गझल
आता कुठे जिण्याची आली जरा उभारी!
इतक्यात नावपत्ता मृत्यू मला विचारी!!
दु:खांमुळेच झालो सोशीक एवढा की,
मी सोसले सुखाचे आघात ते जिव्हारी!
आकाशही दिले तू, मज पंखही दिले तू....
नाही मलाच आली घेता कधी भरारी!
होते सुरू अचानक ये-जा तुझ्या स्मृतींची;
जेव्हा मला खुशाली माझीच मी विचारी!
आयुष्य सर्व गेले, शोधीत फक्त जागा....
मरणा! उभाच आहे घेवून मी पथारी!
मथळ्यांवरून येतो अंदाज बातम्यांचा;
वाचायच्याच आधी येते किती शिसारी!
चढवा भले कितीही श्रीमंत सांज त्यांना;
कळतेच खानदानी आहेत ते भिकारी!
सोडून चोर संन्याशालाच होय फाशी!
अन् राजरोस होती दुर्जन पहा फरारी!!
प्रेमात काय पडलो, जगण्यात रंग भरला!
आयुष्य तेच आहे, न्यारी परी खुमारी!!
मी तोच कालचा, पण, खुर्ची नवीन आहे!
टाळायचे मला, ते येतात आज दारी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१