हसरे लाडू -- १

 
        कधीही बुंदीचे लाडू पाहिले की मला मावशीची हमखास आठवण होते.माझ्या मुंजीच्यावेळी मावशी बरेच दिवस आमच्याच घरात होती आणि त्यावेळी तिन मुंजीच्या धामधुमीत हौसेने भाग घेतला होता.त्यावेळी परवडत नसले तरी चांगले कोठीभर बुंदीचे लाडू आमच्या घरी झाले त्या लाडू वळण्याच्या कामात मावशीचा हातभार लागला होता,पण तिच्या अंगात इतके त्राण कमी की तेसुद्धा वळताना जोर पुरेसा न लावल्याने तिने वळलेले लाडू फुटून पुन्हा बुंदीच्या दाण्यात त्यांचे परिवर्तन व्हायचे त्याला मावशी ," अरे माझे लाडू हसतात " म्हणायची.  
        वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापर्यंत आपल्याला आई वडील भावंडांव्यतिरिक्त कोणी नातेवाईक आहेत याचा मला पत्ताही नव्हता.वडिलांना भाऊ नव्हता पण तीन बहिणी मात्र होत्या.त्यातील एक बालविधवा होती आणि आमच्याच घरात रहात होती,दुसरीही गावातच रहात होती पण तीही माझ्या जन्मापूर्वीच मरण पावली होती तिचा एक मुलगा म्हणजे माझा आतेभाऊ मधून मधून आमच्या घरी डोकवायचा. मात्र आईचे कोणी नातेवाईक आमच्याकडे कधीच फिरकत नव्हते त्यामुळे आपल्याला मामा अथवा मावशी आहे याची मला तरी कल्पना नव्हती.पण त्यावेळी आमच्या घरातील शेंडेफळ असणाऱ्या भावाचे जावळ काढायचे होते आणि ते मामाच्या मांडीवर काढायचे म्हणून  आमचे   मामाकडे आजोळी जायचे ठरले तेव्हां आपल्याला मामा आहे याचा पत्ता लागला. कदाचित माझे जावळही मामाच्याच मांडीवर काढलेही असेल पण ते मला समजले नसणार. त्यावेळी  हा प्रवास करायलाही बसची सोय नव्हती त्यामुळे आम्ही बैलगाडीतून जायचे ठरवले.तसे आम्ही आमच्या गावी बैलगाडीनेच जात असू. आमचे गाव म्हणण्याचे कारण वडिलांचा जन्म तेथे झाला एवढेच. नाहीतर माझ्या जन्मापासून तेथील घर आणि शेती या गोष्टी केवळ नावापुरत्याच उरल्या होत्या. अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही न पाहिलेले घरही जळाले त्यामुळे आम्हाला म्हणजे मला आमचे घर पहायला मिळालेच नाही. 
       त्यावेळी गाव सोडून कोठेही जायचे ही कल्पना आनंददायकच असायची इतके गाव सोडणे दुर्मिळ असायचे त्यामुळे कधीच न पाहिलेल्या मामाकडे जायचे या कल्पनेने आम्ही सगळेच आनंदित झालो.त्यावेळी आम्ही या सदरात मी,माझ्या दोन मोठ्या आणि एक लहान अशा तीन बहिणी,आणि सर्वात लहान भाऊ ज्याचे जावळ काढायचे होते  अशी पाच मंडळी मोडत होतो. आम्ही सर्वजण एका बैलगाडीत बसू शकत होतो.मधून मधून वडील गाडीतून उतरून चालत येत त्या बैलगाडीला तट्ट्या लावलेला असल्यामुळे उन्हाचा त्रास व्हायचा नाही.आमच्या घरी दूध घालणाऱ्या कुंभाराची ती बैलगाडी होती आणि त्याचे नाव चिनकू कुंभार होते पण आम्ही काही बोलायला गेलो की तो अंगावर खेकसल्यासारखा बोलायचा त्यामुळे आम्ही त्याला चिडकू कुंभार म्हणायचे.
      या चिडकू कुंभाराच्या गाडीतून आम्ही एक दिवशी पहाटे घरातून निघालो आणि दुपारपर्यंत मामाच्या गावाला पोचलो आमची गाडी मामाच्या घरासमोर थांबली.आम्ही गाडीतून बाहेर पडून आत शिरणार तोच एका ठेंगण्या ठुसक्या,बळकट बांध्याच्या काळ्या बाईने एकदम दरडावल्यासारखे आम्हाला घराबाहेरच थांबवले आणि हातात भाकरतुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन भाकरतुकडा आमच्यावरून ओवाळून टाकला आणि आमच्या पायावर तांब्यातले पाणी टाकून शुद्ध करून तिने आम्हाला घरात घेतले.ही आमची मामी होती आणि तिच्या पाठीमागून दबकत डोकावणारा पुरुष तो आमचा मामा होता.हे मामा मामीचे पहिले दर्शन.ही मामाची दुसरी बायको होती. हिचा वाण पहिल्या मामीच्या तुलनेत ठार काळाच असल्याने हिला काळी मामी अशीच संज्ञा होती.
     मामाचे घर अगदी मामाचा वाडा म्हणण्यासारखे मोठे होते.समोर झाडे मागेही बाग,गोठा गोठ्यात गुरे असा सगळा सरंजाम होता.आम्ही घरात शिरलो.आत शिरल्यावर अंगणात मोठा आड होता. पण घराच्या  खिडक्या बारीक असल्याने  अगदी अंधारच वाटत होता.घराला किती खोल्या होत्या आता आठवतही नाही.मामाला मूलबाळ नसल्यामुळे एवढ्या मोठ्या वाड्यात शुकशुकाटच होता आणि आम्ही गेल्यामुळे एकदम त्याला जाग आली आणि आमच्या कलकलाटाने तो अगदी दुमदुमून गेला.एकदम एवढी माणस  बघून तोही भांबावून गेला असावा. 
    आम्ही पोरांनी वाड्याचा आतला,मागचा आणि पुढचा सगळा भाग पहायला सुरवात केली.माझ्या शोधक नजरेला लगेच मधल्या खोलीत एक भुइमुगाच्या शेंगांचे पोते भरून ठेवलेले दिसले आणि घरच्या संवयीला अनुसरून लगेच त्यातून मूठभर शेंगा काढून मी माझ्या चड्डीच्या खिशात कोंबायचा प्रयत्न केला. पण काळ्या मामीचे एवढ्या सगळ्या गोंधळातही घरावर चांगलेच लक्ष होते कारण माझा खिशात जाणारा हात तिन खस्सकन बाहेर ओढत "टोणग्या,चोरून खायला हवे का?" असा माझ्या काळजात धडकी भरवणाऱ्या कर्कश्श आवाजात प्रश्न विचारला.आणि माझ्या हातातल्या शेंगा काढून परत पोत्यात टाकत तिने चार शेंगा माझ्या हातात ठेवत," हं ह्या घे आणि खा उगीच जास्त खाशील तर होशील हगवणीने बेजार" असा वर दमही भरला.
     सकाळपासून आम्ही बरोबर घेतलेल्या भाकरी गाडीत खाल्ल्या असल्या तरी आता चांगलीच भूक लागली होती.मामीच्या घरात प्रवेश केल्यावर कपभर चहाचे पाणीच काय ते पोटात गेले होते त्यामुळे तेवढ्या चार शेंगानी माझी भूक आणखीच चाळवली होती,पण आमच्या आईला आपल्या वहिनीच्या काटकसरी स्वभावाची आणि तितकीच आपल्या पोरांच्या कडकड्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे तेवढ्यातल्या तेवढ्यात घाई करून निदान पिठले आणि भाकरी करण्याची तातडी तिने दाखवली होती. आणि आम्हा सगळ्यांना जेवायचे बोलावणे आले.अर्थातच जेवणात भाकरी आणि पातळ पिठले एवढाच मेनू होता.
      खरे तर घरात धान्याच्या पोत्यांची शीग लागलेली होती आणि खायला माणसेही दोनच होती तरी कधी नव्हे ते आलेल्या नणदेच्या मुलांसाठी  काही गोडधोड करावे असे काही मामीला वाटले नव्हते आणि तसे तिला सांगण्याचीही मामाची काही बिशाद नव्हती.त्यात आम्ही जावळ काढायला आलो म्हटल्यावर त्यादिवशी तरी काही गोड करावेच लागले असते याचाही तिन विचार केलेला असणार.
     मामाच्या घरात देवघर वेगळे नव्हते. स्वयंपाकघरच चांगले ऐसपैस होते आणि त्यातच मागील बाजूस एका मोठ्या जमिनीलगतच्या कोनाड्यात मोठा देव्हारा ठेवलेला होता.मी घरी पूजा करतो असे कधीतरी आईने कौतुकाने सांगितलेले या मामीने बरोबर लक्षात ठेवून मी दुसऱ्या दिवशी उठून अंघोळ करताच लगेच पूजेच्या कामावर माझी नेमणूक केली. खरे तर मला बाहेर गोठ्यात जाऊन गाईची धार कशी काढतात हे पहावयाचे होते,जमले तर तिला आंबोण खायला घालायचे होते,पण माझ्या या मनसुब्यावर तिने पाणी फिरवले.बर तिच्याकडे देवही काही कमी नव्हते.सगळे मोठे मोठे देव होते आणि टाकसुद्धा चांदीच्याच बैठकीत उभे रहातील असे केलेले होते नाहीतर आमच्या घरचे टाक आडवे ठेवावे लागत.इतक्या सगळ्या देवांना अंघोळ घालून ते देव्हाऱ्यात ठेवण्याच्या कल्पनेनेच माझे हात आणखी खांदे दुखू लागले.पण मामीला माझी मुळीच दया आली नाही,उलट ,"अरे मेल्या अशीच पूजा करतोस का घरी? काही खर नाही बाई त्या तुझ्या देवांच अस म्हणून माझ्या हातातली एक मूर्ती घेऊन त्यावर रांगोळीने खसाखसा घासत "हे बघ अस घासाव लागत म्हणजे देव असे चमकतात " असे प्रात्यक्षिक मला करून दाखवले.मला आमच्या मामीच्या तावडीत सापडल्रेल्या देवांचीच खरोखर दया आली.
      पण पूजेनंतर मला गोठ्यात जायला मिळाले आणि शेणामुताचा मनसोक्त वास घेत गाई वासरांचे दर्शन घेता आले.धार काढणारा मुलगा माझ्यापेक्षा दोन एक वर्षाने मोठा आणि माझ्यापेक्षा उंचही होता पण बऱ्याच दिवसात पोटभर खायला मिळाले नसल्यासारखा त्याचा चेहरा सुकलेला दिसला.त्याने धार काढून चरवी मामीच्या ताब्यात दिली आणि तो बाहेर पडायच्या बेतात होता तेवढ्यात त्याला मध्येच अडवून मी त्याला विचार्ले,"कोण रे तू ?" बहुधा अशी कामे करायला मामाने हा गडी ठेवला असावा असे मला वाटले पण त्याने उत्तर दिले,"मी  सुधाकर,तू प्रकाश ना?’"हो तुला काय माहीत?" मी उलट प्रश्न केला."अरे मी तुझा मावसभाऊ" म्हणून तो आणखी काही न बोलता घराबाहेर पडला.
   " अरे गेला की काय  सुध्या ?" मामीने बाहेर येत मला विचारले.
" हो आत्ताच गेला का काय झाल?" मी मामीला म्हणालो."बोलावू का त्याला परत?"
" नको पळतपळत जाऊन त्याला हे नेऊन दे " म्हणून मामीन माझ्या हातात वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेला काहीतरी पदार्थ कोंबला.मी ज्ञानेश्वरच्या पाठीमागे धावत धावत गेलो आणि त्याच्या हातात तो पदार्थ ठेवला.पण त्यात काय आहे याची उत्सुकता मला चैन पडू देत नव्हती त्यामुळे मी त्याला विचारलेच,"काय रे दिलेय तुला मामीने?" यावर उत्तर न देता त्याने ते पुडके उघडून दाखवले आणि ते पाहिल्यावर काय बोलावे याचा मला पेचच पडला कारण त्या कागदात वाळून अगदी कडकडीत झालेल्या तीन चार दिवसाच्या शिळ्या भाकरीचे तुकडे होते.
"पण मघाशी मामीन काल उरलेल्या भाकरी गुरांना घातल्या ना?" मी आश्चर्याने विचारले,"हो पण इतक्या कडकडीत भाकरी गुर खात नाहीत"तो म्हणाला,"मग हे कोण खाणार ?" "मी" हे त्याचे उत्तर ऐकून काय बोलावे मला काही सुचेना.अगोदर आपल्याला  सुधाकर नावाचा मावसभाऊ आहे ही गोष्टच मला नवीन होती त्यात आणखी एका आश्चर्याची भर पडली.कुणाकडून तरी या गोष्टीचा उलगडा करून घ्यायला हवा असे मला वाटले    
    आता दुसऱ्या दिवशीही आपल्याला पिठले भाकरी या मेनूलाच तोंड द्यावे लागतेय की काय या विवंचनेत मी आणि आम्ही सगळीच भावंडे होतो.तेवढ्यात एका नव्या पाहुण्यान घरात प्रवेश केला तो घरात शिरताच मामीची लगबग पाहून ही कोणीतरी अतिमहत्वाची व्यक्ती असावी हे माझ्या लक्षात आले.आणि थोड्याच वेळात ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मामीचा लाडका भाऊच होता हे समजले.
" अग ताई कोण पाहुणे आलेत ?" असे त्याने विचारताच ," काही विचारू नकोस आहेत आमच्या लाडक्या वन्सबाई लाडक्या भाच्याच जावळ काढायचेय ना मामाच्या मांडीवर" असा उद्गार मामीन काढला." बर ते जाऊदे काय काम काढलस ?"असे विचारून त्याला झोपाळ्यावर बसवत मामीन गप्पा मारायला सुरवात केली.मला खर तर झोपाळ्यावर बसायला आवडले असते पण मामीन त्याच्यावर बऱ्याच वस्तू रचून ते अवघड करून टाकले होते.आता या बंधुराजांच्या आगमनाने का होईना झोपाळा रिकामा झाल्यामुळे तेवढ्या बाबतीत तरी मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले.पण त्याहूनही एक आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे जेवायला चक्क शिक्रण पोळी करून ,"मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण" या पद्यपंक्तीची आठवण करून दिली.
     मामी आज भलतीच खूष होती आणि त्यामुळे तिन नेहमीची वागण्याची पद्धत बदलून एकदम आमचे कौतुक करायला सुरवात केली.माझी मोठी बहीण तिच्या वयाच्या मानाने नाच बऱ्यापैकी करत असे."अग छबे,आज तुझा तो नाच करून दाखव आम्हाला " असा मामीने आग्रह जेवणानंतर सुरू केला इतकेच नाही तर तिच्या "ये रे ये यदुराया रे" या नाचातील यदुरायासाठी मला पीतांबर नेसवून माझ्या हातात एक आडवी बासरी म्हणून फुंकणी ठेवून तिन बहिणीला नाच करायला भागच पाडले.या आनंदपर्यवासी नाटकाचा शेवट मात्र भलताच अनपेक्षित झाला.
      या कार्यक्रमानंतर जरा विश्रांती घेऊन मोठ्या मंडळींचे दुपारचे चहापान झाल्यावर मामा आणि वडील गावात जरा फिरायला बाहेर पडले,आणि मामीने लाडक्या वन्सबाईंना रात्रीच्या जेवणात चपात्या करण्यासाठी गहू जात्यावर दळायचा हुकूम सोडला.माझी आई फारच गरीब त्यामुळे नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या लेकीचा तोरा तर तिला मिरवता येणे शक्यच नव्हते उलट या काळ्या मामीची दहशतच तिला वाटत असावी.पण स्वभावाला औषध नसते.मुकाट्याने माझ्या मोठ्या बहिणीला सोबत घेऊन मधल्या खोलीत जात्यावर बसून गहू दळायला तिने सुरवात केली.तशी माझी मोठी बहीणही काय चालले आहे हे समजण्याच्या वयात असल्यामुळे वहिनीच्या समोर काही बोलायची हिम्मत नसलेल्या आईला त्या दोघी जणीच जात्यावर बसल्यावर मात्र रहावले नाही.आणि " बघा आता भाऊ आल्यावर कशी शिक्रण पोळी करायचे सुचले नाहीतर आम्ही आल्यावर पिठल भात तरी पोरांना पोटभर मिळतो की नाही याचीच चिंता पडली होती.’असे हळू आवाजात बहिणीच्या कानात ती बडबडली आणि आजकालच्या दूरदर्शन मालिकात असे बोल ऐकायला नको ती व्यक्ती बरोबर तेथे हजर असावी अगदी तस्से घडले आणि  मामीच्या त्या पाहुण्या आलेल्या भावानेच हे शब्द बरोबर ऐकले आणि स्वत:ची भर घालून आपल्या बहिणीच्या कानावर त्याने घातले.मग काय विचारता काळ्या मामीच्या रागाचा पारा इतका काही चढला की मामाने घरात प्रवेश करताच तिने गळा काढून रडायलाच सुरवात केली.
      "माझ्या माहेरच्या माणसांचा अपमान झाला.आता एक क्षणभरसुद्धा तो इथे रहाणार नाही. नाहीतर यांना जायला सांगा" असा अगदी कैकेयीप्रमाणे तिने मामाकडे त्रागा करायला सुरवात केली.मामा म्हणजे दुसरा दशरथच ! त्यामुळे मामीच्या या थयथयाटापुढे तो अगदी तोंडात तोबरा दिल्यासारखा गप्प होता. माझे वडील म्हणजे जमदग्नीचा अवतार, असा अपमान खपवून घेण त्याना शक्यच नव्हत पण त्यानी फारसा तमाशा न करता बाहेर पडणे पसंत केले आणि मोठ्या हौसेने पहिल्यांदाच आजोळी आलेले आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो.लगेच परत निघणे शक्य नव्हते कारण आमची बैलगाडी परत गेली होती आता दुसरी बैलगाडी ठरवणे ही काही या परक्या गावात तडातापडीने होण्यासारखी गोष्ट नव्हती त्यामुळे वडिलांनी आईच्या सल्ल्यानुसार मावशीच्या घरी जायचे ठरवले तिचे घर तसे जवळच होते.आम्ही जे काय आमचे थोडेफार सामान होते ते गोळा करून मावशीच्या घराची वाट धरली.