सुरुवात

"झाला का स्वयंपाक? सदानकदा आळस.    एक काम करेल तर शपथ. सहा वाजले. आता आठ वाजतील आणि बाईसाहेब purse अडकवून कामाला निघून जातील. घरी म्हातारे सासू-सासरे घरी बसून त्यांच्या येण्याची वाट बघतील" रेवतीबाईंचा सकाळचा तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि कीर्तीचे हात.

"सकाळी सकाळी चहा घेत नाही. काही नाही. ५ वाजतापासून बसते त्या देवासमोर. आम्ही सहाला उठतो तेव्हाच उठते दैवासमोरून. आम्ही उठण्याअगोदर चहा करून ठेवायचा, तर ते नाही. सदानकदा आळस. " कीर्तीने शांतपणाने cooker लावून कणीक मळायला घेतली.

"ही चहा पीत नाही म्हणूनतरी सकाळचा चहा गरम मिळतो. नाहीतर दुपारचे जेवण थंड असते. सकाळी करून ठेवलेले जेवण थंडच होणार ना. दुपारचा चहा मला करावा लागतो. त्याबरोबर खायला पण करावा लागता. थकून जाते. होत नाही आजकाल. आणि रात्रीच्या जेवणासाठी ही येईपर्यंत वाट बघावी लागते. रात्रीसुद्धा आठ वाजता आली की लगेच सुरुवात करत नाही जेवणाला. आधी हात पाय धुवून. दिवा लावते आणि बसते १५ मिनिटंच त्या देवासमोर. इथे पोटात कावळे ओरडत असतात. पण नेम सुटत नाही. " कीर्ती शांतपणाने भाजी चिरत होती

 "काय करतेस गं त्या देवासमोर? एक मुलगा नाही देऊ शकला. मुलगीच झाली न शेवटी. आणि तिचेपण किती कौतुक? सदानकदा कपडे, खेळणे आणि त्या महागड्या पाळणाघरात नेऊन सोडते रोज" इतका वेळ शांत असलेल्या कीर्तीच्या चेहऱ्यावर किंचित राग आणि दुःख आले. पण ते बाजूला सारून तिने भाजी फोडणीला घातली. "मी इतके उपास तापास केले पण नाही झाला मुलगा. मग का सांभाळायचा या कार्टीला? जा. त्या पाळणाघरातच सोड तिला. "

मनातले दुःख न दाखवता कीर्तीने  काव्याला तयार केले. आणि स्वयंपाक टेबलावर झाकून ती आणि     काव्या घरातून बाहेर पडल्या.

 

 

दुपारचे जेवण झाल्यावर रेवतीबाई आणि रघुनाथराव गप्पा मारत बसले होते.

 "काय हो आपल्या लग्नाच्या वेळेस तुम्ही १८ वर्षांच्या. १८वा संपता संपता राहुल झाला. आता तुम्ही फक्त पंचेचाळीस वर्षांच्या आहात. आणि म्हातारपण कसले म्हणताय? " रघुनाथराव मिष्किल स्वरात म्हणाले

"का? १८ वर्षाचे होते तरी सगळी काम केली घराची. "

"कसला काय? पहिले दोन महिने नवलाईत गेले. आणि पुढचे बाळंतपण करण्यात. लग्नाला २ वर्षे होईपर्यंत माझी आई सगळे करता होती. अगदी तुमच्या हातात ताट आणून देण्यापर्यंत. मग कुठे स्वयंपाकघरात तुमची entry झाली. आणि पुढची २० वर्षे स्वयंपाक शिकण्यातच गेली. " रघुनाथराव  डोळे मिचकावत म्हणाले.

"हं... पुरे झाले मागचे उगाळणे. तुम्हाला माझे कौतुकच नाही. सदानकदा घालून पाडून बोलणे. " रेवतीबाई मुसमुसत म्हणाल्या.

"नाही हो. असे नाही. पण आपली सून ऑफिस, घर, मुलं किती छान सांभाळते. काल महेशराव म्हणत होते. किती कर्तबगार आहे तुमची सून म्हणून. त्यांची सून तर घर आणि मुलं त्यांच्यावर आणि त्यांच्या बायकोवर सोडून जाते, घराच्या कमाल हातही लावत नाही आणि नेहमी भांडत असते. आपली कीर्ती तशी नाही. " रघुनाथराव  म्हणाले

"हं... पुरे झाले कौतुक. इतके कौतुक करूनच शेफारलीय ती. आम्ही काय मुले सांभाळली नाही. ही ऑफिसमध्ये काय करते? कॉंप्युटरसमोरच बसते ना? ते कुणीही करू शकते. त्याचा इतका पगार मिळतो म्हणूनच शेफारलीय. तिला खाली आणायचे काम मी करते. " रेवतीबाई फणकारल्या

"अहो, या सुनांना असा मुठीत ठेवला नाही न की उधळतात. कुणाच ऐकत नाही. तुमच्या महेशरावच्या बायकोचे तेच चुकले. मारे माया करायला चालल्या होती. बघा काय झाला. मी कीर्तीला धाकात ठेवला न म्हणून हे करते. आणि आपल्या लेकाच्या मनात पण विष कळवत राहते रोज. म्हणजे त्यांचा संसार मोडका राहील. तिच्या जवळ नाही गेला तर आपल्याच जवळ राहील. एकुलता एक लेक आहे. त्याला असे दूर नाही जाऊ देणार. " रेवतीबाई त्यांना न शोभणाऱ्या हळू आवाजात म्हणाल्या.

"मुलगी झाल्यावर जरा पुळका आला होता बायकोचा. पण पाहा कसा दूर केला त्याला. बायकोपासून आणि मुलीपासून. मुलीला जवळही घेत नाही तो. " रेवतीबाइंच्या चेहऱ्यावर कुत्सिक हसू आले.  

" माझ्या हुशारीने झाला सगळं. आणि तुम्हाला त्याचे काही कौतुक नाही" रेवतीबाई परत मुसमुसत म्हणाल्या. "जाऊ दे. चहाची वेळ झाली. फक्कडसा चहा करा बघू. आणि काल ते महागाचे biscuit लपवून ठेवले होते फडताळावर कीर्ती आणि  काव्या पासून. ते पण घेऊन या. "

 

 

कीर्ती आणि  काव्या  घरी आले. तिने स्वयंपाकाला सुरुवात केली आणि रेवतीबाईंनी तोंडाच्या पट्ट्याला सुरू सुरुवात केली. रात्रीचे जेवण झाले.

"आज कीर्तीच्या खोलीत, राहुलच्या ओरडण्याचा आवाज येत नाहीये. नवरा-बायकोचा गुळपीठ होऊ नये.    त्याला गप्पा मारण्याच्या कारणाने बोलवून घ्या आपल्या खोलीत. रात्रीपर्यंत गप्पा मारून इथेच झोपेल तो. तो झोपला की तुम्ही hall मध्ये झोपायला जा. " रेवतीबाई रघुनाथरावांना म्हणाल्या.

रघुनाथरावांनी राहुलला खोलीत बोलावले.

"राहुल बाळा, कसा गेले तुझा दिवस? थकला असेल ना बाळ माझा. ये. माझ्या मांडीवर झोप. तुम्ही जा हो तिकडे. " रेवतीबाई चेहऱ्यावर ममत्व दाखवत म्हणाल्या.

राहुल रेवतीबाइंच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. रेवतीबाई त्याच्या केसांत हात फिरवत म्हणाल्या "किती काम करतो माझा बाळ. थकला असेल. आम्ही पण थकतो आता घरातले सगळे सांभाळून. घराचे सगळे काम आमच्यावरच पडते. आताशा होत नाही बाबा. तुझ्या बायकोचाही काही उपयोग नाही. ती सदानकदा देवासमोर नाहीतर ऑफिसमध्ये. त्यातून वेळ मिळाला तर  काव्याच्या मागे. तिला आमच्याकडे येऊही देत नाही. नातीलाही आमचे प्रेम नाही बाबा. काय करणार आम्ही म्हातारा-म्हातारी? "

"खूप कंटाळा आला रे बाबा. मी काय म्हणते? आपणा जाऊ यात कुठेतरी फिरायला. परवा तुझा नितीनमामा सिंगापूरला गेला. आपणही जाऊ यात. युरोप-बिरोपला. आता तुझ्या बायकोला सुट्टी मिळणार नाही. तर आपण तिघेच जाऊन येऊ. कशी वाटली आयडिया? "

राहुल विचार करून सांगतो म्हणाला आणि रेवतीबाइंच्या खोलीत झोपला. रघुनाथरावांची हकालपट्टी hall मध्ये झाली.

 

पुढचा दिवशी असाच गेला. पण रात्री राहुलने सांगितले की त्याला युरोपची trip परवडणार नाही आणि रेवतीबाईंची धुसफूस सुरू झाली. "घराचे हफ्ते फेडायचे आहेत. त्या बाईसाहेबांचा पूर्ण पगार तिथेच जातो म्हणे. घराचा सगळं खर्च माझे बाळ करते. आणि ती भवानी हफ्ते फेडते. आता पैसे नाहीत युरोपची ट्रीप करायचे म्हणे. असा अंगाचा तिळपापड झाला. आम्ही इतकी धडपड-दगदग रोज  करून हाती काहीच नाही. साधे युरोपलाही जाता येत नाही. काय करते ही एवढ्या पगाराचे? नक्की आई-बाबांना देत असेल नाही तर घालत असेल त्या गुरूच्या मठात. आता नीतीन आणि वाहिनी १५ दिवसाने येऊन आपल्याला चिडवणार. आपले photos दाखवून खिजवणार. आणि आपण नुसते बघत राहणार. ते काही नाही, आपण जायचे म्हणजे जायचे. युरोप नाही तर देशातच जाऊ आणि ५-स्टार हॉटेल मध्ये थांबू. "

 निर्णय झाल्यावर त्यांचा राग काही अंशाने कमी झाला. त्या रघुनाथरावांकडे बघत म्हणाल्या,    "बघा. मी किती त्याग करते. मीच म्हणून टुकीने संसार चालू आहे. नाही तर ती कीर्ती सगळे उधळून मोकळी झाली असती. आता जा आणि राहुलला खोलीत बोलावा त्यालाच सांगू यात आपल्या बदललेल्या निर्णयाबद्दल. "

पुन्हा एकदा रघुनाथरावांनी राहुलला खोलीत बोलावले.

रेवतीबाई प्रेमळ आवाजात म्हणाल्या "राहुल, ये बाळा. माझ्या मांडीवर झोप. थकला असशील ना. मला माहीत आहे. बँकेत खूप कामे असतात. त्या कीर्तीसारखे कॉंप्युटरसमोरच बसायचे नसते. मी काय म्हणते? तुझा ते युरोपच्या ट्रीपचा राहू दे. आपण इथेच देशातच कुठेतरी फिरायला जाऊ यात. ५-स्टार हॉटेलमध्ये राहू यात. मजा येईल. "

"आई, एक उपाय आहे. आमच्या बँकेची वरणगावला एक शाखा आहे. तिथे कसला तरी काम आहे. 1 महिना खूप काम आहे. पण पैसे दुप्पट मिळतील. जाऊ यात का? आपल्या युरोप ट्रीपचे पैसे निघतील. राहायची सोय बँकच बघेल. " राहुल म्हणाला

रेवतीबाईंचे डोळे चकाकले, "युरोपला जायला मिळणार. मग चालेल की. कसेबसे करू कुठल्यातरी भंगार गावात. कीर्ती आणि काव्यालाही घेऊन जाऊ. काव्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. उद्या बोलू तिच्याशी. झोप तू. "

राहुल झोपल्यावर hallमध्ये जाण्यापूर्वी रघुनाथरावांनी विचारले, "अरे वा. आज कीर्ती आणि काव्याचे प्रेम आले वाटते. त्यांना वरणगावला येऊ देताय. "

रेवतीबाई हळू आवाजात बोलल्या "तसं नाही हो. कुठला ते मागास गाव. तिथे मोलकरीण नाही मिळाली तर काय करायचे? ही फुकटची मोलकरीण घेऊन जाऊ. आणि अजून एक फायदा आहे. हिला आताच 1 महिन्याची सुट्टी मिळाल्यावर पुन्हा युरोप ट्रीपसाठी सुट्टी नाही मिळणार. आणि काव्याचीही शाळा सुरू होणार. मग युरोपला आपण तिघेच जाऊ. "

"बघा. मी किती हुशार आहे ते. सगळे जमवून आणले. मी म्हणून तुम्हाला आणि राहुलला युरोप बघायला मिळणार. " रेवतीबाई तोऱ्यात म्हणाल्या.

"जा आता बाहेर. इथे जागा नाही. " रेवतीबाई फणकारल्या. रघुनाथराव hallमध्ये झोपायला गेले.

 

पुढचे काही दिवस तयारीतच गेले आणि रेवतीबाई व कुटुंब वरणगावला आले.

रेवतीबाई मनातल्या मनात म्हणाल्या "किती सुंदर जागा आहे. अगदी माझ्या माहेरची आठवण आली. तिथे पण असेच सुंदर वातावरण होते. पण खेळायच्या-बागडायच्या वयातच लग्न झाले आणि  एका वर्षाच्या आत बाळंतपण. त्यामुळे कसली हौस नाही की मौज नाही. ह्यांचाही स्वभाव असा बावळट आहे ना. जाऊ दे. मुलाला हाताशी धरून सगळ्या इच्छा पूर्ण करून घेऊ. "

त्यांची गाडी एका भव्य वाड्यासमोर थांबली. रघुनाथरावांकडे हातातली purse देत रेवतीबाई गाडीतून उतरल्या.

"सुरेख वाडा आहे. " रघुनाथराव वाड्याकडे बघत म्हणाले "वाडा कसला राजवाडाच आहे. सारे कसे शांत शांत आहे. अगदी पाखरांचाही आवाज नाही आणि भर उन्हाळ्यात थंडी कसली वाजतेय नाही? "

"अहो, आपल्याला शहराची सवय. तिथे सारखा मेला घाम आणि चिकचिक.    इथल्या वनराईने आणि शुद्ध हवेने उकाडा कमी केलाय एव्हढंच. फार काही गारवा नाही. ही कीर्ती का अडखळतेय सारखी? बावरून बघतेय वाड्याकडे. माहेरी कधी वाडा बघितला नसणार. " राहुल जवळ नाही हे बघून रेवतीबाई फणकारल्या.

 

वाड्यात प्रवेश केल्या केल्या त्याचे भव्यपण आणि श्रीमंती बघून रेवतीबाई सुखावल्या.

"कुठली खोली घ्यावी बरे? सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर शोधू यात. त्या कीर्तीच्या खोलीपासून सगळ्यात दूर. " सगळीकडे नजर फिरवत असताना एक काळी मांजर आडवी गेली आणि रेवतीबाई दचकल्या. "चिटपाखरू नाही म्हणे. ही मांजर आहे की टवाळी. "

रेवतीबाईनी माडीवरची एक मोठी खोली बघून बस्तान बसवायला सुरवात केली. रघुनाथरावांकडे रागारागाने बघत म्हणाल्या, "काय बाई नाटकं एक एक या कीर्तीची! वाडा अशुभ वाटतो म्हणे. का? तर इथे देवघर नाही. देवभक्तच मोठी! येता येता आपले देव आणि पोथ्या काही विसरली नाही. मग मीच म्हणाले, बसव त्यांचे बस्तान तुझ्याच खोलीत आणि कर देव-देव दिवस रात्र. "

"आमची खोली साफ करून दे म्हटले तर म्हणते कशी, या मजल्यावर येणार नाही. हा मजला अशुभ वाटतो. आळशी कुठची! एक काम करेल तर शपथ. अहो, सगळं नीट साफ करा. प्रवासाने अंग शिणलाय. मी जरा  अंग टाकते. साफसफाई झाली की राहुलला दाखवेन की तुझ्या म्हाताऱ्या आईकडून किती काम करवून घेतला तुझ्या बायकोने. " रेवतीबाईनी पलंगावर झोपूनच ऐकवले. "कीर्तीचा स्वयंपाक झाला की उठवा. "

 

किती वेळ झोपल्या कोण जाणे. कशानेतरी जाग आली आणि त्या दचकून जाग्या झाल्या. संध्याकाळ झाली होती खोलीतला गारवा खूपच वाढला होता. सारखं कुणीतरी आपल्यावर जळजळीत नजर रोखून आहे असे वाटत होते. रेवतीबाई घाबरल्या आणि मग आपल्याच घाबरटपणावर चिडल्या.

रेवतीबाई चिडून सगळ्यांना शोधात खाली आल्या. कीर्ती स्वयंपाक करत होती आणि राहुल दिसत नव्हता. ही सुवर्णसंधी दवडू न देता रेवतीबाईनी आपला तोंडाचा पट्टा सुरू करायला तोंड उघडले. पण का कुणास ठाऊक ते काळे मांजर समोर आले आणि रेवतीबाईच्या अंगाला घाम सुटला. त्या लगेच बाहेर आल्या.

 

रात्रीचे जेवण झाले आणि रेवतीबाई आपल्या खोलीत आल्या. आज खरंच बरे वाटत नव्हते. आज राहुलला आपल्याच खोलीत झोपायला बोलवावे, असा विचार त्या करत होत्या. तेव्हढ्यात कुणीतरी खोलीबाहेर धावत गेले. रेवतीबाई वैतागल्या, "काव्याच असणार. सारखी धावत पळत असते. किती वेळा सांगितला पोरीच्या जातीने असा पळू नये. नातू असता तर खूप पळू दिले असते. पण नशिबात ही कार्टी होती न. "

कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. "झाली का रडारड सुरू या काव्याची? " आत शिरत असणाऱ्या रघुनाथरावांना त्या म्हणाल्या.

"रडारड? काव्या तर कधीच झोपली. प्रवासाने थकली होती. " रघुनाथराव पलंगावर बसत म्हणाले.

"मग आता धावत कोण गेले? आणि तो रडण्याचा आवाज? " रेवतीबाई जवळजवळ ओरडल्याच.

"कोण होते? मी तर आताच तिथून आलोय, मला तर कुणीच दिसले नाही. तुम्हाला भास होत असेल. तसाही वय होत आलाय आपला. " रघुनाथराव मिष्किल स्वरात म्हणाले.
"हं... पुरे झाले चिडवणे. अजून पन्नाशीच्या जवळही नाही मी. त्या कीर्तीला सारखे ऐकवत असते म्हणून खरंच म्हातारी नाही झाले. " रेवतीबाई फणकारल्या "आणि काय हो? कुठे गेला होता दुपारी? किती वाट बघितली. "
"अहो, मी, कीर्ती आणि काव्या मंदिरात गेलो होतो. इथे जवळच कृष्णाचे मंदिर आहे. छोटेसेच आहे पण खूप सुंदर आहे. आपणही जाऊ कधीतरी फिरत- फिरत"
"काही नको. मलाही नाही देवाला लागायचे कीर्तीसारखे. ती असते देवासमोर सारखी तेव्हढा पुरे. मीही देव-देव करायला लागले तर घराचे वाटोळे होईल. एक काम होणार नाही" रेवतीबाईंनी ब्यागेतून शाल काढत आवाज हळू करत विचारले "त्या कीर्तीचे झाले का आवरणे? राहुल कुठे आहे हो? दिसला नाही जेवणानंतर. "
"आल्या-आल्या कुबट वास येत होता. तो कुठून येत होता ते शोधायला गेलाय. " रघुनाथराव म्हणाले
"कसला वास? बरेच दिवसापासून घर बंद होते म्हणून वास येत होता. उगाच माझ्या बाळाला कामाला लावले. जा घेऊन या त्याला. थकला असेल तो. " रेवतीबाईंनी आवाज वाढवत हुकूम केला आणि रघुनाथराव राहुलला बोलवायला गेले.

"ती कीर्ती बसली असेल टाईमपास करत. " रेवतीबाईंची धुसफूस सुरू झालीच होती तेव्हढ्यात बाहेर परत पावलांचा आवाज झाला. रेवतीबाई शाल सावरत उठल्या आणि लाइटस गेले.

"आता आले का मेणबत्ती शोधणं? त्या भवानीने कुठे ठेवली कुणास ठाऊक? " रेवतीबाई चडफडत मेणबत्ती शोधायला लागल्या. अंधारात पायावरून काहीतरी गेल्यासारखे वाटले तशा त्या दचकल्या. "अगबाई, इतके दिवस बंद घर साप-बीप तर नाही न घरात? काहीतरी बुळबुळीत होते. पण हा कसला विचित्र आवाज घासल्यासारखा. सापाचा आवाज कसा असेल असा? "
"गारठा का वाढला? कोण आहे तिकडे? कीर्ती? " रेवतीबाईंना दरवाज्यावर एक स्त्रीची आकृती दिसली आणि त्यांनी हाक मारली "कीर्ती, मेणबत्ती दे गं जरा. आता या म्हातारपणी धडपडले ना तर तुम्हालाच सांभाळावा लागेल बघ. "
"अरे.... ही कीर्ती जागेवरची ढिम्म हालत नाहीये. कसला माज आलाय कुणास ठाऊक. थांब आता सरळ करते हिला. "
"काय गं ए.. " रेवतीबाई काही बोलायच्या आतच त्यांना कुणीतरी धक्का देऊन खाली पाडलं. त्यांनी मागे वळून बघितला तर मागे कुणीच नव्हतं. खिडकीतून पौर्णिमेचे टिपूर चांदणे आत येत होते. खिडकीतून फक्त वठलेले झाड दिसत होते. हवा म्हणावी तर खिडकीवरचे पडदेसुद्धा हालत नव्हते.
" मी हवेने पडण्यासारखी राहिले का आता? मग धक्का कुणी दिला? "रेवतीबाई गोंधळल्या. आणि दाराकडे बघितले, ती आकृती तशीच उभी होती. "तुझी म्हातारी सासू पडली आणि तिला बघत राहिलीस. मदत करायचे सोडून सासूला घाबरवतेस? थांब. चांगला धडा शिकवते. असा समाचार घेते" रेवतीबाई तिरमिरत उठणार तेव्हढ्यात
खिडकीचे तावदान एकमेकांवर आपटू लागले आणि दारे वाजू लागल्या. वारा तर नव्हता, मग हे असे का होतेय ते रेवतीबाईंच्या लक्षातच येत नव्हते. आता मात्र त्यांना घाम फुटला होता. आणि खूप भीती वाटायला लागली. "अहो.... "त्यांनी खाली बसल्या-बसल्याच हाक मारायला सुरुवात केली. "राहुल..... "
परत एकदा काहीतरी बुळबुळीत पायावरून गेले आणि रेवतीबाईंच्या तोंडातून आवाज फुटणे बंद झाले. त्या डोळे फाडून दारातल्या आकृतीकडे बघत होत्या. अचानक ती आकृती गायब झाली. बाहेर धावायचे आवाज येऊ लागले. रेवतीबाईंच्या हातापायाला घाम फुटला.

तेवढ्यात राहुल आणि रघुनाथराव दारातून आत आले. आणि खाली पडलेल्या रेवतीबाईंकडे आश्चर्याने बघत राहिले. "तिथे... तिथे काहीतरी होते. " रेवतीबाई बोट दाखवत म्हणाल्या "कीर्ती... कीर्ती होती. "
"कीर्ती कशी असेल? ती तर स्वयंपाकघरात आवराआवर करत होती. आम्ही तिथूनच मेणबत्ती घेऊन आलो आणि ती झोपायला गेली. " रघुनाथराव रेवतीबाईंना उठवत म्हणाले.
"त्या काळ्या मांजरीवर पडता-पडता वाचलो. ती कधीची घुटमळते आहे कीर्तीभोवती" राहुल मेणबत्ती लावत म्हणाला.
"ती टवळी आहेच का? दुधासाठी घुटमळत असेल" रेवतीबाई नॉर्मल होत होत्या.
"हो न. कीर्तीचा भारी लळा लागलाय तिला. आताही तिच्या खोलीच्या दाराशी बसली आहे. पण तुम्ही खाली काय करत होत्या? " रघुनाथरावांनी विचारले.
"अहो, मी काय हौस म्हणून खाली बसले होते का? काहीतरी मूर्खासारखे बोलू नका. त्या कीर्तीने मनात भरवले आहे की वाडा अशुभ आहे, म्हणून असे भास होत आहेत. " रेवतीबाई फणकारल्या.

अचानक कुणाचीतरी किंकाळी ऐकू आली आणि तिघेही दचकले. तिघेही दरवाज्याच्या दिशेने बघायला लागले आणि दरवाज्यात ज्वाळेचा प्रकाश दिसला. जणू काही बाजूच्या खोलीला आग लागली होती. आग विझवायला राहुल आणि रघुनाथराव पुढे सरसावले. पण रेवतीबाई जागाच्या जागी गोठल्या. पुन्हा एकदा ती आकृती दाराजवळ होती. पण या वेळेस ती आकृती स्वतःच आगीत होरपळल्यासारखी दिसत होती. एक जीवाच्या आकांताने प्रयत्न करणारी काळी आकृती आणि तिच्या आजूबाजूला वेढणाऱ्या ज्वाळा असे दृश्य दारासमोर दिसत होते. आता तिघेही डोळे फाडून दारातल्या आकृतीकडे बघत होते.

पुन्हा एकदा किंचाळी ऐकू आली. आता दारासमोर काही नव्हते. आकृती आणि ज्वाळा गायब झाल्या होत्या.
"मला हे काहीतरी काळ-बेरं दिसतंय" रघुनाथराव काळजीत म्हणाले. "आधी या खोलीतून बाहेर निघू या. " घाईघाईने तिघेही खोलीबाहेर आले. त्यांनी मागे वळून खोलीच्या दाराकडे बघितले, पुन्हा एकदा ती आकृती दारावर उभी होती, तिची जळजळीत नजर त्यांच्यावर रोखलेली होती. तिघांची भीतीने गाळण उडाली आणि तिघेही शक्य तितक्या लवकर जीना उतरू लागले. पण ती आकृतीही त्यांच्या मागे येऊ लागली. पुन्हा एकदा रडण्याचा आणि पाळण्याचा आवाज येऊ लागला. परत घासण्याचा आवाज येत होता. पण या वेळेस तो आवाज चहूबाजूंनी येता येता होता. कुणीतरी पाय घासत घासत त्यांच्या भोवती फिरत होते. अंधारात काहीच दिसत नव्हते. फक्त आवाज ऐकू येत होते.
आता मात्र तिघांचाही भीतीने जीव जात होता. कशाचीही परवा न करता ते तिघे घराबाहेर पळाले.

वाड्याबाहेर पडल्यावर त्यांनी मागे वळून पहिले तेव्हा तीच आकृती वाड्याच्या दाराशी उभी होती आणि त्यांच्याकडे बघत होती. तिच्या मागे ज्वालांचा प्रकाशही दिसत होता.

"तिकडे जाऊ यात. तिकडे कृष्णाचे मंदिर आहे. तिकडे आपल्याला आसरा मिळेल. " रघुनाथराव धापा टाकत म्हणाले.

मंदिरात सगळे उभे होते. मंदिराचे कवाड बंद होते पण ओसरीवर जागा मिळाली होती.
"काय बाई भयंकर होते. पण वाचलो त्यातून" रेवतीबाई सुस्कारा सोडत म्हणाल्या "मी म्हटलंच होता, आपण कधी कुणाचे वाईट केले नाही की वाईट चिंतले नाही. आपले वाईट होणे शक्यच नाही. "
"कीर्ती आणि काव्याचे काय? " रघुनाथरावांनी काळजीत विचारले.
"जाऊ दे. त्यांना वाचवायला कोण जाणार. आपण तिघे वाचलो ते खूप आहे. " रेवतीबाई फणकारल्या.
"अग पण आपली सून आणि नात... " रघुनाथराव डोळ्यात पाणी आणून म्हणाले.
"हं... पुरे झाले. आपलाच जीव धोक्यात होता. कसेबसे वाचलो आपण. " रेवतीबाई तिरमिरीने म्हणाल्या.
"अग पण, त्यांचे काय हाल झाले असतील? " रघुनाथराव काकुळतीला आले होते.
"ते आपण उद्या सकाळी बघू. आता त्या वाड्यात सकाळशिवाय मी जायची नाही आणि तुम्हाला दोघांनाही जाऊ देणार नाही. " रेवतीबाई ठामपणे म्हणाल्या आणि तिथेच ओसरीवर आडव्या झाल्या.

-स्फिंक्स

(इतरत्र प्रकाशित)