जीवनास

नमस्कार !

स्वा. सावरकरांच्या "सागरास" या कवितेला १०० वर्षे झाली. त्यांच्या काव्यकृतीला हे अनुवंदन..(विडंबन नव्हे. )

                   जीवनास

ने मजसी ने परतचि बालपणाला । जीवना, जीव कळवळला

मी मातेचा पदर धरुनिया तूतें । की प्रथम पाहिले होते

वदलास मला तारुण्य देशिं चल जाऊ । जगण्याचा ऊत्सव पाहू

वय अजाण हे भयशंकित जरी झाले । परी तुवा वचन मज दिधले

वाटेत तुला रंग नवे दावीन । स्वर्गिचि सफर घडवीन

          विश्वसलो या तव वचनी । मी

          नव अनुभव यावा म्हणुनी । मी

          तव मधुर शब्द ते ऐकुनी । मी

मोहून स्वये त्वरित सोडले त्याला । जीवना, जीव कळवळला  ॥१॥

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी

वय वाढ कशी सतत साहू मी येथे । प्रौढत्व वाढतची जाते

वय-कुसुमे मी वेचियली या भावें । की बाल्य सुगंधित व्हावे

जर त्या योगे विस्मर शैशत्वाचा । तर व्यर्थच भार वयाचा

          ती बालसुलभवत्सलता । रे

          वद गेली कोठे आता । रे

          ही खंत वाटते चित्ता । रे

बघ स्वर्ग मला हाय पारखा झाला । जीवना, जीव कळवळला  ॥२॥

जगी आश्चर्ये बहुत, मौज परी प्यारी । मज बालवयातिल सारी

हे खेळ नवे प्रौढ परी मज भारी । सानुली खेळणी प्यारी

त्यावीण नको राज्य प्रिय परी साचे । अंगणही बालपणाचे

          भुलविणे व्यर्थ हे आता । रे

          बहू जिवलग गमते चित्ता । रे

          जी प्रिय तुजला शैशवता । रे

त्याचीच अता शपथ घालतो तुजला । जीवना, जीव कळवळला  ॥३॥

पाहून मला हससी निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा ?

मिरवीत असे तुझिया स्वामित्वाला । भिउनि कां सांग काळाला ?

की हतबल मी म्हणुनी असा फसवीसी । प्रौढत्व मला हे देशी

           तरी नित्य-काळ-भयभीता । रे

           हतबल न जाहलो पुरता । रे

           अनसुयेस कथिन मी आता । रे

बघताच तिने जाइन शैशत्वाला । जीवना, जीव कळवळला  ॥४॥

                                 --- हेमंत राजाराम.