गझल

उमलून वांझ माझे सारे वसंत गेले
करुनी मला शिशिरही, बघ, नापसंत गेले

चित्कारतो न हल्ली क्षितिजास पाहुनी मी
सांगून सत्य त्याचे मज बुध्दिमंत गेले

साकेत ना मिळाला, साकी तरी मिळाली
पेल्यात वारुणीच्या मग खेद-खंत गेले

माडी म्हणू नका, ही आहे पवित्र वास्तू
पावन करून तिजला मुल्ला-महंत गेले

आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले