रुबाया

घन अंधारातून धावत आला काळ

थांबला म्हणे, मज, "येतो का रे बाळ? "

ते काय मागुती राहून गेले माझे

आरशात पाहिले अज्ञाताचे ओझे

        *     *    *    *

अंधार फाडुनी धावत आल्या लाटा

क्षण चिंब जाहल्या वहिवटलेल्या वाटा

वहिवाट कुणाची जन्म कुणाचा म्रुत्यू

डोळ्यात उगवता सूर्य रिकाम्या खाटा

        *   *    *   * *

मी मलाच ठाउक होतो कधी, कधी अन नव्हतो

पण एक खरे की कधी तरी मी होतो

दुःखाचे लेणे लेउनी युगा युगांचे

पायाने थकल्या कशास कोठे जातो?

       * * * *

                            अशोककुमार त्रिभुवन