गेल्या काही दिवसांत मनोगतावर ई-चळवळ उभी राहत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. कामानिमित्त किंवा अनेक कारणांसाठी आपल्याला मुंबई-पुणे प्रवास करायची वेळ येते. वोल्व्हो बसेस सुरू झाल्यापासून आम्ही बरेच वेळा त्याचा उपयोग करतो. सुरवातीला ही सेवा चांगली होती. त्यानंतर सध्या जी परिस्थिती आहे ती प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे असा अनुभव आहे.
१. प्रत्येक कंपनीच्या बसेसचा मार्ग वेगवेगळा असतो, पण कावळ्याच्या छत्रीप्रमाणे ठिकठिकाणी उगवलेले एजंट बरोबर माहिती देत नसल्यामुळे डेक्कनला उतरणाऱ्या प्रवाशाला शिवाजीनगरला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उतरण्याची वेळ येते.
२. मुंबईहून निघणाऱ्या बसेस बोरिवली पासून अनेक ठिकाणी प्रवासी घेत वेळ काढतातच, पण हल्ली चेंबूर व वाशी इथेही संताप येईल इतका वेळ काढतात.
३. बस थांबलेली असताना अनेक फेरीवाले आंत येऊन काहीबाही दीडपट किमतीला विकत असतात.
४. मधल्या फूड मॉलच्या थांब्यावर १० मिनिटे सांगून अर्धा तास घालवतात.(याला काही प्रवासीही जबाबदार असतात)
५. व्हिडिओवर दाखवण्यात येणारे अभिरुचिशून्य सिनेमे जबरदस्तीने पाहावे लागतात, आजवर कोणीही एकत्र येऊन हा सिनेमा बंद करा असे सांगितल्याचे पाहण्यात नाही. सिनेमा सुरू होण्यापूर्वी व नंतर आचरट बडबडीचा एफएम रेडिओ सहन करावा लागतो.
६. पुण्याहून परत येताना तर डेक्कनवर पकडलेली बस सव्वा ते दीड तासांच्या कोथरूड-पौड-औंध-पाषाण अशा उलटसुलट पुणे दर्शनानंतर महामार्गाला लागते. मुंबईला पोचल्यावर जर बोरिवली बस असेल तर, दादरच्या घुसवलेल्या प्रवाशांना, अचानक सायनला उतरायला सांगितल्यामुळे होणारी भांडणे, हा आता नित्याचाच भाग झाला आहे.
७. शनिवार-रविवारचे जास्त दर सोमवार दुपारी १२ पर्यंत लावण्यात येतात.
भरमसाट भाडे आकारूनही प्रवाशांवर उपकार करत असल्यासारखी वागणूक, वेळेचा अपव्यय याबद्दल कुठे आवाज उठवणे शक्य आहे का ?