एक सुवर्णयोग !!!

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'एम्स्ट'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनवालाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते. हॉलची क्षमता सुमारे २५०० माणसे बसण्याची परंतु तेवढीच माणसे बाहेरही होती. पाहूण्यांचे आगमन १०. ३०वाजता होणार होते. त्या आधी एक तास अत्यंत सुरेल असा संतूरवादनाचा कार्यक्रम झाला‌. सर्वत्र मंगलमय व उत्साहाचे वातावरण होते. ठीक १०. ३० वाजता पंतप्रधानांचे आगमन झाले. नवल ह्याचे वाटत होते की ते कोणाशीही सहजपणे हस्तांदोलन करीत होते.आपल्यासारखी कडक सुरक्षाव्यवस्था नव्हती्. हा कार्यक्रम मलेशियन इंडियन काँग्रेसने आयोजित केला होता. विद्यापीठ स्थापन करण्यामध्ये ह्या पक्षाचा व पक्षातील मान्यवर नेते दातो स्री.सँम्यू वेल्लू ह्यांचा मोठा सहभाग आहे. कार्यक्रमाची सुरूवात महागणपतिवंदनम या नयनरम्य भरतनाट्याने झाली̱. गंमत अशी की नृत्याची सांगता''गणपती बापा मोरया''च्या निनादात झाली. नंतर विद्यापीठाच्या चेअरमनचे स्वागतपर भाषण होऊन मा‌. स्री‌. वेल्लुसाहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अर्थातच मा. पंतप्रधानांचे भाषण! त्यांनी विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या‌‌. संगणकाची कळ दाबून उदघाटन केले. भारत व श्रीलंकेचे हायकमिशनरही ह्या समारंभाला हजर राहिले होते. त्यानंतर सर्वांनाच सुग्रास भोजन होते.

वास्तविक पाहता असे समारंभ आपण भारतात नेहेमी पाहत असतो परदेशात अश्या एखाद्या प्रसंगी आपली हजेरी असणे, तिथले रितीरिवाज जवळून बघणे, ह्यातील आनंद वेगळाच असतो. आपले मन नकळतच दोहोतीलसाम्य व भेद यांची तुलना करू लागते. कोणाला हा प्रसंग फालतूही वाटू शकतो, प्रसिद्धिसाठी लिहीला आहे असेही वाटेल पण सलग४० वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केल्यानंतर ,उच्च शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली करणार्या एका परदेशस्थ विद्यापीठाच्या उदघाटनप्रसंगी आपल्याला हजर राहायला मिळणे हा माझ्या निव्रुत्त जीवनातीलमी एक सुवर्णयोगच मानते.