कुणीतरी अम्हा पटापट कविता वाचून सांगेल काय
या ओळींमध्ये दडलय काय ?
या रचण्यावाचुन अडलय काय ? ॥धृ॥
काव्य म्हणतो जिला कवी
पाडत असतो सदा नवी
कशास अमुच्या माथ्यावरती मारायाला हवी ?
कराल केव्हा, कविवर, तुमच्या काव्याची भैरवी ? ॥१॥
सुनीत कोणी करी इथे
गझलांचे खच जिथे-तिथे
नवकाव्याचे, गांभिर्याचेही दिसती चाहते
विडंबनाची सरिता कायम दुथडीने वाहते ॥२॥
मात्रावृत्ती असे कुणी
अक्षरगण-कट्टर कोणी
कविता कसली, लघु-गुरूची क्रमवारी-मोजणी
बेरीज चुकता म्हणे कवी ही मुक्तछंद-बांधणी ॥३॥