चार पेग घेता घेता...

आमची प्रेरणाः कविवर्य सुरेश भट यांची अजर, धगधगती कविता "उषःकाल होता होता काळरात्र झाली"

चार पेग घेता घेता काल रात्र झाली !
घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली !          ॥धृ॥

आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली !           ॥१॥

रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;
रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !
आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली !       ॥२॥

अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी
ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !
आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली !       ॥३॥

उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !
असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?
मी अपार दु:खी, माझी चालली हमाली !          ॥४॥

उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला
जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !
कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली !          ॥५॥

धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !
अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !
दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली !            ॥६॥

बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !
अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !
आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली !      ॥७॥