टन.. टन... टन... (कसलातरी कर्कश आवाज)..... मी कसेबसे डोळॅ किंचित उघडले आणि हात आजुबाजुला फिरवून मोबाईल शोधला. कसातरी एकदाचा मोबाईल हाती लागला. पापणी किंचीत वर करून त्यात वेळ बघितली. ७:३०मिनिटे.
मी परत डोळे मिटले. मनातल्या मनात विचार केला, "कंपनीची बस पाउने नऊला आहे. पाच मिनिटांनी उठतो." आणि नकळत हाताने आलार्म बंद केला. साखरझोपतले "ते" गोड अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करू लागलो. कदाचित, पहाटे गोड स्वप्न पडतात म्हणून या झोपेला साखर झोप म्हटल्या जात असावी. माझ्यासारख्या
"मेहनती" व्यक्तीसाठी पहाट सकाळी नऊ वाजेपर्यंत असते आणि ऑफिसची बस पाउने नऊ वाजता असल्याने मी अतिव पहाटेच उठतो. (.... ) काही क्षण असेच गेले.... कितिही प्रयत्न केला तरी "परी" अद्रुश्य झाल्याने ते स्वप्न पुढे सरकत नव्हते. पॉज केलेला सिनेमा परत प्ले करून पुढे बघता येतो. पण, स्वप्न एकदा तुटले की परत बघताच येत नाही. स्वप्नामध्येच कसलातरी घर.. ̱घर..... आवाज ऐकू येवू लागला. आवाज कुठून येत आहे मी हा विचार करत असताच माझ्या शरीराला एक जोरदार झटका बसला आणि मी दोन्ही डोळॅ पुर्णपणे कदाचित ९ तासानंतर उघडले. बघतो तर काय??? मी सीट्वर बसलो होतो. मग आठवले, अरे मी तर बस मध्ये आहे आणि आता लवकरच घरी पोहोचणार आहे. आज तर सुट्टी आहे मग आलार्म कसा काय वाजला?? हा प्रश्न लगेच दत्त म्हणून माझ्यापुढे उभा राहीला.
कारण, आलार्म मी वीकडेज साठी सेट केला होता. माझी झोप अद्यापही पुर्ण उघडली नव्हती. थोड्या वेळानंतर लक्षात आले आज शुक्रवार आहे. परवा बुधवारीच चेलसी वरसेस लिवरपूल चॅंपियन्स लीगची क्वार्टर फायनल होती. म्हणजे निश्चित आज शुक्रवार आहे. आणि आज सुट्टी आहे. "वीकडेला सुट्टी" हा शब्द दोन-तीनदा मनाच्या पडद्यावर रेंगाळला आणि ते "अद्भुत" शब्दसमीकरण बघून माझी झोप पुर्णपणे उघडली.
मी बाजुचा स्वीच दाबून बसची सीट सरळ केली. वातावरण शांत होते. बरेच लोक अद्यापही साखर झोपेतच होते. बसचा तेवढा घर..... घर आवाज सुरू होता. हळुच मी खिडकीतून बाहेर बघितले. डोळ्यांना काही क्षण कसेतरीच झाले. बाहेर एकसुद्धा इमारत नाही, एकसुद्धा दुकान नाही, रस्ता मोकळा होता. खुपसारी वाहने नाहीत. पुण्यात ऑफिसला जाताना आणि ऑफिसातून येताना दोन्ही वेळी बसच्या खिडकीतून ह्या गोष्टी बघण्याची सवय झाली होती.
तर खिडाकीतून बाहेर उजाड डोंगर दिसत होते. मागल्या वेळी आलो होतो तेंव्हा संपूर्ण स्रुष्टी हरीतवसना नववधुप्रमाणे नटली होती. पण, आता तीच लंकेची पार्वती झाली होती. गुडीपाडवा केंव्हाच संपला होता. एप्रिल महिन्याने आगमनातच स्रुष्टीला होरपळून टाकले होते. यंदादेखिल उन्हामुळे उष्माघाताचे बळी जाणार, त्यानंतर पाऊस कमी पडला म्हणून शेतकरी
आत्महत्या करणार हा क्लेशदायक विचार मनाला स्पर्ष करून गेला.
एवढ्यात, गाडी डावीकडे वळली आणि कुठल्यातरी गावामध्ये आली. एका किराणा दुकानाच्या पाटीवर बघितले तेंव्हा लक्षात आले, हा पुसद तालुका आहे. काही क्षण गाडी स्टॉपवर थांबली. बसच्या दरवाज्यामध्ये उभा राहून धुळीने माखलेला शर्ट घातलेला एक साधारण विशीतला काळा-सावळा मुलगा, तोंडातला गुटखा गालामध्ये लपवत "यवतमाळ, यवतमाळ..... आहेका यवतमाळ" असे ओरडू लागला. थोडा वेळ ओरडल्यानंतर त्याने बाहेर दशदिशांना नजर टाकली आणि चालकाला, "चालुद्या" असा हातानेच इशारा केला. चालकाने गिअर बदलला. त्या मुलाने दारातुनच तोंडातला गुटखा रस्त्यावर ओतला आणि दार ओढून घेतले. त्यानंतर लगेच खिशातून दूसरी गुटख्याची पुडी बाहेर काढली. मी त्याचा हा सर्व प्रकार निर्विकार मनाने बघत होते. गुटख्याची पुडी डाव्या तळाव्यावर रिकामी करून त्याने हात ड्रायव्हरपुढे धरला. ड्रायव्हरने त्यातील काही मात्रा आपल्या तोंडात घातली. उरलेली त्या मुलाने आपल्या गालामध्ये लपवली.
आणि तो बाजुच्या स्टूलवर बसला. एवढ्यात चिं.... चिं..... करत एक ट्रक बसच्या अगदी जवळून पुढे गेला.
ते बघताच तो मुलगा त्या ट्रककडे हात दाखवत "मरते... मा****, ब****" असे ड्रायव्हरला म्हणाला.
प्रत्युत्यरादाखल ड्रायव्हरदेखिल काहीतरी बोलला. ते ऐकून तो मुलगा हसला. एवढा वेळ त्याच्या काळ्या ओठांनी लपवलेले पिवळे धमक दात बाहेर आले आणि मी ते सहन न झाल्याने परत खिडकीबाहेर द्रुष्टी टाकली.
गावामध्ये सर्वत्र निवडनुकीचे प्रचारार्थ बॅनर्स लावले होते. बॅनरच्या वरच्या बाजुला अगदी ठळक असा त्या पक्षाच्या अध्यक्षाचा
फोटो त्या खाली इतर सक्रीय कार्यकर्त्यांचा फोटो आणि सर्वात खालच्या ओळीमध्ये अतिशय गुंड वाटणारे, खुप दिवस तुरुंगात राहून आलेले असे वाटणारे चेहरे होते. त्यापुढे त्या लोकांना मतदान करा अशी विनंती होती. कदाचित धमकवण्याचा हा वेगळा प्रकार असावा.
नकळत मनामध्ये विचार चालून आला, भगवान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याचे स्वप्न बघितले तो भारत हाच का? ज्यासाठी त्यांनी काळ्या पाण्यावर जाणे स्वीकारले तो हाच देश का? मी हया विचारापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण, तो विचार माझा पाठलाग करू लागला. माझी जन्मठेप मध्ये सावरकरांना झालेल्या त्रासाचे वर्णन चित्ररुपाने डोळ्यापुढे उभे राहू लागले. एवढ्यात "सागरा प्राण तळामळला" हे त्याच महान व्यक्तीचे बोल मनःकर्णपटलावर आदळले. लगेच आठवले, मी सुद्धा मायभूमीलाच परततो आहे. मोबाईल मध्ये वेळ बघितली, नऊ वाजून १७ मिनिटे. घाट सुरू झाला होता. लवकरच यवतमाळ येणार. तेच यवतंमाळ जेथे मी माझ्या आयुष्याचे सोनेरी अठरा वर्षे जगलो. त्याच पठारी प्रदेशाच्या कुशीत मी माझ्या बालपणी अवखळपणा केला. ते यवतमाळ, तो स्वर्ग आता केवळ दोन बोटेच दूर होता.
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. सायकल घेऊन मी मित्रांबरोबर भर उन्हामध्ये आईला न सांगता फिरायला त्या घाटापर्यंत येत होतो. तेथल्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन आम्ही बगिच्यात आंबे तोडायचो. आणि शिपाई आला की मागून पळून जायचो. नंतर जवळपासच्या शेतामध्ये काही खाण्याजोगे बघायचो आणि ते चोरून वाटून खायचो. चोरून तोडलेली कच्ची कैरी देखिल गोडच लागत असे.
त्यावेळी एप्रिलमधले तो आग ओकणारा रवी आम्हाला आमचा मित्र वाटायचा कारण, त्याला घाबरून बहुतेक लोक घरामध्ये लपून रहायचे आणि आम्ही मुले आमचे चौर्यकर्म दिवसाच्या प्रकाशात सुर्याला साक्षी मानून पार पाडायचो. लहानपण कधी संपले कळलेसुद्धा नाही. आता ते मित्रसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत. कदाचित त्यांनादेखिल ह्या गोष्टी आठवत असतील.
बस थांबली. "लोहारा ....आहे का कोणी?" आवाजाने मी भानावर आलो. तोच मुलगा विचारत होता. मी घाईने बॅग उचलली आणि सीटपासून दूर झालो. त्याने दार उघडले. मी खाली उतरलो. जवळपास सहा महिन्यानंतर मी माझ्या गावी परत आलो होतो.