बोलावं वाटतं खूप पण... जीभच वळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !
मन झालंय वादळवारं.. तूफान मनात दाटलंय सारं
आवेगाचा पाऊस जसा... कोसळत जातो धुवाधार
बरसावं वाटतं तसंच पण... शब्दच फळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !
स्वतःशीच हसणं होतं... स्वतःशीच बोलणं होतं
कुणी काही म्हटलं तरी... मन मुकं मुकं होतं
ज्यांच्यावाचून नव्हतं करमत.. त्यांच्याशीही जुळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !
तुझीच आस, तुझीच ओढ... काहीच नाही वाटत गोड
कानी गुंजते तुझीच शीळ... जीव तुटतो तीळ तीळ
छळायचा जो एकांत आता.. तो ही छळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !
मुकी मुकी जरी वाणी... मनी मात्र फुलती गाणी
आटपाट नामे नगरीचा.. तू राजा, मी राणी
सारं तसं खोटं खोटंच... पण मनास वळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !