्त वातावरण मिळावे म्हणून त्यांच्यासाठी नवचेतना शिबिरे घेत आहे.

सर्वसामान्य नागरिकांनाही सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तुम्ही हे मुलांसाठी अत्यावश्यक वस्तू खरेदी करून, तसेच त्यांना वेगवेगळ्या कौशल्यांचे, व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन, कला, गायन. कथाकथन व तत्सम कार्यक्रमाद्वारे त्यांचे भविष्य सकारात्मक करून साध्य करू शकता. आणि ह्या द्वारे मुलांमध्ये सर्व समाजच आपला परिवार आहे ही जाणीव समृध्द होईल. 

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. नितीन प्रधान : मोबाईल क्रमांक : ०९३७००६०१०१.
ईमेलः <दुवा क्र. ३>

ह्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे : दुवा क्र. १ , दुवा क्र. २