आलीस का गौराई?

मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे.
मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने".
आई,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"मुलाबाळांच्या पावलाने"....."धनधान्यांच्या पावलाने"....."सौभाग्याच्या पावलाने".....असं करत कुंकवाच्या पावलांनी मी घर फिरून आले होते.
त्यानंतर आईने घाईघाइने शेपूची भाजी आणि भाकरी, लाह्या केल्या आणि नैवेद्य दाखवला. गौराया सासराहून माहेरी आल्या होत्या ना. त्यांना खाऊपिऊ घालायचे होते. नैवेद्य दाखविला आणि मी लगेचच जेवून घेतलं. :-) आणि हेच रुटीन पुढचे ८ वर्षें तरी चालू होतं.
कुणी एखाद्याला विचारलं की तुला ऎश्वर्या राय आवडते का? तर तो उत्तर देताना म्हणतो की मला तिच्यापेक्षा सुश्मिता सेन जास्त आवडते. तसं गणेशोत्सव आवडतो का? तर माझं उत्तर असतं, हो मला तो दिवाळीपेक्षा जास्त आवडतो.(न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सवयच आहे मला. :-)) ) एकूण काय, गणेशोत्सव हा माझा आवडता सण. आमच्या घरी गणपती पाच दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी गणपतीसाठी आरास करण्याची धावपळ, आधीच सिलेक्ट करून ठेवलेली मूर्ती घरी आल्यावर आरती वगैरे सर्वांकडे होतं तसंच. खरी मजा येते ती दुसऱ्या दिवशी सकाळपासून. गावात कुठेतरी सकाळी ५.३० च्या भोंग्याला गणपतीची गाणी सुरु होतात. माझं आवडतं गाणं म्हणजे,'गणराज रंगी नाचतो,नाचतो....'. त्या गाण्यांबरोबर दिवसाची सुरुवात होते. पुढचे दोन दिवस गणपतीची आरती आणि त्यासोबत अजून एक काम असतं ते म्हणजे, फराळाचे पदार्थ. गौरीच्या आरासेसाठी आई अनेक पदार्थ बनवते. त्याचा फोटो टाकतेच आहे मी खाली. तिसऱ्या दिवशी मी वर लिहिलंय तसं गौरीचं आगमन होतं.
भाकरी-शेपूची भाजी,वरण भात असं जेवण झाल्यावर आई कामाला लागते. गौरींना बसवायचं,सजवायचं. आमच्या घरच्या गौरी उभ्या असतात. मग अडीच-तीन पुट उंचीच्या गौरी उभ्या करताना आई त्यांना सहावारी साडी कशी नेसवते हे पाहण्यासारखं असतं. मागच्या वेळी मी व्हिडीओ शूटींग घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अगदीच अमेरिकन व्हर्जन आहे सगळ्या गोष्टी करण्याचं. मग कॅमेरा सोडून मी नुसतं बघत बसले. साडी नेसलेल्या गौरी गणपतीच्या दोन्ही बाजूनी उभ्या राहिल्या की या सणाची खरी शोभा येते. मग यावेळच्या साड्य़ांमध्ये गौरी कशा दिसतात हे बोलण्यात, बघण्यातच जास्त मजा येते. तर हा झाला गौरींचा पहिला दिवस. दुसरा दिवस त्यांचा लाड करण्याचा. त्यादिवशी पुरण्पोळीचा नैवेद्य असतो. पोळ्यांचा स्वयंपाक होईपर्यंत आणि खाऊन झाल्यावर सगळे अगदी पेंगुळलेले असतात, पण मुख्य काम तर बाकीच असतं, सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रण देण्याचं. रडत-खडत का होईना आम्हा बहिणींपैकी एक घराच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला जाऊन सगळ्यांना आमंत्रण देऊन येतं असू. त्यातच एखादी आपलं काम पण करून घ्यायची. म्हणणार, आता बरीच कामं आहेत, त्यामुळे तुमच्या घरी सांगायला काही येता येणार नाही, तूच तुमच्या आईला पण सांग आमच्याकडे या म्हणून.
सगळी आमंत्रणं देऊन आल्यानंतर मग घरी येऊन आमची नटण्यासाठी घाई असायची. मग साडी नेसायची की नाही, कुठली नेसायची, कोण हळदी-कुंकू लावणार, कोण अत्तर लावणार इ. आधीच ठरवून घ्यायचो. तोपर्यंत संध्याकाळ्चे पाच वाजलेले असायचे आणि आई अजून स्वत:च आवरते आहे तोवर बायका घरी यायला सुरुवात व्हायची. दादांचं त्यानंतर काही कामं नसायचं त्यामुळे ते आणि आजोबा अंगणात खुर्ची टाकून बसलेले असायचे. :-) आई म्हणायची की त्यादिवशी गौरींचं तेज काही औरंच असतं. आणि मलाही ते पटलंय. त्या नेहमीच्याच मुखवट्यांवर काही वेगळेच तेज वाटायचं. सगळ्या जणी कौतुकाने आरास, गौरींच्या साड्या, फराळाचे पदार्थ यांच्यावर गप्पा मारत संध्याकाळ भुर्रकन निघून जाते. रात्री कंटाळून झोपायला जाताना त्या दोघींकडे एकदाचं शेवटंचं बघणं अपरिहार्य असतं. जेवण झाल्यावर आई त्यांची 'दॄष्ट'ही काढते. :-) आणि हो आमचीही, आम्ही पण गौरायाच नाही का? :-)
पाचव्या दिवशी सकाळी आई मुखवटे उतरवून ठेवते आणि घर एकदम भकास वाटायला लागतं. संध्याकाळी आरती करून, त्यांब्यातील गौरी आणि गणपती विसर्जन होतं आणि एक प्रकारची उदासी मनात येते. खरंच आपल्या घरी कुणी पाहुणे आले होते आणि ते गेले आहेत असं वाटायला लागतं.मी १२वी नंतर गणपतीला घरी गेले पण गौरी घरी आणण्याचा मान तोपर्यंत माझ्या छोट्या बहिणीकडे गेला होता. :-( दोन वर्षांपूर्वीही मी घरी होते गणपतीला पण गावात जाऊन सर्वांना आमंत्रण द्यायला काही मी गेले नाही. अर्थात कित्येक घरात आज्या जाऊन काकूंची बढती सासूपदावर झाली असल्याने, नवीन सुनांनी तुम्ही कोण म्हटलं की बरं वाटत नाही ना. जे कोणी घरी आले त्यांना भेटले,बोलले आणि पूर्ण संध्याकाळ ते जुने दिवस आठवत राहले. ह्म्म्म... असो.तेव्हाचाच एक गौरी-गणपतीचा फोटो.
चार दिवसांपूर्वी काही विशेष घडतंच नाहीये असं म्हणलं खरं पण आमच्या पार्क बटरफील्ड अपार्टमेंटमध्ये गेल्या २-४ दिवसांपासून धावपळ सुरु झाली आहे, गणपतीच्या स्वागताची? खासकरून GT च्या घरचा गणपती मागच्या वर्षी ज्या जोशात साजरा झाला त्यामुळे तर अजूनच. GT म्हणजे आमचे शेजारी. मागच्या वर्षी १० दिवस संध्याकाळी आम्ही जवळ-जवळ १५-२० लोक असायचॊ आरतीला त्यांच्या घरी. मग कुणी म्हणणार आज प्रसाद मी करते गं, तर कधी ५ आरत्या म्हणायच्या की ७ अशी डिस्क्शन्स पण व्हायची. खूप वर्षांनी असा गणेशोत्सव साजरा झाला होता. पण स्वत:च्या घरी मी काही केलं नव्हतं. का? माहीत नाही. या वर्षी मात्र मला सर्वांकडे पाहून जोर चढलाय. आज हरताळका आहेत. घरी गणपती बसवणार नाहीये पण पूजा,आरती करणं, मोदक वनवणं हे तरी करू शकते ना? :-) बघू कसा होतोय कार्यक्रम ते. जमलं तर लिहिनंच त्याबद्दल...तोपर्यंत...गणपती बाप्पा.....मोरया.....
-अनामिका.