क्रांतिकवी कुसुमाग्रज

आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे.

कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’

कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली, ज्यांनी तत्कालीन समाजात नवे चैतन्य निर्माण केले. तो काळच धगधगत्या क्रांतिपर्वाचा होता. ’गर्जा जयजयकार’ ही कविता चौथ्या दशकाच्या अखेरची; १९३९ सालची. तिसऱ्या दशकाच्या अखेरीस आणि चौथ्या दशकाच्या सुरुवातीस पेटलेल्या क्रांतीच्या वडवानलाच्या तेजाने ते दिपले, भारावून गेले. त्या कालखंडात हिंदुस्थानातील तरुणांच्या हृदयावर राज्य केले ते हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेच्या देशासाठी हसतमुखाने व अभिमानाने हौतात्म्य पत्करणाऱ्या धाडसी वीरांनी. हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाकऊल्ला खान, हुतात्मा राजेंद्र लाहिरी, हुतात्मा ठाकुर रोशनलाल, हुतात्मा जतीन दास, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव,     हुतात्मा महावीरसिंह ही त्यातली काही देदीप्यमान नावे.

ते महात्मे आपले दिव्य करून गेले. त्यांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. ज्यांनी मृत्यूला कवेत घेतले त्यांना कशाचे भय असणार? ज्यांना ध्येयाव्यतिरिक्त कशाचीच आसक्ती नाही त्यांना मोह कसला असणार? ज्यांनी आपले सर्वस्व राष्ट्राला समर्पित केले त्यांना पाश कसले असणार? या महान क्रांतिकारकांच्या हौतात्म्याने भारावून गेलेल्या कुसुमाग्रजांच्या लेखणीतून मग या दिव्यत्वाच्या प्रवासाचे आणि वेड्या ध्येयाचे सार्थ वर्णन करणारे शब्द साकारले

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकलो कीर्तीचे वा प्रीतीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
                            होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.

(क्रांतीचा जयजयकार)

सशस्त्र क्रांतीमध्ये नसला तरी सामाजिक क्रांतीमध्ये म्हणजे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्याच्या सत्याग्रहात ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते.   बहुधा आयुष्याच्या याच वळणावर  कुसुमाग्रजांना ध्येयवेडाचा साक्षात्कार झाला; प्रत्यक्ष अनुभुती आली आणि मग त्या झपाटलेल्या क्रांतिकवीचा धगधगता काव्यप्रवास सुरूच राहिला. आपली प्रतिभा केवळ निसर्ग वा भाव -भावना यात रममाण न होता, त्या प्रतिभेने स्वातंत्र्यसंग्रामासाठी या देशातील तरुणांना जर प्रेरित करता आले तर ती प्रतिभा सार्थकी लागेल हाच या क्रांतिकवीचा ध्यास. आणि ही भावना व्यक्त करताना कुसुमाग्रज म्हणतात

समिधाच सख्या त्या, त्यात कसा ओलावा,
कोठुनी फुलापरी वा मकरंद मिळावा?
            जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा!

(समिधाच सख्या या-)

भारतमातेच्या पुत्रांना एल्गारासाठी प्रेरित करताना कुसुमाग्रज म्हणतात -

      रक्तध्वज पूर्वेवर चढुद्या
      खोप्यातिल खग नभी उडूद्या
      आकाशात निखारा फुटुद्या
ज्वालांत जळूद्या तम सारा
हा काठोकाठ कटाह भरा.

(हा कठोकाठ कटाह भरा)

कुसुमाग्रजांनी सातत्याने अग्निपथाचा प्रचार केला. ज्यांना आवाहनाची भाषा मानवत नाही त्यांना आव्हान देऊन लोळवा असा प्रखर संदेश त्यांनी आपल्या कवितेतून दिला. उन्मत्त पणाने प्रजेला दुर्बल म्हणून हिणविणाऱ्या मदांध सत्तेचे वर्णन करताना कुसुमाग्रज लिहितात

"दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड!

आतापर्यंत अत्याचार सहन केले म्हणून प्रजेला सत्ताधीशांनी तुच्छ लेखले, की हे दुबळे आमचं काय वाकडं करणार? जर सहनशीलतेचा अर्थ भ्याडपणा असा घेतला जात असेल तर मग सहिष्णुता विसरून मदांध सत्तेला आपल्या प्रचंड सामर्थ्याने उलथून पाडणे हेच योग्य असे सांगताना कुसुमाग्रज म्हणतात ’

"दुर्बळ भेकड! "
त्वेषाने पुकारी
घुमले पहाड
घुमल्या कपारी

बस्स! फक्त अस्मितेची एक ठिणगी पडायचा अवकाश, क्रांतीचा वणवा पेटायला ती पुरेशी असते. आणि मग ते तथाकथित सामर्थ्यवान साम्राज्य खाक होते

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!
उठला क्षणात
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश
उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडली खालती!

(आगगाडी व जमीन)

या रूपकातून कुसुमाग्रज आक्रंदत होते, की हे भारतीयांनो, आता आपले सामर्थ्य एकवटा आणि तुमच्या सामर्थ्याला तुच्छ लेखणाऱ्या या मदांध सत्तेला भिरकावून द्या.

मात्र स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अग्निमार्ग सोपा नाही तर भयंकर आहे आणि याचा परिणाम ’उध्वस्त होणे’ हाच आहे, पण आजच्या या उध्वस्ततेतूनच उद्याचे स्वराज्य निर्माण होणार आहे हेही त्यांनी सांगितले. शत्रूचे सामर्थ्य वा क्रौर्य या दोहोंची फिकीर नसलेल्या वा यातनामय अंताचे भय नसलेल्या आणि बेभान होऊन रणात उतरलेल्या वेड्या मुलांविषयी कुसुमाग्रज म्हणतात,

न पराजयाने पराभूत होतसे
हा मृत्युंजय, ना मरणाने मरतसे
विजयाची एकच अखेर त्याला असे
स्वातंत्र्याचा ध्वज या गगनी गर्वाने चढणार
आहे अजिंक्य हा निर्धार

(अजिंक्य निर्धार)

आयुष्य देशावर ओवाळून टाकलेल्या या मुलांना त्यांचे बलिदाना वाया जाणार नाही याची खात्री देत ते म्हणतात,

चितेवरी वीरांनो अपुली
जरी शरीरे भस्म जाहली
झळकत येईल या अग्नितून समराचेच निशाण!
हे व्यर्थ न हो बलिदान!

(बलिदान)

कुसुमाग्रजांच्या अनेक कविता या खास एखाद्या व्यक्तीवरच आहेत हे त्याचा कुठे उल्लेख नसतानाही स्पष्ट जाणवते, उदाहरणार्थ

क्रुद्ध भूक पोटात घालुद्या खुशाल थैमान
कुरतडुद्या आतडी करूद्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?

(क्रांतीचा जयजयकार)   

हे वाचता क्षणी डोळ्यापुढे येतात ते आमरण उपोषणाने हौतात्म्य पावलेले हुतात्मा जतीन दास; तर

रक्ताने न्हाली
तनू ही रक्ताने न्हाली
आणि चाळणी जरी छातीची पिंजुनिया झाली...

(आव्हान)

हे वाचताना नजरेपुढे उभे राहतात आल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांच्या तुकडीशी अखेरच्या श्वासापर्यंत आणि अखेरच्या गोळीपर्यंत एकट्याने लढणारे हुतात्मा चंद्रशेखर आझाद!

कडकडती तडिता तव भवती
त्या प्रलयातून संथ सरे ती
मेघापरी तव गंभीर मूर्ती
उद्घोषत ललकारी

(ध्वजधारी)

हे शब्द आठवण करून देतात ते संसदेत बॉंब स्फोट घडविल्यावर तिथून निसटून जाण्याचा प्रयत्न न करता हातातली पत्रके फेकत ’इंकिलाब झिंदाबद’ च्या गर्जना देणारे हुतात्मा भगतसिंग आणि त्यांचे साथी बटुकेश्वर दत्त!

धूलिधूराच्या ढगामध्ये ती
दृष्टीआड हो तुझी आकृती
परंतु झेंडा झळकत वरती
तव संदेश पुकारी!
जय जयोस्तुते ते ध्वजधारी

(ध्वजधारी)

या ओळी डोळ्य़ापुढे उभे करतात नेताजी आणि त्यांची तिरंगा घेऊन हिंदुस्थानकडे कूच करणारी आझाद हिंद सेना.

याच नेताजींच्या महान कार्याचे कौतुक करताना कुसुमाग्रज म्हणतात,

एकाकी जासी झुंजत वैऱ्यांवर
घन रात्रित जैसा घुसतो अग्निशर
तिमिरावर फुलवित तेजाचा मोहर
      अमरत्वाच्या सारंगीवर
            छेडुनिया तांत
      काळ होऊनी शाहिर गाइल
            तव गौरव गीत

(सुभाष)

अत्यंत तेजस्वी अशा धगधगत्या कविता लिहिणारा हा क्रांतिकवी द्रष्टा होता. आज  ज्यांनी सर्वस्वाचा होम केला त्यांचे नावही उद्या कुणाला माहीत नसेल, मग त्यांना मान कुठून मिळणार ही खंत त्यांनी आपल्या कवितेतून मांडली

जनभक्तिचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नांव!

मात्र कुणी स्तुतिसुमने उधळली नाहीत म्हणून त्या बलिदानाचे महत्त्व कमी होणार नाही तर अशाच ’अनामिकांच्या’ असंख्य बलिदानांतूनच स्वातंत्र्य साकारले आहे याची ग्वाही कुसुमाग्रज देतात आणि त्या अज्ञात वीरां विषयी स्वतंत्र भारताच्या नागरिकांच्या हृदयातली कृतज्ञता व्यक्त करताना कुसुमाग्रज लिहितात

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान!
काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा!

(अनामिकास)

कै. कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दिवर्षाचा आज आरंभ होत आहे, त्या निमित्ताने या महान क्रांतिकवीला विनम्र अभिवादन.