ठाण्यातील 'क्रांतीचा झंझावात'

दिनांक एक, दोन व तीन फेब्रुवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकाची नावे सुद्धा माहीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र यावर नुसते चरफडण्यापेक्षा या महान हुतात्म्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यावा, व विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग लाभावा, त्यांना क्रांतिकारकांविषयी आदर निर्माण व्हावा, त्यांची माहिती करून घ्यावीशी वाटावी यासाठी ’अर्थ’ ने एक अत्यंत कल्पक असा प्रकल्प राबविला. kz

पुणे येथील इतिहास संशोधक व क्रांतिप्रेमी श्री. प्रमोद मांडे यांचे सहकार्याने ’अर्थ’ ने ४८ क्रांतिकारकांची चित्रे असलेली एक पुस्तिका मुद्रित केली व ठाण्यातील बहुतेक शाळांमधून सुमारे १४,००० विद्यार्थ्यांना वाटली. प्रत्येक चित्राखाली एक रिकामी चौकट देण्यात आली होती आणि या चौकटीत त्या क्रांतिकारकाचे नाव लिहायची स्पर्धा ठेवली होती. आठ दिवसात ठाण्यातील सर्व शाळा अक्षरश: क्रांतिमय झाल्या. विद्यार्थी, शिक्षक व पालक या वेडाने झपाटले आणि संदर्भ ग्रंथ व आंतरजालावर कब्जा करीत अथक परिश्रम करून विद्यार्थी स्पर्धेत उतरले. एखादी संस्था १४००० विद्यार्थ्यांना मर्यादित मनुष्यबळ, मर्यादित वेळ व मर्यादित निधी यावर मात करून एका सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सामील करून घेते व साडे नऊ हजार विद्यार्थी स्पर्धेत उतरतात व लक्षणीय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.

ठाणे येथील श्रीरंग विद्यालयात हे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात अनेक क्रांतिकारकांची चित्रे/ तैलचित्रे तसेच अल्प परिचय प्रदर्शित करण्यात आले होते.या निमित्ताने श्री. प्रमोद मांडे यांची व्याख्याने - दि. २ फेब्रुवारी रोजी ’परिचित नसलेले शिवरायांचे रूप’ व ३ फेब्रुवारी रोजी ’क्रांतिकारकांच्या कथा आणि व्यथा’ आयोजित केली होती. दि. ३ रोजी व्याख्याना नंतर पारितोषिक वितरण सोहळा झाला. या प्रसंगी प्रारंभी क्रांतिगीतांवर आधारित विद्यार्थ्यांच्या नृत्यनाटिका सादर केल्या गेल्या, ज्या प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेल्या. आपल्या भाषणांत श्री. मांडे यांनी अनेक क्रांतिकारक व त्यांचे कार्य आणि त्यांची सातत्याने झालेली उपेक्षा याचा परामर्श घेतला व या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला क्रांतिकारकांची ओळख करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मा. कावेरीताई पाटील व मा. हिरवे सर उपस्थित होते. त्याचप्रमाणे ठाणे शहर उपमहापौर, आमदार विनोद तावडे व आमदार संजय केळकर व अनेक मान्यवर उपस्थित होते. झोंबऱ्या गार वाऱ्यात उघड्या मैदानात असून देखिल सुमारे ५०० हून अधिक ठाणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दोन्ही आमदारांनी या प्रसंगी अत्यंत नेटकी व औचित्यपूर्ण भाषणे केली ही देखिल एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

या निमित्ताने श्री. मांडे यांचा परिचय झाला व त्याच्याशी चार शब्द बोलण्याची संधी लाभली. माझे स्नेही संजय व माधवी नाईक यांचे या यशस्विरीत्या आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन व विशेष कौतुक. ’अर्थ’ प्रतिष्टानतर्फे उत्तरोत्तर असेच दर्जेदार व उपयुक्त कार्यक्रम आयोजित होत राहोत या सदिच्छा.