माझी आवडती कविता

"ओळखलत का सर मला? " पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून.
माहेरवाशीण पोरीसारखी साऱ्या घरभर नाचली
रिकाम्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली.
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखल गाळ काढतो आहे खचली भिंत बांधतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला.
'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा'.

-: कुसुमाग्रज :-