काळजाची कांच जेंव्हा चूर झाली
काळजी सारी क्षणी त्या दूर झाली
त्या नकाराचे किती आभार मानू !
माणसांची माहिती भरपूर झाली
यायची ना वादळे आता कधीही
लुप्त झाली आणि माझे ऊर झाली
पापण्यांची तोडुनी दारे निघाली
बेलगामी आसवे चौखूर झाली
अर्ज माफीचा कधी केलाच नव्हता
ही अशी 'सुटका' कशी मंजूर झाली?
------------------------------------- जयन्ता५२