साऱ्याजणी करुया महिलादिन साजरा,
गौरवास्पद महिलांना करून मानाचा मुजरा.
शूर लढवय्या कितीक महिला इतिहासाच्या पानी,
झाशिची राणी,अहिल्याबाई,जिजाऊ अग्रस्थानी.
समाजबंधना झुगारूनी,डॉक्टर होई आनंदीबाई,
स्त्री शिक्षणाचा कित्ता गिरवून साक्षर होई सावित्रीबाई.
राज्यकारभारी मानाची अशी नावे घ्यावी किती,
विजयालक्ष्मी,इंदिराजी तर आम जनतेच्या मुखी.
कठीण क्षेत्री महिलांनीहि उच्चपद भूषविले,
किरण बेदिने धैर्याने तेव्हां तिहारजेल राखिले.
स्नेहलतेने कुलगुरुची धुरा वाहिली ऊरी,
सौदामिनी तर गगनामाजी प्रथम घेई भरारी.
वैमानिक संगिता,अनुपमा,साथीलाही चमू स्त्रियांचा,
रूळावरूनी गाडी हाकण्या हात न धरीती कुणी स्त्रियांचा.
दोन ध्रुवावरून उडी मारण्या शितल ना डगमगे,
अंतराळी भ्रमण करण्या सुनिता आमुची पुढे.
लतादिदी तर स्वरसम्राज्ञी,गानकोकिळा हृदयस्थानी,
निरक्षर पण कवी मनाच्या बहिणाईस ना विसरे कोणी.
नकाच विसरू मदरतेरेसा,अमर जाहली चावला कल्पना
गौरवशाली साऱ्या ललना, देऊ तयांना मानवंदना.
कधीच नव्हत्या नारी अबला,
ध्येयवादी त्या होत्या सबला,
आदर्श तयांचा अंगी बाणूया,
हाच आज संकल्प सोडूया.
अलकाताई.