अनामिका

           त्या काळात मी मनोगतावर पडीक असायचो. तेव्हा तुझी 'कॉफी' दिसली. म्हटलं बघूया कशी वाटतीये ही कॉफी !
कॉफी हा प्रकार असा आहे, कितीही कडू असली तरी आपल्याला हवी असते. कडवटपणा जितका जास्ती, तितकी तिची नशा जास्ती ! तुझी 'कॉफी' वाचताना असंच काहीसं वाटलं.
कथेमधली 'अनामिका' इथेच माझ्या आजूबाजूला बसते अस वाटून गेलं एका क्षणाला !
एकतर मला वाचनात फार रस नाही. पण एखादा लेख आवडला की त्या लेखकाच्या इतर लिखाणावर नजर टाकायची माझी सवय.
'अनामिका'. ह्याच नावानं लिहितेस ना तू?  एका टिचकी सरशी तुझं सगळं लेखन माझ्यासमोर मनोगतानं आणून ठेवलं. बरंच लिहून ठेवलं आहेस की !
मग काय. प्रवास सुरू झाला. तुझ्या कथा-कविता-चारोळ्या वाचून काढायचा.  वेळ मिळेल तसा मी तुझी एक एक कथा वाचायला लागलो.
कसं काय इतकं मस्त शब्दांकन जमतं तुला? प्रत्येक कथेमध्ये एक जादू आहे. असं वाटतं ती कथा, त्यातील प्रसंग; आपल्याच भोवती घडतोय.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या लहान सहान गोष्टीसुद्धा किती सहज मांडल्या आहेस.  आपल्या मनाचे कोनाडे किती छान चित्रित केले आहेस !
कोण आहेस गं तू? असं मनाला भिडणारं लिहायला कसं जमतं तुला ?
एक समजलं, की तू नक्कीच एखाद्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला असणार. कारण तुझ्या काही कथा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या, माझ्यासारख्याच 'पात्रांवर' लिहिलेल्या !
एका लेखात तू एक वाक्य लिहिलंयस. "माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. आणि एकांतात, तू सोबत नसतोस तेव्हा ते वाढतंच जातं. :-)"
वाक्य वाचलं आणि खुर्चीतून उठून ताडकन उभा राहिलो. आजूबाजूला एक नजर फिरवली. आजूबाजूच्या अनेक परिचित अपरिचित चेहऱ्यांमध्ये तुला शोधायला लागलो.
मनात म्हटलं "इथंच आसपास आहे रे हि, नक्की कोण ते सापडत नाही !"
एखाद्या लिखाणात प्रेमभंग, तर कधी मैत्रीमध्ये ताटातूट ! कधी कोणाला जुनं प्रेम पुन्हा मिळालं, तर कधी कोणी प्रेम व्यक्तच करू शकला नाही म्हणून आयुष्यभर पश्चात्ताप करीत बसला !
असं खरंच घडतं का प्रत्येकाच्या आयुष्यात? माहीत नाही. कथेतील पात्रांच्या दु:खाची झळ माझ्या मनाला बसू लागली. माझ्या नकळत !
ह्या पात्रांची निर्मिती ज्यानं केली त्या व्यक्तीविषयी माझं कुतूहल वाढू लागलं. असं वाटायचं, की लेखातील पात्र हे तुझीच गोष्ट सांगत आहेत. त्यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती तुझ्याबद्दलही वाटू लागली. 
असं म्हणतात, की मन दु:खात भरडून निघत असेल तर आपोआपच चांगले शब्द कागदावर उमटायला सुरुवात होते.
खरंच असं होतं का गं?
कोण आहेस तू?
तू सुद्धा तश्या वेदनांमधून जातीयेस का गं? तुलाही कोणी सोडून गेलं का आयुष्यात? त्या कथेतील पात्रांप्रमाणे तू सुद्धा विरह सहन करतीयेस?
एकदा ह्या शब्दांमागचा चेहरा बघायचा आहे. एकदा.
पण 'अनामिका' तू ! कसं कळणार कोण आहेस ? तुझं शेवटचं लेखनही तू जवळपास तीन वर्षांपूर्वी केलं होतंस ! तुझ्या लेखांवर असंख्य प्रतिक्रिया येऊन पडल्या होत्या, त्यावर उत्तर लिहायलासुद्धा तू मनोगतावर फिरकलेली दिसत नाहीस.
शेवटी न राहून तुला मनोगतावर व्यक्तिगत निरोप धाडला !
त्यालाही तुझं उत्तर नाही. अपेक्षितच होतं. कारण तो निरोप वाचायला तू मनोगतावर फिरकली पाहिजेस ना ! कुठे गायब झाली आहेस?
खरंतर मला मनोगतावर यायला उशीरच झालेला होता. कमीत कमी चार वर्ष उशीर ! कारण त्याच काळात मनोगतावर भरपूर प्रमाणात चांगलं लेखन प्रकाशित झालेलं मी बघितलं आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यांना उत्तरं, किती त्वरित यायची.
मनोगताच्या सर्वोच्च काळात आपण त्याचे सदस्य नव्हतो ह्याची खंत आजही वाटते. असो.
अनेक दिवस प्रतीक्षा केली. माझ्या व्यक्तिगत निरोपास तुझं उत्तर येईल ह्याची आशा संपुष्टात आल्यावर मी मनोगत च्या प्रशासकांनाच एक व्यक्तिगत निरोप धाडला !
"मा. प्रशासक, ज्यांना आपण व्यक्तिगत निरोप धाडतो, त्यांना एक विरोप (ईमेल) पाठवता येईल का? त्या निमित्तानं ते मनोगतावर लॉगिन तरी करतील !"
मनोगताला एक अवकळाच आली होती. प्रशासकांनी उत्तर धाडलं - "मनोगताची सध्याची आवृत्ती अतिशय जुनी झाली आहे. त्यात तुम्ही सुचवलेला बदल होऊ शकणार नाही."
झालं. तुझ्याविषयी जाणून घेण्याचं तेही दर बंद झालं.
तुझे लेख वाचता वाचता अगदी अखेरच्या लेखावर येऊन पोचलो होतो. तुझ्या लेखनाची शिदोरी संपत आल्याची चिंता मनाला सतावू लागली.
टिचकी मारून लेख उघडला. नाव होतं 'नवीन सुरुवात'. लेख आवडला हे वेगळं काही सांगायला नकोच.
पण आश्चर्य म्हणजे आज खाली तू तुझं नाव लिहिलं होतंस.
"विद्या".
चलातर, तुझं नाव विद्या आहे हे तरी समजलं !
माझ्या ओळखीतल्या दोन्ही 'विद्या' चटकन डोळ्यासमोरून गेल्या. छे, त्या कसल्या इतकं सुंदर लेखन करतायत !
तुला शोधण्यासाठी तुझ्या नावाचा हा धागा किती उपयोगी येतोय बघू म्हटलं. काही फायदा झाला नाही. एका शब्दावरून तुला कसं शोधणार ! गुगल वर बघितलं तर हजारो विद्या आल्या. तुझ्या कथांवरून तू कशी असशील ह्याचा एक अंदाज मी बांधला होता.
नाहीच सापडलीस.
तुझे सगळे लेख अनेक वेळेस वाचून झाले. तुला शोधण्याचा नादही सोडून दिला. मनोगतावर माझं यायचं कमी झालं. तसंही आजकाल कोण इथे लेखन प्रकाशित करताना दिसत नाही.
जवळपास तीन वर्ष गेली. आज पुन्हा एकदा तुझी 'कॉफी' घेतली. नेहमीसारखीच बहारदार ! कडू, पण हवीहवीशी कॉफी !
आज वाटलं, बघूया ही अजून कुठे लेखन करतीये का.
तुझ्या एका लेखातलं एक वाक्य गुगल वर टाकलं. तंतोतंत जुळणारा एक धागा मिळाला. मायबोली चा !
मग काय, क्षणात मायबोली चा सदस्य झालो. 'तुझा चाहता' म्हणून नोंदही केली. मायबोलीवर अजूनही तू लेखन करतीयेस हे बघून थोडा धीर मिळाला.
तुझा फोटो बघितला. तुझ्या कथांवरून तू कशी असशील ह्याचा एक अंदाज मी बांधला होता. कल्पनेपेक्षा फार वेगळी नव्हतीस तू !
तू तिथे दिलेल्या फेसबुक पेज वर गेलो. तिथे तुझ्याबद्दल अजून काही गोष्टी समजल्या. हजारोंच्या संख्येनी तुझे चाहते. तुझं अमेरिकेत वास्तव्य, संगणक कंपनीत कामाला, दोन मुलांची आई. एक प्रसिद्ध लेखिका.
त्या कथांमधल्या प्रत्येक शब्दामागे हा चेहरा आणि ही व्यक्ती दडलीये तर !
इतके दिवस तुला शोधत होतो. आज तू दिसलीस. तुझ्या एका चाहत्यानं तुला शोधून काढलं !
आता पुढे ?
माहीत नाही.
मला थोडं विचित्र वाटतंय ! जरा अस्वस्थ.
तुला शोधून काढल्यावर माझा शोध संपला होता. त्याचं समाधान मला अपेक्षित होतं. पण ते समाधान मला मिळालं नाही.
बहुतेक मी लेखामधील त्या अनामिकेच्या शोधात होतो ! कथेच्या निर्मात्याच्या नाही.
अनामिका आणि विद्या ह्या दोन्हीमधला फरक मला आजपर्यंत समजलाच नाही. म्हणूनच इतक्या प्रयत्नांनी आज तुला शोधून काढल्याचं समाधान माझ्याकडे नाही.
मी तुझ्या कथांच्या प्रेमात पडलो, त्यात मला जी अनामिका दिसली, ती पुन्हा एकदा तुझ्या लेखांमधून मला भेटेल अशी अपेक्षा आहे.
-समाप्त.