डॉ. किशोर भिसे यांच्या ’सिद्धकला’ या ठाण्याच्या संस्थेतर्फे शनिवार दि. १३ जून ला गडकरी रंगायतन येथे "फिटे अंधाराचे जाळे’ हा श्री. श्रीधर फडके यांच्या व कै. बाबूजींच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संकल्पना व संयोजन डॉ. किशोर भिसे व श्री. रवी चौबळ यांचे. ही संस्था केवळ कार्यक्रमच नव्हे तर अनेक उपक्रमही सातत्याने सादर करीत असते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीधरजींनी देवाचे नाव घेत केली - ’देव देव्हाऱ्यात नाही’. आणि पहिल्याच गाण्यापासून कार्यक्रम रंगला. सूत्रसंचालन धनश्री लेले यांनी सांभाळले होते. या कार्यक्रमात श्रीधरजींच्या सोबत विद्या करंदीकर या सहकलाकार होत्या.
श्रीधर फडके हे मितभाषी, पण अधून मधून ते गीताच्या वा चालीच्या अनुषंगाने आठवलेला किस्सा आवर्जून सांगत होते. श्रीधरजींनी ’तोच चंद्रमा’ सुरू करताच श्रोत्यांनी टाळ्यांनी गडकरी दणाणून सोडले.
मग एकापाठोपाठ एक गाणी रंगत गेली. निवेदिकेच्या तोंडून गाण्याचे पहिले दोन शब्द येताच पुन्हा एकदा श्रोत्यांनी खुशीने टाळ्या दिल्या त्या ’कधी बहर कधी शिशिर’ या मंगेश पाडगावकरांच्या यशवंत देवांनी संगीत दिलेल्या सदाबहार गीताला. हे गीत ऐकताना श्रीधरजींनी जेव्हा हळूच लाजरा पक्षी गावा ही ओळ घेताच ’पक्षी; या उच्चाराने साक्षात बाबूजींची आठवण करून दिली. या कार्यक्रमात कुसुमाग्रज, गदिमा, पाडगावकर, शांता शेळके, ना. धो. महानोर, ग्रेस, सुधीर मोघे, प्रवीण दवणे, शिरीष गोपाळ देशपांडे, नीतिन आखवे अशा अनेक प्रतिभावंतांच्या अप्रतिम रचना ऐकायला मिळाल्या.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेटका वाद्यसंच. मोजक्या पण सुरेल वादकांनी या सुरेल कार्यक्रमात रंग भरला. तबल्यावर तुषार आग्रे होते तर तालवद्यांचा ताबा होता सूर्यकांत सुर्वे यांच्याकडे. बासरीचे सूर होते मोहीत शास्त्री यांचे तर सिंथेसायझर वर होते सागर टेमघरे. मोजकी पण सुसंवादी वाद्ये दाद मिळवून गेली. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नामवंतांची उपस्थिती. या कार्यक्रमास लेखक/ कवी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे तसेच संगीतकार श्री. अनिल मोहिले हे उपस्थित होते.
आपण संगीत संयोजन केलेले गीत ऐकताना रंगलेले श्री. अनिल मोहिले.
श्रीधरजींनी श्री, देशपांडे यांना आवर्जून रंगमंचावर बोलावून घेत त्यांच्या उपस्थितीत त्यांची ’सलाम सलाम सलाम’ सादर केली. बाबूजींनी संगीत दिलेल्या अनेक गीतांमध्ये संगीत संयोजक अनिल मोहिले होते याचा श्रीधरजींनी खास उल्लेख केला. ]
अनेक आठवणी निघत होत्या आणि एकाहून एक अप्रतिम गाणी येत होती. फिटे अंधाराचे जाळे, हे गगना, सांज ये गोकुळी, मन मनास उमगत नाही, काल मी रघुनंदन पाहिले, मी राधिका, फुलले रे, कानडा राजा पंढरीचा, विठ्ठल आवडी, ज्योती कलश, तेजोमय नादब्रह्म, धुंद येथ मी, देहाची तिजोरी, काही बोलायाचे आहे, अवेळीच केव्हा, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर अशी अनेक भावनांची अनेक गीतकारांची संपन्न गीते एकामागून एक बरसत राहिली.
कार्यक्रम रंगात आला होता. रंगमंचावर निवेदिकेकडे एक चिठ्ठी आली. तिने ती वाचून श्रीधरजींकडे सुपूर्द केली आणि ’अरे वा - आता फर्माइश ऐकविणारं’ या वर श्रोते खूश झाले. मात्र दुर्दैवाने ती चिठ्ठी आवडीचे गीत सादर करण्याची विनंती करणाऱ्या रसिकाची नव्हती तर ’वेळ संपली आहे, कृपया आवरते घ्या’ असा निरोप देणारी होती. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. दुपारचे अडीच वाजायला आले होते. मग ’तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम संपताच थेट रंगमंच गाठून फडके साहेबांचे आभार मानले व त्यांनी विनंतीला मान देत आपली छबी टिपू दिली. मग अनिल मोहिलेंना विनंती करून त्याची सुहास्य मुद्रा टिपली आणि डॉक्टरसाहेबांचे व श्री. रवी चौबळ यांचे आभार मानून निरोप घेतला.