आपल्याला रस्त्या मधून जाताना एखादा रोगाने त्रस्त असह्य भिकारी दिसतो, कोणाला जन्मताच असाध्य वेदना देणारा रोग असतो, कोणी अंबानीचा पोर असतो जो हजारो करोडोंचा मालक असतो कोणी राहुल गांधी जन्मताच एका साम्राज्याचा धनी असतो (पुढे ते टिकेल, नाही टिकणार तो मुद्दा सोडला तर) (अशी अजून टोकाची भरपूर उदाहरणे मिळतील).
ह्या पार्श्वभूमीवर चर्चेचा प्रस्ताव मांडलेला आहे.
१. संचित (हा जन्म व पुर्वजन्म) मानायचे का. नसेल तर वर वर्णन केलेली टोकाची परिस्थिती उपभोगण्याला कारणे कोणती.
२. जे नास्तिक आहेत त्यांचे काय मत आहे (व काय उत्तर आहे ह्या टोकाच्या परिस्थितीवर).
३. जे धर्म पुर्वजन्म मानत नाहीत (क्रिस्त धर्म) त्यांचे काय उत्तर असेल.
४. अशी टोकाची परिस्थिती काहीच का उपभोगतात म्हणजे हे जर रँडमली (मराठी पर्यायी शब्द) होत असेल तर त्यांनाच का उपभोगायला लागते इतरांना का नाही. लॉटरी समजण्या सारखे सोपे आहे का इत्यादी.
५. शास्त्रीय समर्पक उत्तर आहे का ह्याला - की काहीच लोकांना का भोगायला लागतात हे भोग.
काही शब्दांच्या परिभाषा दिल्या आहेत.
संचित – मनुष्याने आजच्या क्षणा पर्यंत केलेले सर्व कर्म (त्या कर्मांच्या परिणामांचा साठा). त्याचे दोन भाग प्रारब्ध आणि अनारब्धकार्य.
प्रारब्ध (किंवा प्रारब्धकार्य) – संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास सुरवात झाली त्याला म्हणतात.
अनारब्धकार्य – ज्या कर्माची फळे भोगायला अद्याप सुरवात झाली नाहीत त्याला म्हणतात.