विंग कमांडर राकेश नंदा

जब कोई बात बिगड़ जाए ।जब कोई मुश्किल पड जाए ।
तब देना हाक मला ओ हमनव़ाज़।।

आप महर्षी का कार्य करते हो। आपको चिंता करने की क्या बात है। महर्षी संभाल लेंगे ना। राकेशचा आवाज व चेहरा आठवत राहिला. माझ्या ट्रेनच्या किश्श्यात भर पडली.

ट्रेन धडाडत पुढे चालली होती. पत्नी अलका, सुनबाई वरदा व चिरंजीव चिन्मय यांच्या समावेत पत्यांचा 'दश्शी पकड' डाव रंगला होता. मधेच गप्पांना रंगत येत होती. रात्रीचे १० वाजून गेलेले. सहज समोरच्यांशी ओळख काढता कळले की ते गुंटकलला उतरणार आहेत. त्यांच्या जागी कोण कुठे चढणार कळावे असे वाटून मी एका स्टेशनात खाली उतरून रिझर्वेशनची यादी पाहिली. केआरएम ला कोणीतरी चढतील. असे वाचले व पाल चुकचुकली.

आम्ही जात होतो ती गाडी तीच होती रिझर्वेशनही ठीक होते. पण ती गाडी त्या दिवशी व्हाया रेणीगुंठा न जाता व्हाया कृष्णराज पुरम अर्थात बंगलोर कडून जाणार होती. आम्हाला हवाईदलातील मित्राच्या मुलीच्या विवाहाला चेन्नईला जायला रेणीगुंठ्याहून पुढचे तिकिट रिझर्व झाले होते. सगळ्यावर अचानक पाणी फिरलेले पाहून पत्त्याची पान भिरकटली गेली. मूड बदलला. एकंदरीत परिस्थिती बरीच स्फोटक झाली. आता शाही लग्न, डोलीऱ्हलदी, डान्स व बहारदार पार्टी वगैरे फोटोत पाहण्याच्या गोष्टी उरणार वाटून विशाद वाटला. दोन दोन महिने तिकिटे काढून ही दशा.

आता बंगलोरला उतरून चेन्नईला जावे तर मुहुर्त हुकणार हे निश्चित. चडफडून काही उपयोग नव्हता. काय करावे सुचेना.

बात फार फार बिगड़ गई थी । तेंव्हा बंगलोरमधल्या विंग कमांडर राकेश नंदाची आठवण तात्काळ आली.

कठिण समय येता - जो  कामास येतो - तो राकेश. ही त्याची खासियत.

मोबाईलची कळ दाबताच रिंगटोनची धुन वाजू लागली. "जब कोई बात बिगड जाए जब कोई मुश्किल पड जाए तब देना हाक मला" ....

परिचित भरदार आवाजात,

"प्रणाम सर, राकेश बोल रहा हूँ।" ऐकले व हायसे वाटले. त्याला पटापट सर्व सांगितले.

"कोई चिंता ना को सर, मैं सब कुछ करता हूँ। आप बस कृष्णराजपुरमवरून बंगलोर कँट रेल्वे स्टेशनवर पोहोचा. मी करतो तुमची व्यवस्था."

रात्र घालमेलीत गेली होती. आता हा रात्री करणार तरी काय व कसा असे राहून राहून वाटायला लागले होते.  बंगलोर ते चेन्नईप्रवास ३०० कि मी चा बसने फार वेळ लागतो. ट्रेन त्यातल्या त्यात ६ -६.३० तासात नेते. पण आता इतका वेळ प्रवास उभे राहून शक्य नव्हते. राकेश एमसीओचा कमांडंट जरी असला तरी त्याला आयत्या वेळी रिझर्वेशन मिळवणे अशक्य होते.

पाहू उद्या काय ते असे विचार करत पहाटे पहाटे झोप लागली. सकाळी ८ला कृष्णराजपुरम आले. बंगलोर १२-१३ किमी दूर. तिकडे जाणारी एक ट्रेन आली व आम्ही बंगलोर कँटला उतरलो. तोवर राकेशचे फोन खणाणत होते.  आमचा डबा नंबर त्याला कळला होता. गाडी थांबायच्या आत हातांनी हाय हॅले झाले. आम्ही उतरलो तोवर माझ्या गळ्यात व पाठोपाठ सौ. अलकाच्या गळ्यात जाडजूड फुलाचे हार पडले.

फोटोची क्लिक क्लिक ऐकू येते न येते तोवर सामान उचलले गेले. बंगलोर कँट स्टेशनच्या बाहेर लागून एमसीओच्या एसी ऑफिसमधे आमचे आगमन झाले. वृंदावन एक्सप्रेसने दुपारी २.३० नंतर जावे लागणार होते  त्याच्या घरी सौ. रेणूने नाश्तापानी तयारच ठेवले होते. गप्पात जवळच्या एमजीरोडवरील शॉपिंग मॉलची महती ऐकून वरदा व अलकानी तिकडे मोर्चा वळवला. आणि सगळा मूडच बदलला. रागवा-रागवी कधीच संपून गेली होती. तोवर राकेशने एक महत्वाची मीटींग संपवून दुपारचे जेवण घ्यायला तो आला. जेऊन निघालो. ट्रेन आली. राकेशने आपले दोन जवान गाडीतून बसवून आणले होते. ते उतरले  आणि आम्ही त्या जागी बसलो.  गाडी अगदी हालली तेंव्हा शेकहँड करताना राकेशने तिकिट माझ्या मुठीत सरकवले. हळी हळू तो दिसेनासा झाला. काही वेळाने धन्यवाद द्यायला मी फोन लावला.रिंगटोनवर 'जब कोई बात बिगड जाए' गाणे चालू झाले. ते संपूर्ण वाजतच राहिले.

"आप महर्षी का कार्य करते हो। आपको चिंता करने की क्या बात है। महर्षी संभाल लेंगे ना।" राकेशचा आवाज व चेहरा आठवत राहिला. माझ्या ट्रेनच्या किश्श्यात भर पडली.

पुढे लग्नाला हजर राहता आले. सर्व सुरळीत पार पडले. परतताना आधी ठरल्यामुळे त्याने आमची जी बडदास्त ठेवली ती पाहून सौ. वरदाने तोंडात बोटे घालायची बाकी राहिली. वो किस्सा फिर कभी।