रसायनशास्त्रात शिक्षण घेतल्यामुळे कारखान्यांत नोकरी करणे नशिबांत आले. मुंबईतले कारखाने बाहेर गेले पण घर हलवणे सोपे नव्हते. म्हणून रोज लांबचा प्रवास करणे स्वीकारले. सुरवातीला ओळखी होईपर्यंत बराच शारिरिक व मानसिक त्रास सहन केला. नंतर जसजशा ओळखी वाढत गेल्या तसतशी या जीवघेण्या प्रवासाचासुद्धा आनंद घेण्याची मानसिक तयारी झाली. या ओळखी साध्या नसतात. त्यातून गाढ मैत्रीचे धागे गुंफले जातात. कालांतराने तो प्रवास जरी संपला तरी ते मित्र तसेच जिवाभावाचे रहातात. दहा वर्षांच्या रोजच्या प्रवासांत असंख्य माणसे भेटली. कांही चटका लावून जाणारी तर कांही चटके देणारी. आता मागे वळून पाहिले की जाणवते की ही आयुष्यात मिळालेली, शिकण्याची एक मोठी संधी होती. त्यातीलच कांही निवडक वल्लींची मनोगतींना ओळख व्हावी या हेतूने ही व्यक्तिचित्रे आपल्यासमोर मांडणार आहे.
बहुतेक व्यक्ति खऱ्या नांवानेच आपल्यासमोर येतील. अगदीच विचित्र वागणाऱ्यांना मात्र दुसऱ्या नांवाने संबोधणार आहे.
व्याघ्रपुराण
सुभाष वाघ हे एक अदभुत रसायन होते. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तिला हे विधान शंभर टक्के पटेल. त्यांचे व्यक्तिमत्व एवढे प्रभावी होते की त्यांच्या सहवासांत आलेला कुठलाही (मानव)प्राणी एकतर त्यांच्या प्रेमात तरी पडायचा किंवा त्यांच्या बोलण्याची धग सहन न होऊन काढता पाय घ्यायचा! आसपासच्या लोकांना अक्षरशः हलवून टाकणारा हा ढाण्या वाघ तारापूरला आला आणि बघता बघता आमच्या रोजच्या प्रवासाचा केंद्रबिंदु झाला. एखादे दिवशी ते आले नाहीत तर आजुबाजुच्या डब्यातले सहप्रवासी चौकशी करुन जात असत.
मध्यम उंची, गोरा रंग, पांढरेशुभ्र केस,रुबाबदार पोशाख आणि भरीला मोठ्ठा आवाज!! तशा त्या मोठ्ठ्या आवाजांत ते जे कांही बोलायचे, तसे बोलण्याचे धाडस आमच्यापैकी कोणातच नव्हते. हा आवाज जर सकाळी कानावर पडला नाही तर मलाच काय पण गाडी येईपर्यंत, त्यांच्या बुटांना चकचकीत पॉलिश करणाऱ्या पोऱ्यालाही चैन पडायचे नाही. बोलण्याच्या अखंड धबधब्यात एक स्त्रोत झणझणीत शिव्यांचाही असायचा. अगदी पुलंच्या रावसाहेबासारखा! तेवढ्या त्या शिव्या सहन करण्याची ताकद जर तुमच्या कानांमधे असेल तर करमणुकीची आणि ज्ञानार्जनाची एक उत्तम संधीच त्या कंटाळवाण्या प्रवासात तुम्हाला लाभायची.
' भैया संस्कृती आणि त्यामुळे या देशाची झालेली माती' हा एक त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सध्या उत्तर भारतीय लोकांविरुद्ध जोरदार हांकाटी चालू आहे, वाघोबांना मात्र तेंव्हाच या प्रश्नाचे गांभीर्य वाटत होते. हा विचार ते सोदाहरण स्पष्ट करुन आग्रहीपणे मांडायचे. आमचा सर्वांचा मेंदु धुतला गेल्यामुळे दैनंदिन जीवनात कुठलाही त्रास झाला तर त्याच्या मुळाशी एखादा भैयाच असला पाहिजे यावर आमचे क्षणार्धात एकमत होत असे. तारापूरसारख्या लांबच्या ठिकाणी नोकरी केल्यास संध्याकाळी घरी वेळेवर परतण्याची खात्री नसतेच! तर अशा एखाद्या कातरवेळी गाडीची काकुळतीने वाट पहाताना, रुळांच्या क्षितिजावर एखादा ठिपका दिसला की गाडी आली म्हणून आनंदित झालेल्या आमच्या उत्साहावर, 'अरे, गाडी नसेल ती, एखादा भैया बसला असेल रुळांवर ----- ' अशा व्याघ्रगर्जनेमुळे पाणी पडायचे आणि दुर्दैवाने त्यांचेच म्हणणे खरे निघायचे.
वाघोबा मूळचे सधन घरांतले. सांताक्रूजच्या वाघवाडीचा एकेकाळी दरारा होता. त्यांचे बरेचसे भाऊ व बहिणी अमेरिकेत सुस्थितीत होते. तसे लौकिकार्थाने सर्व चांगले. पण या माणसाचा स्वभाव पडला चाकोरीबाहेरचा! म्हणजे कसा तर, वडिलधाऱ्यांनी पाणी घाल म्हटले तर 'लोंबतय काय' हा प्रश्न हक्काने विचारुन नुसते थांबणार नाहीत तर ते कळेपर्यंत परत परत विचारतच रहाणार! स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी भल्याभल्यांचे वस्त्रहरण केले पण तारतम्य न पाळल्यामुळे नोकरीत तसेच व्यवसायांत नुकसानही भरपुर झाले. पण तरीही त्यांनी सांगितलेला अमेरिकेतल्या निग्रोंचा ' walk tall' हा विचार आम्हाला सर्वांना कुठेतरी स्पर्शून गेला. असा विचार आमच्यासारख्या कणाहीन लोकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देतो. त्यांचे प्रत्येक वाक्य काही आम्ही ब्रह्मवाक्य मानले नाही, पण त्यातला 'अतिशयोक्ति, थापा व शिव्या हा भाग वगळला तरी जे विचार उरतात ते नक्कीच विचार करण्यासारखे आहेत.
तारापूरला येण्यापूर्वी त्यांची बरीच स्वप्ने उध्वस्त झाली होती. सुरवातीला त्यांच्या बोलण्यात पदोपदी राग, निराशा व वैफल्य जाणवायचे.पण योग्य संधी मिळताच त्यांनी कर्तुत्व सिद्ध केले. शून्यातून विश्व म्हणावे तसे दोन कारखाने निर्माण करुन उत्तमरीत्या चालवून दाखवले. हा माणूस बोलतो त्याप्रमाणे करुनही दाखवतो असा एक दबदबा त्यांनी निर्माण केला. पण नियतीच्या मनांत कांही वेगळेच असावे. डोक्यांत गेलेले यश आणि अतिस्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांचे अनेक मित्र दुरावले. त्यातच प्रकृतीची अक्षम्य हेळसांड केल्यामुळे जीवघेणे दुखणे मागे लागले. बघता बघता होत्याचे नव्हते झाले आणि एक असामान्य व्यक्तिमत्व अकाली संपले.
अशा या वाघाने, खऱ्या - काल्पनिक बोधकथा, वात्रटकथा तसेच पोट धरधरुन हंसवणाऱ्या आचरटकथा सांगून आमच्यासाठी जे निखळ आनंदाचे क्षण निर्माण केले त्याचे विस्मरण आम्हा यात्रिकांना कधीतरी होईल का ?