सकाळची पूजा-बिजा आवरून झाली न झाली तोच लोकांची घरी गर्दी सुरू झाली.कंटाळा आला होता नुसता. लोकांचं करायचं तरी किती. म्हणजे तशी असतात नोकरमाणसं पण ते काही सगळं थोडेच बघतात. जरा कुठे दुर्लक्ष झालं की केलाच आळशीपणा. बरं 'यांचं' कामही काही सरळ होत नाही. पटकन लोकांना कटवतील की नाही? पाच मिनिटं होतात की "ए, जरा दोन कप चहा आण गं." सकाळपासून चार वेळा प्यायले असतील बाकीच्या लोकांसोबत. थोडा कमी दिला तर हळूच डोळे वर करून बघतात. लोकांना काय, नुसतं 'साहेब, साहेब' म्हणून गोड बोललं की झालं. जाऊ दे, मी पटापट आवरून घेते नाहीतर रविवारचं दुपारचं जेवणही वेळेवर होणार नाही. यांना जेवायला बोलावेपर्यंत तरी हे काही जागचे हालणार नाहीत. दर रविवारचीच ही कथा. स्नेहल स्वत:शीच बोलत आपली कामे उरकण्य़ाचा प्रयत्न करत होती. कलेक्टरसाहेब बायकोच्या बडबडीकडे लक्ष न देता आपली कामे करत होते. त्यांचंही बरोबरच होतं म्हणा. अशा मोठ्या पोस्टवर असल्यावर जबाबदारी पण तेव्हढी असणारच ना.
५ तास आणि ४ चहानंतर, स्नेहलने नोकराला पाठवून साहेबांना जेवायला बोलावलंही. येतोच म्हणूनही तासभर झाला. आता मात्र वैतागून स्नेहल स्वत:च बाहेर आली, काही बोलणार इतक्यात समोर बसलेली एक वयोवृद्ध व्यक्ती दिसली. वय साधारण ६५ च्या आसपास, पिवळसर पांढरा नेहरू शर्ट, पांढरा पायजमा,जाड भिंगाचा चष्मा आणि खिशाला दोन रंगांचे पेन(पेन, ज्यामधून रिफिल आरपार दिसते ना तसले, तेही त्याच रंगाच्या खटकायचे). स्नेहल समोर आल्यावर साहेबांनी ओळख करून दिली, "स्नेहल, हे आमचे वेळापुरे सर. आम्हाला इंग्रजी आणि संस्कृत शिकवायचे. " आणि असं म्हणून त्यांनी डोळ्यांनीच बायकोला नमस्कार करायची खूण केली.तसे वहिनींनी असे अनेक लोक साहेबांकडे आलेले पाहिले होते, काही ना काही कामासाठी, मदतीसाठी. पण नमस्कार ? ही कुणीतरी खास व्यक्ती होती एव्हढं नक्की.तिने नमस्कार केल्यावर सरांनी थोड्याशा चढ्या पण कणखर आवाजात आशीर्वाद दिला, ’यशवंत हो!’ :-) तिला थोडंसं हसू आलं आणि छानही वाटलं. सरांनी विचारलं,’ काय, सगळं ठीक ना?’. तिने मानेनेच होकार दिला. तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिह्नं आता साहेबांकडे वळलं. जरा वेळ लागला त्यांना समजायला, मग पटकन म्हणाले, ’अगं हो येतो ना जेवायला. तू पानं मांडून घे. चला सर, तुम्ही पण आता जेवूनच जा. किती वर्षांनी भेटताय.जेवून, निवांत विश्राम करा. मग बोलूच.’ आत जाता जाता स्नेहलने साहेबांकडे रागाने पाहिलंच.
आता पाहुणे म्हणजे हिला नंतर बसावं लागणार, त्यानंतर आवरायचं, म्हणजे अजून दोन तास. जेवायला दोनच पानं बघून सर म्हणाले, ’काय दोनच पानं? तुम्ही दोघं एकाच पानात जेवणार की काय?’ आणि असं म्हणून खळखळून हसले. तिला जरा लाजल्यासारखं झालं.
’ती नंतर बसायचं म्हणतेय’, साहेब.
’अगं, नंतर काय बसतेस? आता काय पूर्वीसारखं नाही, आम्हालाही कळतं तेव्हढं. चल बैस, आपण सोबतच बसू.’ सर म्हणाले.
जेवता-जेवता मग सरांच्या गप्पा सुरू झाल्या. आजकालची पिढी कशी बिघडलीय, तशीच कशी हुशार पण झालीय यावर. मध्येच त्यांनी साहेबांचे शाळेतले एक-दोन किस्सेही सांगितले, तसा वाढायला मदतीसाठी उभा असलेला नोकरही मिश्किल हसला.गप्पा गावाकडे वळल्या.
’खरं सांगू सर, आपल्या गावात मात्र हवी तशी सुधारणा अजून झाली नाही. तसं पाहिलं तर आपलं गाव, मागास नाही, विचारांच्या बाबतीत. आपल्या व्गावातील अनेक लोक पुढे गेले, शिकले. मोठ्या पदांवर गेले. पण त्याच गावात तीच पाणपोई आणि तेच रस्ते. ’
’बरोबर आहे तुझं म्हणणं विसू कारण अरे शाळा हीच आपल्या गावाची संपदा म्हण ना. कित्येक वर्षे हिरे-माणके शोधतच आहे, अनेक मडकी घडवत आहे’. सरांच्या डोळ्यांत शाळेबद्दलचा अभिमान दिसत होता. ’बरं, तू कुठल्या देशांत फिरून आलास की नाही? अमेरिका, इंग्लंड, आम्ही फक्त इतिहास भूगोलात शिकवला बघ. बरं वाटतं तुम्हा पोरांना असं यशस्वी बघून.......तरी तुम्ही पोरं आमची ओळख ठेवता हे आमचं सौभाग्य. नाहीतर आजची पिढी म्हणजे.’ सरांनी गंभीर होता-होता विषय बदलला. ’अरे, मध्ये एकांकडे सत्यनारायणाची पूजा सांगायला गेलो होतो. ते म्हणत होते. या टी.व्ही सिरीयलमधे म्हणे पुरुषांचे कपडे मोजावे लागतात आणि बायकांचे कपडे शोधावे लागतात, असं झालंय.’ वाक्य पूर्ण करत सर पुन्हा एकदा खळखळून हसले.गप्पा मारता-मारता जेवण होऊनही गेलं.
ओसरीवर दुपारची वामकुक्षीही झाली. ’तुझ्या इथल्या मऊ गादीवर छान झोप लागली हो मुली मला.’ सर उठल्यावर म्हणाले. स्नेहलने त्यांना फ्रेश व्हायला सांगून चहा ठेवला.हात पुसत किचनमधे येताना सरांनी स्नेहलला विचारलं,’तू नोकरी वगैरे करतेस की नाही? या विसूच्या कामात तुझा सर्व वेळ मोडू नकोस हं. अगं, आजकाल स्वावलंबी व्हावंच मुलींनी. आमच्या शाळेत तर आजकाल मुलीच जास्त असतात बघ पहिल्या पाच मध्ये.’ पाच मिनिटांत साहेबही एका माणसाचं काम निपटून आत आले.
थोड्या अजून गप्पा झाल्यावर चुळबूळ करत सरांनी विचारलं,’बाबा कसे आहेत? त्यांचा काही फोन वगैरे?’
’हो, होतो ना. आज-काल जवळ-जवळ रोज होतो.ते दोघेही कंटाळतात ना एकटे. मध्येमध्ये येतात इकडे.’ साहेब म्हणाले.
’मग काय म्हणत होते बाबा?’, सरांनी जरासा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना हवा तो मुद्दा मिळतोय असं काही वाटेना. तेव्हढ्यात बाहेर काही लोक आल्याचं नोकराने सांगितलं आणि आपल्याला आताच बोलायला हवं हे सरांना कळलं. स्नेहलने साहेबांना खुणावलंही की काय ते विचारा म्हणून. साहेबांनी थोडा जोर दिल्यावर सर बोलायला लागले.
’अरे तुझ्या बाबांशी बोललो होतो परवा. जरा काम होतं तुझ्याकडे म्हणून. तुला श्रीराम तर माहीतच आहे, माझा मुलगा.’ साहेबांनी मान डोलावली. ’ तुझ्यापेक्षा एक ७-८ वर्षांनी लहान असेल बघ. बरेच दिवस त्याच्यासाठी काहीतरी करायचं होतं.पण काय ते कळत नाही बघ. तसा तो पहिल्यापासून मध्यमच. १२वीला पण जेमतेमच मार्क पडले. आता जास्त पैसे भरून त्याला कुठे शिकवणं आम्हाला परवडत नव्हतं. शिक्षकाला पगार तो असा किती ते? नंतर त्याने B.A., M. A. पण केलं. आजकाल शिक्षकाची नोकरीही महाग झालीय बघ. तसा मी प्रयत्न केला होता त्याला शाळेच्या नवीन सुरू होण्याऱ्या College मध्ये नोकरी लागावी म्हणून. पण अजून तिथेही अनुदान नसल्याने गेले दोन वर्ष बिन-पगारी काम करतोय.वयाची तिशी उलटून गेलीय. लग्नं कसं व्हायचं याचं? बरं, शाळेतच अजून काही जागा आहेत का विचारलं, तर म्हणे, शिपायाची जागा आहे. तूच सांग, ज्या शाळेत मानानं ३५ वर्षं काढली तिथं पोराला शिपाई म्हणून काम कर असं कसं सांगू? बरं आमचं आयुष्य़ शाळेच्या पलीकडे कधी गेलं नाही, तर कुठून ओळखी असणार आणि कसला वशिला लावणार. शेवटी परवा तुझे बाबा भेटल्यावर त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले होते बोलतील तुझ्याशी म्हणून. राहिलं असेल सांगायचं. असू दे. आता मीच सांगतो. बघ काही जमलं तर. गावाबाहेर असेल तर अजून बरं. यापेक्षा जास्त काही मला बोलता येत नाहीये बघ. जे काही असेल ते,हो/नाही, तू बाबांकडे सांगितलंस तरी चालेल.’ स्नेहलला सरांचा चेहरा पाहून कसंतरीच झालं.
’अहो असं काय म्हणताय सर? मी नक्की करतो काहीतरी.तुम्ही माझ्यासाठी बाबांसारखेच. तुम्ही काही काळजी करू नका.’ साहेबांचं हे बोलणं ऎकून सरांना भरून आलं.
’चल मी निघतो आता. तुझ्याकडे बरेच लोक आलेले दिसतात.’ साहेबांनी आणि स्नेहलने सरांना नमस्कार केला. निघता-निघता सर स्नेहलकडे वळून म्हणाले.’तुला माहीतेय पोरी, तो वर बसलेला देव आहे ना? तोही आमच्यासारखाच आहे. आम्हा शिक्षकांना शिक्षा देणं चांगलं जमतं बघ. आजकाल ते करता येत नाही म्हणा. पण, आम्हाला अगदी चांगलं माहीत असतं की कुठे मारलं तर लागेल. तसं, त्यालाही चांगलंच माहीतेय, कुणाला कुठे मारलं तर जास्त लागेल.’ सरांच्या या वाक्यानं दोघांनाही सुन्न केलं होतं.
-अनामिका.