शास्त्र व विज्ञान यांतील फरक

अलीकडे मनोगतावर आलेल्या कांही लेखांमध्ये व चर्चेत "शास्त्र" व "विज्ञान" या शब्दांचा मुक्तपणे उपयोग केला गेला आहे. त्यातील वैचारिक गोंधळ लक्षात घेऊन या दोन संकत्पनांवर माझे विचार मांडत आहे. हे दोन्ही शब्द प्राचीन काळापासून उपयोगात आलेले आहेत पण संदर्भानुसार त्यांचे अर्थ बदलत आलेले आहेत.


अनेक धार्मिक विधि आपण "वेदशास्त्रपुराणोक्त" रीतीने करतो. त्यात "शास्त्र" याचा अर्थ कांही नियम वा रीतीभाती असा होतो. न्याय, व्याकरण, संगीत, नाट्य अशा अनेक विषयांमधील परंपरागत नियमबध्दता शास्त्र या संकल्पनेत येते. "आपणा आपण जाणिजे तया नाम ज्ञान" असे म्हंटलेले आहे. गीतेमधील "ज्ञान, विज्ञान" यांत स्वतःबद्दल किंवा आत्म्याची माहिती म्हणजे "ज्ञान" आणि बाह्य जगाची माहिती "विज्ञान" असे ढोबळमानाने म्हणता येईल. "सायन्स" ही संकल्पना त्याकाळात जगात कुठेही अस्तित्वात नव्हती. अगदी अलीकडेपर्यंत तो फिलोसॉफीचा भाग होता. सतराव्या अठराव्या शतकात युरोपमध्ये सायन्सला वेगळे करण्यात आले व विसाव्या शतकात मराठीमध्ये "विज्ञान" हा "सायन्स" या शब्दाचा पर्याय झाला. परंतु "शास्त्र" या शब्दाचा सुध्दा "सायन्स"ला प्रतिशब्द म्हणून सर्रास उपयोग सुरूच राहिला.
व्याकरण शास्त्र, संगीत शास्त्र यासारख्या "शास्त्रां"मध्ये अनेक मानवनिर्मित नियमांचा समावेश होतो, ते नियम कालानुसार बदलू शकतात व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. विज्ञान किंवा सायन्समध्ये फक्त निसर्गनिर्मित किंवा (आस्तिक लोकांच्या) परमेश्वराने केलेले नियमच येतात व ते सर्वांना समान प्रकारे लागू होतात हा एक या दोन्ही संकल्पनांमध्ये महत्वाचा फरक आहे. माणूस हे नियम फक्त समजून घेऊ शकतो, ते करू किंवा बदलू शकत नाही.  विज्ञानाचे नियम स्थळकाळातीत असतात. कोणीही ते सप्रयोग सिद्ध करू शकतो. सायंटिस्ट्स किंवा वैज्ञानिकांची इतर शास्त्रीपंडितांबरोबर तुलना होऊच शकत नाही कारण वैज्ञानिक निसर्गाचा अभ्यास करून त्यांना जे सत्य दिसेल, जाणवेल तेच सांगतात तर इतर पंडित आपली मते, कन्पना, विचार मुक्तपणे मांडतात, त्यांच्या क्षेत्रांत ते स्वतःचे नवे नियम बनवू शकतात.
उदाहरणार्थ हिन्दू असो वा ख्रिश्चन असो दोघांनाही पदार्थविज्ञानाच्या नियमाप्रमाणे ऊष्णतेचे चटके बसतील किंवा त्यांनी उडी मारली तर ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली येतील. हे परमेश्वराने बनवलेले विज्ञान आहे. देवळामध्ये जोडे काढून व डोक्यावर टोपी किंवा पागोटे घालून आणि चर्चमध्ये टोपी काढून पण पायांत बूट घालून जाणे हे माणसांनी सांगितलेले शास्त्र आहे. स्थानिक परिस्थितीनुसार विकसित झालेले आहे.
मराठी भाषेत शास्त्र व विज्ञान हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरून फार मोठा गोंधळ निर्माण करून ठेवला गेलेला आहे. सोवळे ओवळे, उपास तापास वगैरे अनेक परंपरागत गोष्टी हिंदू धर्म"शास्त्रात" व्यवस्थित बसतात. मनातून एखादी गोष्ट करायची नसेल तेंव्हा सुध्दा आपण "शास्त्रा"पुरती ती थोडीशी करतो. इथे विज्ञानाचा संबंध येत नाही.
पण विज्ञान या विषयामध्ये तर्कशुद्ध विचार असणे महत्वाचे असते.  ध्वनीस्पंदने, विद्युतलहरी अशा संकल्पना भोंगळपणे वापरण्याला तेथे वाव नाही. त्यांच्या ऊर्जेचे मोजमाप, कंपनसंख्या, शरीरातील विशिष्ट भागांवर त्याचा प्रत्यक्ष होणारा निश्चित परिणाम, त्याचे मोजमाप वगैरे समजून घेणे आवश्यक असते. कोणी शोध लावला यापेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे महत्वाचे असते. आधीच एक निश्कर्ष गृहीत धरून त्याअनुषंगाने मुद्दे मांडणे नीतिशास्त्र, पाकशास्त्र, विधिसंस्था वगैरेमध्ये ग्राह्य असेल पण ते विज्ञानाला धरून नाही. तिथे आधी एखादा सिध्दांत मांडून किंवा प्रयोग करून त्यातील निरीक्षणांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निश्कर्ष काढावा लागतो.
मनोगतावर झालेल्या चर्चेत यांत गल्लत झालेली दिसते. यावर अधिक चर्चा व्हावी असे वाटते.