हरवले ते !!

त्या विश्वसुंदर्‍यांच्या स्पर्धांमध्ये विचारतात ना की "बाई ग, इतिहासातली कोणती घटना तुला बदलायला आवडेल" तसल्या प्रश्नाच्या धर्तीवर जर मला कोणी ('विश्व-सुंदर'स्पर्धेत भाग घ्यायाला न लावता) विचारलं की "बाबा रे, तुला इतिहासात कुठली घटना अ‍ॅड करायला आवडेल" तर मी मध्यरातीच्या गाढ झोपेतून उठूनही सांगेन की "या शास्त्रज्ञांनी जे हे गाडी, टीव्ही, आय-पॉड, लॅपटॉप, मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर असले जे (फुटकळ) शोध लावले आहेत ना त्यांच्या जोडीला (किंवा प्रसंगी त्यांच्या ऐवजी) अशा एखाद्या मशीनचा शोध लावूदेत की जे हरवलेल्या, नेहमी हरवणार्‍या, 'आत्ता तर इथे होता आता गेला कुठे' अशा विचारात आपल्याला टाकून गायब होणार्‍या वस्तू क्षणार्धात आपल्या पुढ्यात हजर करून ठेवेल. किंवा हे असलं मशीन तयार करणं त्यांना फार अवघड आणि आव्हानात्मक वाटत असेल तर गेला बाजार असं काहीतरी केलं पाहिजे की प्रत्येक वस्तूला अशी काहीतरी सोय असेल की जिच्यामुळे आपण जसा हरवलेला (पक्षि कुठे ठेवलाय ते आठवत नसल्याने सापडत नसलेला) मोबाईल शोधण्यासाठी दुसर्‍या मोबाईल वरून कॉल करतो तसा हरवलेल्या (मगासचा मोबाईलवाला कंस विसरू नका) वस्तूलाही मिस कॉल किंवा रिंग देता आली पाहिजे. हे असलं काही दुकानात मिळायला लागलं ना तर काय धम्माल येईल या नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शिरशिरी आली आहे. आणि हे असले काही प्रसंग घडले ना की मग तर मला माझ्या या लाडक्या, हव्याश्या वाटणार्‍या पण अस्तित्वात नसणार्‍या यंत्राची उणीव अतीवच तीव्रतेने जाणवते.
आता हे रिमोटच बघा. मला वाटतं रिमोट या वस्तूचा टीव्हीला (आणि त्यामुळे आपल्यालाही) कंट्रोल करण्यापेक्षा हरवण्यासाठीच जन्म झाला असावा. (सीडीज, पुस्तकं यांचा जन्म मित्रांना ऐकायला/वाचायला
दिल्यावर विसरून जाण्यासाठी झाला असावा या (माझ्याच असल्याने) माझ्या अत्यंत आवडत्या वाक्यावरून आधीच्या वाक्याचा जन्म झालेला आहे.) एवढे मोठ्ठाले टीव्ही बनवतात आणि त्यासाठी रिमोट हा एवढासा? अर्थात समप्रमाणात बनवा असलं काही म्हणत नाहीये मी. समप्रमाणात बनवायला तो काय गोडाचा शिरा आहे की घातली साखर आणि रवा समप्रमाणात. पण निदान उघड्या डोळ्यांना दिसेल इतपत तरी? "At least visible to bare eyes?"... दिवसांत निदान २०-२५ वेळा तरी टीव्ही चालू-बंद, आवाज कमी-जास्त करणे यासाठी रिमोट लागत असेल तर त्यातल्या निम्म्या वेळा आम्ही स्वतः उठून टीव्ही चालू-बंद करतो, आवाज लहान-मोठा करतो आणि उरलेल्या निम्म्या वेळा उठायचा आळस करतो. गणित चुकलं असलं तरी उरलेल्या १-२ वेळा रिमोट दृष्टीक्षेपात असल्याने वापरला जातो म्हणा पण ते प्रमाण एवढं नगण्य आहे की मी उल्लेख करायलाही विसरून जाणार होतो. आणि अर्थात यात मी चॅनल सर्फिंग गृहीत धरलेलं नाही. कारण रिमोट नेहमीच हरवला असल्याने चॅनल सर्फिंगची लक्जरी आम्हाला परवडत नाही ;). त्यामुळे टीव्ही बघताना आम्ही रिमोट-पूर्व काळातल्या कृष्ण-धवल युगात वावरत असतो. 
आता त्याऐवजी जर रिमोटला मिस कॉल देणारं असलं काही यंत्र अस्तित्वात असतं तर कसली सोय झाली असती. अहाहाहा... हरवला रिमोट, द्या मिस कॉल... हरवला रिमोट, द्या मिस कॉल.. एकदम जबर्‍या.. भलेही त्याच्यामुळे मोबाईलची किंवा त्या मिस कॉल देण्याच्या यंत्राची बॅटरी संपली तरी काही हरकत नाही. बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करू पण रिमोट हरवू देणार नाही. जय हो.
तीच गोष्ट प्रवासाला गेल्यावर हरवणार्‍या वस्तूंची. कधी ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेरगावी(देशी) गेल्यावर तर मला माझी बॅग म्हणजे आपल्या अंतरंगात (माझ्याच) अनंत वस्तू लपवून ठेवून गनिमी काव्याने लढत लढत माझा पुरता पराभव करणारी चतुरंग सेनाच वाटते. मी पहिल्या वेळी जेव्हा एकटा परदेशी गेलो होतो तेव्हा गॉगल, कंगवा, कॅप अशा विशेष आवश्यक नाहीत असं वाटणार्‍या पण त्या त्या वेळी आपलं महत्व जाणवून देणार्‍या किंवा अगदी टुथपेस्ट, ब्रश, सॉक्स सारख्या अतिमहत्वाच्या वस्तूंनी पुरता चकवा दिलेला आहे. अगदी एवढा की एकदा तर माझ्यावर चक्क बायकोला भारतात कॉल करून विचारायची वेळ आली होती  "अग ती माझ्या जॅकेटची कॅप सापडत नाहीये. कुठे ठेवली असेल माहित्ये का?" आणि तिने अगदी न गडबडता, न डगमगता, न गोंधळता (आणि हसणं न थांबवता) "मोठ्ठ्या हिरव्या बॅगेच्या डाव्या कप्प्याच्या आतल्या दुसर्‍या चेनमध्ये जो टॉवेल आहे ना, त्याच्या मागेच असेल" असं उत्तर दिलं होतं. आणि ते इतकं म्हणजे इतकं अचूक निघालं की क्षणभर माझी हिरवी बॅग एक चटपट भारत दौरा करून आली की माझी सुविद्य पत्नी मनोवेगाच्या वारूवर स्वार होऊन अमेरिकेतल्या हिरव्या बॅगेच्या डाव्या कप्प्याच्या आतल्या दुसर्‍या चेनमध्ये डोकावून गेली हे मला कळेना. "तुला पांढरी जादू (काळी म्हणजे वाईट) येते की काय किंवा असंभवातल्या सुलेखासारखी आत्म्यांची अदलाबदल/लपाछपी वगैरे खेळता येते की काय?" असले प्रश्न विचारायचा अनिवार मोह मला दाबून ठेवावा लागला होता. आणि त्याहीपुढे जाऊन पुढच्या वेळी परदेश दौरा करताना बॅग भरून झाल्यावर बायकोने बॅगांच्या पुढच्या चेन मध्ये चिठ्ठ्या टाकून ठेवल्या आणि त्या चिठ्ठ्यांवर लिहून ठेवलं की त्या बॅगमध्ये काय काय आहे ते. म्हणजे पुन्हा उगाच "पेन कुठाय, घड्याळ कुठाय, निळा टी-शर्ट कुठाय?" असल्या फडतूस प्रश्नांना आय एस डी कॉलवरून उत्तरं द्यायला नकोत. आता त्याऐवजी जर माझं ते प्रिय यंत्र माझ्याबरोबर असतं तर काय बिशाद होती त्या चतुरंग सेनेची (आणि माझ्या बायकोची) माझा पाडाव करण्याची. मला वाटतं सकाळी उठल्यापासून मी त्या यंत्राची बटनंच दाबत बसलो असतो. आणि तेही अगदी स्पेशल रिंगटोन सेट करून. म्हणजे टूथब्रश/पेस्ट शोधण्याचं बटन दाबल्यावर ब्रश आणि पेस्ट "वज्रदंती वज्रदंती, व्हीको वज्रदंती" असे बोंबलायला लागले असते किंवा शेव्हिंग क्रीम शोधायचं बटन दाबल्यावर "The Best the man can get" असं कोकलत जिथे असेल तिथून टुणकन उडी मारून जिलेट समोर आलं असतं. ** .. पण नाही ना... ते स्वप्नवत यंत्र कोणी शोधलं नाही नी माझे पोपट व्हायचे काही थांबले नाहीत.
(** लेखाचा एकूण विषय, व्याप्ती आणि दर्जा पाहता रोजच्या वापरातल्या प्रत्येक वस्तूवर मी हे असलं फुटकळ गाणं शोधू शकतो किंवा प्रसंगी पाडू शकतो. पण अतिपांचटपणाने पाणी पाणी झाल्याने वस्तूंची आणि गाण्यांची यादी आवरती घेतली आहे.)
पण बघता बघता हे असले किस्से एवढ्या वेळा आणि इतक्या वारंवारतेने (फ्रिक्वन्सी वो) घडायला लागले की मेऱ्येम्येक्ये आत्मसम्मान को ठेच्यच्य पौचने लगी (च्यायला त्या हिंदी पिक्चरच्या..).. मग मी पण पिसाळलोच.. म्हणजे चांगल्या अर्थाने. रेबीजवाल्या अर्थाने नव्हे. म्हटलं दर वेळी हे असले वाभाडे काढून घेण्यापेक्षा काहीतरी बदललं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. वस्तू कुठे ठेवली आहे हे लक्षात ठेवण्याची दैवी कला आत्मसात करणे हे तर माझ्या मेंदूवर असणार्‍या अत्यल्प सुरकुत्यांची संख्या पाहता (पाहता म्हणजे कल्पना करता या अर्थी) सर्वस्वी अशक्य होतं. म्हणून मी दुसरा सोप्पा मार्ग निवडला. दिवसरात्र एक करून, नाना खटपटी लटपटी, शोधाशोध करून, नेट पालथं घालून शेवटी मीच ते महान यंत्र बनवलं. आणि त्यात पहिला प्रोग्राम टाकला तो अर्थातच रिमोट शोधण्याचा. आणि काय सांगू तो झालाही  यशस्वी. फक्त त्यात थोडीशी गडबड होत होती. रिमोट शोधण्यासाठीचं बटन दाबलं की रिमोट सापडण्याऐवजी टीव्हीची चॅनल्स आपोआप बदलली जाऊन आपोआपच जिथे सोनिया किंवा बाळासाहेब यांची काही बातमी, कार्यक्रम, फोटो दाखवत असेल ते चॅनेल लागायचं. म्हटलं तर यंत्र अचूक होतं म्हटलं तर त्यात बग होता. पण हा बग फार किचकटीचा नसला तरी तसा काही मानवणाराही नव्हता. त्यात लवकरात लवकर दुरुस्ती करणं हे आवश्यकच होतं. पण इतक्या दिवसांच्या अपार आणि अविश्रांत मेहनतीने शरीराने आणि (त्याच त्या कमी सुरकुत्यावाल्या) मेंदूने संप पुकारला होता. म्हणून "उद्या बघू त्या यंत्राचं" असा विचार करून मी त्या दिवशी जरा लवकरच निद्रादेवीच्या अधीन झालो. दुसर्‍या दिवशी उठताक्षणी आधी ताबडतोब मी त्या यंत्राच्या दिशेने धाव घेतली. पण ते माझ्या स्टडीटेबलवर नव्हतं. पण मला आठवत होतं त्याप्रमाणे तरी मी ते तिथेच ठेवून मग ते निद्रादेवीच्या अधीन बिधीन झालो होतो. (आयला उगाच ते निद्रादेवी वगैरे. आधीच्या वाक्यात सरळ झोपलो असं लिहिलं असतं तर ते निद्रादेवी आणि अधीन असं दोनदोनदा लिहायला लागलं नसतं. आणि या वाक्यातलं धरून तीनदा. ओह नो.). मी पुन्हा सगळीकडे शोधलं. सगळी कपाटं, सगळे कप्पे, सगळ्या बॅगा सगळं सगळं सगळं शोधून झालं. पण ते माझं दैवी यंत्र काही सापडलं नाही. आणि 'हरवलेल्या वस्तू शोधण्याचं यंत्र' हरवलं तर ते कसं शोधायचं यावर तर मी अजून विचारच केलेला नव्हता !!! :-(
परवा एक मित्र आला घरी. समोर टीव्हीवर रट्टाळ 'फूड' चॅनेल चालू असलेलं पाहून आणि आमचे कंटाळलेले चेहरे बघून त्याला क्षणभर काहीच अर्थबोध होईना. पण क्षणार्धात त्याला परिस्थितीची कल्पना आली. "ओह, पुन्हा रिमोट" असं म्हणून तो उठला आणि झटक्यात टीव्ही बंद केला. त्याच्या मेंदूवर माझ्या मेंदुवरच्या सुरकुत्यांपेक्षा जास्त सुरकुत्या असल्या पाहिजेत नक्कीच !!!