बैठे कामःआराम की हराम?

नमस्कार. आम्ही माहिती तंत्रज्ञानातील आणि इतर संगणकीय बैठ्या क्षेत्रातील 'बुद्धिजीवी' वीर. आमचं डोकं आणि संगणकाच्या कळफलकावरील बोटे या दोनच काय त्या 'चालणाऱ्या' गोष्टी. हातही खूप चालतीलच असं नाही. 'ctrl A','कॉपी','कट','पेस्ट' ही वरदाने आम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा वापरतोच.  


आम्ही 'बुद्धिजीवी' म्हणे. डोकं चालवणे(किंवा कधीकधी तसं दाखवणे) या श्रमाच्या मोबदल्यात आम्हाला सर्व काही बसल्या जागी हवं असतं. चहा कॉफी यंत्र, फोन,वातानुकूलन,शक्यतो सर्व संगणकावर,जे नाईलाजाने कागदोपत्री ठेवावे लागते त्यासाठी बसल्या जागी हात लांबवून घेता येतील किंवा चार पावलांवर असतील अशी फायलींची कपाटे. पलीकडे बसलेल्या मित्राकडे पण आम्ही चालत जात नाही. आमची 'एक्झिक्यूटीव्ह' खुर्ची बसूनच सरकवत जातो. नोकरी बघतानाच कार्यालयाला जायला लिफ्ट आहे ना हे पाहून घेतो. पार्किंगपर्यंत आणि पार्किंगपासून कचेरीपर्यंत चालावं लागतं म्हणून आम्ही किती कुरकुरतो. संध्याकाळी घरी यायच्या ऐवजी रात्रीच घरी येतो. एकदा आलो घरी की कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडेपण जात नाही. कापलेली भाजीच घरी मागवतो. खूपच उशीर झाला तर पोळ्या पण विकतच आणतो. किंवा ना, शक्यतो बाहेरुन येतानाच कचेरीतून संध्याकाळचा नाश्ता खाऊन येतो, म्हणजे घरी आल्यावर खिचडी टाकली की झालं. 


हातात आम्ही थोडा जास्त पैसा खेळवतो आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवणारी यंत्रे खरेदी करण्यात करतो. वॉशिंग मशिन पाहिजेच. मिक्सर, ज्यूसर, रिमोट वाला टीव्ही आणि रिमोट वालाच प्लेयर..'कमीत कमी श्रम आणि सोप्यात सोपं' हे आमचं ब्रीदवाक्य आहे.


तसे आम्ही श्रमही करतो, पण डोक्याचेच. तासनतास खुर्चीवर बसतो, पण वेडेवाकडे रेलून. पाठीच्या कण्याला ताठ राहण्याची सवयच नाही. तासनतास संगणकाच्या पडद्याकडे डोळे तारवटून बघत बसतो. मग थकवा घालवायला सिगारेट किंवा चहा कॉफी मारतो, नाहीतर बाहेर मिळेल ते चिप्स वगैरे चमचमीत खाद्य चरत बसतो. रविवारी कधीकधी साहेबांबरोबर ओल्या पार्ट्या करतो. कचेरीतही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मलई कोफ्ता किंवा पिझ्झा बर्गर वडापाव चापतो. जर पिझ्झा किंवा बर्गर खाल्लं तर पाण्याऐवजी कोक पेप्सी ढोसतो. कामाच्या भरात आम्ही जेवणाच्या वेळा चुकवतो आणि मग वडापाव किंवा डोसा यावर वेळ मारून नेतो. कामात चिडचिड झाली तरी वरवर हसतो. आणि ताणाने डोकं दुखत असलं तरी 'शो मस्ट गो ऑन' म्हणून गोळी घेऊन परत कामाला लागतो..


वर्षानुवर्ष अशी जातात. आम्ही 'तरुण आहे तोपर्यंत लाईफ उपभोगा' म्हणून अनियमित दिनक्रम आणि सवयी नियमित चालूच ठेवतो. पण हल्ली चुकून माकून दोन जिने चढावे लागले तर दम का लागतो असं आम्हाला कोडं पडतं. वयोमानानुसार थकूनही आमचे आई वडील आमच्यापेक्षा जास्त उत्साही आणि काटक असतात. आम्ही मात्र क्वचित पर्वतीच्या पायऱ्या चढायलाही नकार देतो आणि ज्या मंदिराच्या नाकाशी पार्किंग असेल तिथे जाऊन दर्शन घेऊन येतो..पाठ का दुखते आणि पोट का सुटतं म्हणून आम्ही तज्ज्ञ लोकांकडे जातो. सल्ले आणि औषधांसाठी पैसे ओततो. केस जरा जास्तच गळतात हल्ली, म्हणून महागडी औषधं आणि तेलं सुरू करतो. पण जीवनशैली मात्र बदलत नाही. 'पर्यायच नाही.' असं म्हणून आपण पर्याय शोधत बसत नाही.


अशीच आणखी काही वर्षं जातात..तिशी पस्तिशीतच बीपी, हार्ट आणि डायबिटीस सर्वच हात धुऊन मागे लागतं. कमावलेले पैसे तपासण्या आणि दवाखान्यांकडे वाहू लागतात. डॉक्टरच खडसावून सांगतात आणि हजार पथ्यं देतात. योगा, प्राणायाम, चुंबकचिकीत्सा, रेकी.. जो जो जे जे काही सांगेल ते आम्ही अजमावून बघतो. 'सिगारेटी पीत नाही, जरा जास्त बिस्कीटं खाल्ली तर बिघडलं कुठे?' असे युक्तिवाद स्वतःशीच करत बसतो. 'इतरांसारखे आपण आपल्या वयाचे दिसत नाही' म्हणून खंत वाटते.. आपलेच आधीचे फोटो पाहून आपण उसासे सोडतो. त्यातल्या त्यात उपाय म्हणून बाजारात कुठलंसं अँटी रिंकल क्रीम शोधतो..पण आपलं काही चुकतं असं आपल्याला मुळी वाटतच नाही. कारण आपल्याकडे 'पर्यायच नसतो.'


खरंतर आम्ही ठरवलं तर तिशी पस्तीशी येण्याआधीच या सर्वांवर उपाय शोधू शकतो. अगदी सर्वच नाही तरी होणारं अर्धं नुकसान तरी टाळू शकतो. खरंतर आम्हीमधला कोणीही 'मी' हे उपाय जास्त कष्ट न घेताही करू शकतो.
१. एक्झिक्यूटीव्ह खुर्चीची उंची व्यवस्थित करून ठेवणे व त्यावर ताठ बसणे.
२. वेळी अवेळी चहा कॉफीवर पर्याय शोधणे. सरबत किंवा काही नसल्यास घरुन लिंबू घेऊन जाऊन लिंबू पाणी. 
३. दुपारच्या जेवणात जड भाज्या कमीत कमी व कोशिंबीरी जास्त.
४. रोज जास्तीत जास्त पाणी पिणे.
५. लिफ्टऐवजी जिने चढणे.
६. आठवड्यातून एकदोनदा बाथरुमची फरशी घासणे.
७. घरात जास्तीत जास्त वेळा आतबाहेर करणे.
८. ओल्या पार्ट्यांत कोक पेप्सी दारू ऐवजी फळांचे रस पिणे.
९. सकाळच्या नाश्त्यात तेलकट खाण्याऐवजी पोळी, कच्चे तेल दाण्याची चटणी किंवा सॅण्डविच खाणे.
१०. मित्रांबरोबर सिगारेट किंवा चहा कॉफी या मार्गाने वेळ घालवण्याऐवजी त्यांना फिरत फिरत गप्पा मारण्यास प्रवृत्त करणे.
११. जितक्यादा शक्य आहे तितक्यादा कचेरीत डोळे पाण्याने धुणे.
१२. राग, ताण मनात न ठेवता ताबडतोब चांगल्या मित्राला/मैत्रिणीला बोलून मन हलके करणे आणी त्यांनाही तसे करण्यास प्रवृत्त करणे.
१३. काम करताना चिप्स चरण्याऐवजी चणे किंवा राजगिऱ्याच्या चिक्कीवर चरणे.
१४. दुचाकी/चौचाकी चालवत असताना सिग्नलवर पायांचे, खांद्याचे आणि मानेचे व्यायाम करणे. लोक जरा विचित्र नजरेने बघतात, पण त्यांनाही विचित्र गोष्टी बघण्याची सवय आहेच. काल नाही का, हिरवे आणि लाल केस रंगवलेली कॉलेज तरुणी बघत होते.. 
१५. रोज किमान एकदा तरी खरंखुरं खळखळून हसणे.
१६. कडू, तुरट या चवींना खाण्यातून बाजूला ठेवू नये. आज कारल्याची भाजी आहे म्हणून लोणच्याशी पोळी खाऊन भागवू नये.


आम्ही 'बैठे' आणि बुद्धिजीवी लोक. पण मनात आणलं तर आम्ही पण उतारवयापर्यंत काटक आणि निरोगी राहू शकतो. फक्त इच्छा हवी.. देवाने जे बहुमोल शरीर आपल्याला जन्म देताना दिलं आहे ते शक्य तितकी कमीत कमी मोडतोड करून त्याच्यापर्यंत पोहचवायचं आहे ना आपल्याला सर्वांना?


(लेखातील 'आम्ही' ही कोणी एक जमात किंवा समूह नसून ती एक प्रवृत्ती आहे. आणि जास्त वैद्यकीय ज्ञान नसलेल्या एका साध्यासुध्या 'मी' चे हे त्यावर शोधून काढलेले उपाय आहेत. त्यात नवीन काही सापडेलच, किंवा चुका नसतीलच, असा 'मी' चा दावा नाही.)