सगळे झोपी गेल्यावर, माझा गांव कसा दिसत असेल?
हे पहायला मला चांदणं व्हावं लागेल,
आणि वाऱ्यासाठी उघड्या ठेवलेल्या खिडकीतून
आत शिरावं लागेल... झोपलेल्यांच्या स्वप्नात डोकावण्यासाठी !
त्रासदायक नसलेला माझा प्रकाश
उधळीत असेन मी मुक्तपणाने
घरांवर, देवळांवर, अंगणातल्या तुळस-प्राजक्तावर
आणि परसातून डोंगराकडल्या पायवाटेवर !
रात्रीच्या स्तब्ध शांततेत, जणू ध्यानालाच बसलेल्या
माझ्या गावाचं ते 'सुप्त' चैतन्य
मला प्रेरणा देत राहील, उद्याची !
आणि मग, पहाटे तांबडं फुटायच्या वेळी मला जावं लागेल!
सूर्याच्या नजरेतून,
जागा होत असलेला गांवही पहायला नको का?