ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ---?

        ब्र्ह्माचा शोध लेखाला एक उपसंहार जोडावासा वाटतो. लेखाची सुरवात हरदासी कथेने केली आहे तश्याच शेवटी दोन हरदासी कथा लिहितो.
        आचार्य शिष्यांबरोबर संवाद करत असतात, "एक ब्रह्मच काय ते सत्य आहे बाकी सर्व जग म्हणजे आभास आहे‌. समोर जे झाड , नदी इतकेच काय तुम्ही व मी हे सगळे फक्त आभास आहे " शिष्य भारावून जातात. व आचार्यांच्या निवेदनावर विचार करत असतात. तेवढ्यात समोरच्या अरण्यातून जोरात धावत एक हत्ती येतो, त्याबरोबर शिष्य घाबरून त्याच्या वाटेतून दूर होतात . आचार्यही त्यांचेच अनुसरण करतात  हत्ती सरळ कोणाकडेही न पहाता निघून जातो‌. सर्व पुन्हा आपापल्या जागेवर परत येतात. एक शिष्य हळूच विचारतो,
 "आचार्य एक विचारू का ? "
"अवश्य" आचार्य होकार देतात. शिष्य विचारतो,
"आचार्य सगळाच जर आभास तर हत्ती हाही आभासच तरी आपणही आमच्यासारखेच घाबरून पळ का काढलात? "
आचार्य हसून उत्तर देतात , "अरे माझे घाबरणे हाही एक आभासच होता"
        दुसरे एक स्वामी वयोवृद्ध झालेले शिष्यांना सांगतात, "माझे आता वय झाले आहे, कोणत्याही क्षणी मला हे जग सोडून जावे लागेल तर त्यापूर्वी मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या‌  शिष्य कान देऊन ऐकतात, स्वामी म्हणतात "पुढ च्या जन्मी मला डुकराचा देह धारण करावा लागणार आहे आणि त्यानंतर मला मोक्ष मिळणार आहे म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त होणार आहे तरी नीट लक्षात ठेवा त्या रूपात राहून पृथ्वीवर काही काळ मला काढायचा नाही तेव्हां माझा जन्म होताच मला लगेच मारून टाका म्हणजे या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी कायमचा सुटेन "
              शिष्य मोठ्या दुःखाने गुरूंची आज्ञा मान्य करतात. थोड्याच कालावधीनंतर स्वामी शेवटचा श्वास घेतात. त्यांचे अंतीम क्रियाकर्म झाल्यावर   सांगितल्याप्रमाणे त्यांचा पुनर्जन्म झाला तो डुकराच्या पिल्लाच्या स्वरुपात ! डुकराचे असले तरी पिल्लू तसे गोजिरवाणे दिसत  होते त्यामुळे लगेच त्याला ठार मारणे शिष्यांच्या जिवावर येते त्यामुळे ते म्हणतात , " राहू दे की थोडा वेळ, तेवढाच स्वामींचा सहवास" म्हणून त्याचे बागडणे ते काही काळ पाहत राहतात पण तरी शेवटी काही वेळाने गुरूंना दिलेले वचन पाळले पाहिजे याचे भान त्याना येऊन ते मोठा सुरा घेऊन मोठ्या दुःखाने त्या पिलाची  मान पकडून त्याच्यावर सुरा चालवायला निघतात, तर त्यांच्या तावडीतून धडपड करून सुटून ते पिल्लू दूर जाऊन म्हणते , " नको नको मला आता असेच छान वाटते " 
      दोन्ही कथांवर भाष्य करण्याची  कुवत माझ्यात आहे असे मला वाटत नाही.