साधारण तासाभराने मी त्यांना स्मरणशक्तीच्या विसंगतीचे उदाहरण देऊन त्याची उकल करायला सांगितली. ते थोडक्यात असे - आपण कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीसोबत नव्याने ओळख करून घेतली आणि त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तिचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक हे तपशील सांगितले तर नाव आपल्या लक्षात चटकन राहते तर भ्रमणध्वनी क्रमांक आठवणीत राहिलेला नसतो. याच वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मी माझे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक जो तासाभरापूर्वी सांगितला होता तो विचारला. बहुतेकांना माझे नाव चटकन आठवले परंतु भ्रमणध्वनी क्रमांक डायरीत पाहून सांगावा लागला. आता मी त्यांना ही समस्या अजूनच तपशिलात स्पष्ट करून सांगितली. माझे नाव व क्रमांक त्यांच्या भ्रमणध्वनीवर अथवा डायरीत कशा पद्धतीने नोंद केला जातोय हे आधी फलकावर दाखविले.
Name : CHETAN GUGALE
Number : 9552077615
म्हणजे नाव जिथे साठविले जात आहे तिथे १२ अक्षरे आहेत. प्रत्येक अक्षर ए ते झेड या सव्वीस अक्षरांपैकी कुठले तरी एक आहे. तरीही नाव चटकन लक्षात राहते तर क्रमांक जिथे साठविला जात आहे तिथे दहाच अंक आहेत आणि प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी कुठला तरी एक अंक असणार आहे तरी क्रमांक चटकन आठवत नाही. असे का होत असावे? साधा तर्क लावला तर सव्वीस अक्षरांपैकी प्रत्येक जागी एक अक्षर असे मिळून बारा अक्षरांचे नाव आडनाव आणि त्याच्या तुलनेत प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी एक अंक असा दहा अंकी क्रमांक यात क्रमांक लक्षात ठेवणे जास्त सोयीचे पडावे परंतु तसे न होता नाव लक्षात राहते या समस्येची उकल कशी काय करावी?
खरे तर व्यवहारात आपल्याला कधी ही समस्या जाणवत देखील नाही. नाव लक्षात ठेवणे आपल्याला जास्त गरजेचे असते व आपला मेंदू ते बरोबर करतो. क्रमांक लक्षात ठेवणे इतके गरजेचे नसतेच. संपर्क साधतेवेळी ते भ्रमणध्वनीच्या अथवा डायरीतील संपर्क नोंदीतून सहज शक्य होते. म्हणजे ही एक समस्या आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेगात कधी आपल्याला जाणवतच नाही परंतु अगदी बारीक सारीक विचार करत आहोत तर जाणवू लागली आहे. बरं आता जाणीव झाली तर हे असे का घडतेय याची उकल देखील लवकर होत नाही. म्हणजेच ही बारीक समस्या विचारात घेतली तर त्रास देते, पण विचारात घेतलीच नाही तर काहीच त्रास नाही.
प्रशिक्षणार्थींना हे उदाहरण पटले, पण हे असे का घडते हे जाणून घेण्यास ते उत्सुक होते म्हणून मी त्यांना याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले ते असे - प्रत्यक्षात नावाची बारा अक्षरे आपण डायरीत किंवा भ्रमणध्वनीच्या संपर्क यादीत नोंद करून ठेवत असलो तरी मेंदूत ती त्याप्रकारे साठविली जात नाहीत तर त्या अक्षरांपासून बनलेला संच अर्थात आपले नावच पूर्णतः साठवले जाते. हे अक्षरांचे संच अर्थात नावे आपल्या परिचयाचीच असतात त्यामुळे ती चटकन साठविली जातात. म्हणजे चेतन गुगळे हे नाव आणि आडनाव मिळून एका व्यक्तीचे पूर्णं नाव जरी आपण प्रथमच ऐकत असलो तरी हे नावांचे आणि आडनावांचे शब्द म्हणजेच अक्षरांचे संच आपण पूर्वी ऐकलेले असतात. आता ते इथे आपण एका चेहऱ्याच्या प्रतिमेसोबत आपल्या मेंदूत साठवून ठेवतो. क्रमांक साठवताना आपल्याला जरी दहा आकडे नोंद करून ठेवायचे इतके लहान काम दिसत असले तरी प्रत्यक्षात आपला मेंदू थेट एखादा आकडा साठवू शकत नाही त्याला त्या आकड्यांचा उच्चार साठवावा लागतो. जसे की नऊ पाच पाच दोन शून्य सात सात सहा एक पाच. म्हणजे तसे पाहायला गेले तर दहा आकडे लक्षात ठेवणे हे बारा अक्षरी नाव लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त अवघड आहे. शिवाय इथे कुठला परिचित संच देखील नाही. तसा तो असता तर क्रमांक लक्षात ठेवणे देखील सोपे गेले असते जसे की ४४४४४४४४४४ हा आस्कमी चा संपर्क क्रमांक आहे हे आपल्याला एकदा वाचलं किंवा ऐकलं की लगेच आठवणीत राहतं कारण ते आपल्या मेंदूत दहा वेळा चार या संचाच्या स्वरूपात साठवलं जातं.
ही समस्या जितकी लहान होती तितकंच तिचं उत्तर देखील साधंसोपं होतं, पण आधी एक तर समस्या कधी जाणवलीच नव्हती आणि जेव्हा तिची जाणीव करून दिली गेली तेव्हा तिची उकल लवकर करता आली नाही. जेव्हा मी ती करून दिली तेव्हा "हात्तिच्या! हे तर किती सोपं होतं" असं वाटून गेलं. जीवनातल्या बहुतेक समस्या ह्या अशाच क्षुल्लक असतात. एक तर सहसा त्या जाणवत देखील नाहीत इतक्या सहजतेने पार केल्या जातात आणि कधी आपण तिथे अडखळलोच तर मात्र फरशीवर समोर पडलेली सुई दिसू नये अशी डोक्याची अवस्था होऊन जाते. अशा वेळी चित्त शांत ठेवून समस्येला लहान लहान घटकांमध्ये विभागून तिच्याकडे पाहिलं की ती किती साधी वाटू लागते आणि तितक्याच सरळ सोप्या उपायांनी तिची उकल कशी होते हे मी उर्वरित प्रशिक्षण सत्रात सांगितलं.